पुणे : दांडेकर पूलाजवळील कॅनॉलची भिंत फुटून झालेली दुर्घटना अत्यंत भयानक आहे. ही घटना रात्री झाली असती तर, हजारो नागरिकांचे प्राण गेले असते. दैव बलवत्तर म्हणून ही माणसं वाचली. या पीडित लोकांना तातडीची मदत म्हणून खासदार फंडातून 50 लाख रुपयांची मदत देत आहे. तसेच, त्यांचे कायमचे पूनर्वसन करण्यासंदर्भात आपण लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार आहोत, असे राज्यसभा खासदार संजय काकडे यांनी आज पत्रकारांशी बोलताना सांगितले.
खासदार संजय काकडे यांनी आज सकाळी कॅनॉलची भिंत फुटून झालेल्या दुर्घटनेतील पीडितांच्या घरांची पाहणी केली. पीडित कुटुंबियांना भेटून धीर दिला व तत्काळ त्यांच्या मदतीसाठी खासदार फंडातून 50 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. खासदार काकडे यांच्याबरोबर माजी नगरसेवक शिवाजी गदादे पाटील, माथाडी संघटनेचे अध्यक्ष दिनेश धाडवे , शंकर पवार आदी उपस्थित होते.
पीडित कुटुंबियांच्या घरातील अन्नधान्य, कपडे, दैनंदीन उपयोगाची भांडी, फ्रीज, टीव्ही आदींचे नुकसान झाले आहे. अनेक घरांच्या भिंतीच वाहून गेलात व पडल्या आहेत. पीडित कुटुंबियांना भेट दिल्यावेळी पीडितांचा आक्रोश मोठा होता. यावेळी पीडित नागरिकांनी खासदार काकडे यांना झालेल्या नुकसानीची माहिती देताना त्यांच्या डोळ्यात अश्रू होते.
खासदार काकडेंचा फोन व तात्पुरत्या निवासाची सोय
दुर्घटनाग्रस्त अनेक कुटुंबियांची सध्या राहण्याची अडचण आहे. स्थानिक पीडित कुटुंबियांकडून ही माहिती मिळताच खासदार संजय काकडे यांनी एसआरएच्या निंबाळकर यांना लगेच फोन केला व नाईकनवरे यांच्या स्कीम मधील 120 रिकाम्या फ्लॅट्समध्ये या पीडित कुटुंबियांची राहण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या. तसेच, खासदार फंडातून दिलेल्या 50 लाख रुपयांतून पीडित कुटुंबियांना आवश्यक ती मदत तत्काळ करावी अशी विनंती खासदार संजय काकडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे. तसे पत्रही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.
———————–
-दोषींवर कडक कारवाई करा
कॅनॉलच्या भिंतीला तडे गेल्यासंदर्भात गेल्या दीड वर्षांपासून प्रशासनाला माहिती होते. प्रसिद्धी माध्यमांमध्ये त्याविषयी बातम्या आल्या होत्या. तरीदेखील त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. ही अक्षम्य बाब असून या घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे करणार आहे. यामध्ये दोषी आढळणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, असेही खासदार काकडे यांनी यावेळी सांगितले.
—————
पालकमंत्र्यांनी तातडीने भेट द्यायला हवी होती – खासदार काकडे
पालकमंत्री गिरीश बापट यांनी भेट न दिल्याबद्दल व त्यावर अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्याविषयी पत्रकारांनी खासदार संजय काकडे यांना विचारले. त्यावेळी खासदार काकडे म्हणाले की, कॅनॉलची भिंत फुटून झालेली दुर्घटना अत्यंत भयानक होती. त्याचे गांभीर्य लक्षात घेता पालकमंत्री गिरीश बापट यांनी तातडीने घटनास्थळी येऊन मदत व पूनर्वसनाचे कार्य हाती घ्यायला हवे होते. बापट हे पालकमंत्री असल्याने ते स्वत: आले असते तर, संपूर्ण यंत्रणा तिथे आली असती व मदतीचे कार्य वेगाने झाले असते. त्यामुळे अजित पवारांनी केलेल्या वक्तव्यात तथ्य आहे.