नवी दिल्ली -भाजपाच्या दिल्लीत झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीच्या शेवटच्या दिवशी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षांवर तिखट शब्दांत टीका केली. ‘अजेय भारत, अटल भाजपा’ अशी नवीन घोषणा त्यांनी यावेळी दिली. ही घोषणा दिवंगत नेते अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित असल्याचे ते म्हणाले. भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी २०१९ मध्ये भाजपाचा पुन्हा विजय होईल आणि पुढील ५० वर्षे भाजपाला कोणीच पराभूत करू शकणार नाही, असा विश्वास व्यक्त केला. कार्यकारिणीच्या बैठकीनंतर केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी पत्रकार परिषदेत पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्या भाषणातील सारांश सांगितला.
अमित शाह यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना २०१९ मध्येही विजयाचा भरवसा दिला. आम्ही २०१९ मध्ये तर जिंकूच त्यानंतर ५० वर्षे आम्हाला कोणी हटवू शकणार नाही, असेही ते म्हणाले. मोदींनी आपल्या भाषणाच्या सुरूवातीलाच अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहिली.
महाआघाडीला स्वार्थी लोकांची आघाडी असल्याचा आरोप करत मोदींनी ही नेतृत्वहीन, अस्पष्ट नीती आणि भ्रष्ट नियत असलेल्या लोकांची आघाडी असल्याची टीका केली. काँग्रेसचे नेतृत्व कोणी स्वीकारण्यास तयार नाही. छोटे-छोटे पक्षही काँग्रेसचे नेतृत्व मान्य करताना दिसत नाहीत. इतकेच काय काँग्रेसच्या पक्षांतर्गत नेतृत्वावरही प्रश्न उपस्थित करत असल्याचे ते म्हणाले.
मोदींनी यावेळी गुजरातचे उदाहरण देत सांगितले की, ३१ वर्षांपासून आमचे सरकार तिथे आहे. कारण आम्हाला सत्तेचा अहंकार नाही. गुजरातची भूमी ही महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल यांची आहे. आम्ही सत्तेला खुर्ची म्हणून पाहत नाही तर जनतेचे काम करण्याचे ते उपकरण समजतो.
काँग्रेसवर टीका करताना ते म्हणाले, आम्हाला कुठेच आव्हान दिसत नाही. काँग्रेस विरोधी पक्षात राहूनही अपयशी ठरली आहे. लोकशाहीत विरोधी पक्ष असला पाहिजे. त्यांचे प्रश्न लोकशाही मजबूत करत असतात. पण आमचे दुख: हे आहे की, जे सत्तेत अपयशी ठरले. ते विरोधी पक्ष म्हणूनही अयशस्वी ठरले आहेत. आमचा पक्ष विचारांवर चालणारा आहे. काँग्रेसने असत्य पसरवण्याचे काम केले आहे. ते ना धड मुद्द्यांवर निवडणूक लढवतात ना कामावर लढतात. फक्त खोटेपणाचे ते राजकारण करतात.