पुणे : “मृत्युनंतर काय होते याचा विचार करण्यापेक्षा प्रत्येकाने स्वत: सामाजिक कार्य करून समाजासाठीचे कर्तव्य पार पाडले पाहिजे. हा विचार बुद्धांनी सांगितला आहे, तो अंगीकारला पाहिजे.” असे मत विभागीय पासपोर्ट अधिकारी अतुल गोतसुर्वे यांनी व्यक्त केले.
संघमित्रा ढावरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त तळवडे येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले ट्रस्टच्या
ज्ञानप्रभात विद्यामंदिर शाळेला एक लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली.
अतुल गोतसुर्वे यांच्या हस्ते संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठल गवळी यांच्याकडे एक लाख रुपयांचा धनादेश सुपुर्द करण्यात आला. यावेळी माजी प्रशासकीय अधिकारी पंजाबराव वानखेडे, सहकार खात्याचे माजी सहसचिव एस.बी.पाटील, मुख्याध्यापिका प्रज्ञा सोनवणे, निवेदक दीपक म्हस्के, राहुल काकडे, भिक्कुनी आर्य सुमना, आम्रपाली गायकवाड, सचिन गायकवाड, प्रणाली ढावरे उपस्थित होत्या.
गोतसुर्वे म्हणाले, “समाजातील उपेक्षित व वंचित घटकाच्या शैक्षणिक उन्नतीसाठी ढावरे कुटुंबीयांनी आर्थिक मदत करण्यासाठी उचललेले पाउल महत्वाचे आहे. अशा उपक्रमांची गरज आहे. या संस्थेतील मुलांचा कल लक्षात घेऊन त्यांना शिक्षण दिले पाहिजे.”
वानखेडे म्हणाले, “संघमित्रा ढावरे यांच्या अकाली जाण्याने त्यांच्या कुटुंबीयांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याहीपेक्षा समाजाचे खुप मोठे नुकसान झाले आहे. त्यांनी गरीब व गरजु महिलांना बचत गटाचा आधार देत त्यांचे सक्षमीकरण केले. महिला उद्योजिका निर्माण करण्यास त्यांनी प्राधान्य दिले. त्यांनी आपल्या कार्याद्वारे बुद्धांचा मानवतावादी विचार प्रत्यक्षात उतरविला.”प्रास्ताविक डॉ.भागवत ढावरे यांनी केले. सुत्रसंचालन दीपक म्हस्के यांनी केले.
“ज्ञानप्रभात विद्यामंदिर ही शाळा समाजातील गरीब, गरजु, उपेक्षित व वंचित मुलांच्या शैक्षिणिक उन्नतीसाठी चालविन्यात येते. या शाळेत साडेसातशे विद्यार्थी सध्या शिक्षण घेत आहेत,”अशी माहिती गवळी यांनी दिली.