५ जुलै रोजी वरसगाव धरण क्षेत्रात वृक्ष लागवड – खा. अनिल शिरोळे
पुणे-महाराष्ट्र शासनाच्या १३ कोटी वृक्ष लागवडीच्या महत्वाकांशी योजनेत पुणे जिल्ह्यात तसेच राज्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जल आणि मृद संधारण कामांतर्गत बांबूची लागवड करावी अशी विनंती खासदार अनिल शिरोळे ह्यांनी मध्यंतरी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन ह्यांना केली होती. बांबू तसेच तत्सम प्रजातींची लागवड केल्यास अतिवृष्टीमुळे वाहून येणाऱ्या मृदेस अटकाव होऊन धूप थोपविता येते. प्रस्तावित बांबू लागवडीमुळे मान्सून पश्चात पाण्याचा प्रवाह (post mansoon flow) वाढून शहराची भूजल पातळी वाढण्यास मदत होणार आहे. तसेच पाणवहाळ क्षेत्रात नदी किनारी वसलेल्या गावांना पुरापासून संरक्षण देखील करत येते. यावर तातडीने कार्यवाही होण्यासाठी वरिष्ठ पातळीवर सर्व संबंधित सचिव यांची बैठक आयोजित करून शासन निर्णय निर्गमित करण्याच्या शिरोळे ह्यांच्या मागणीची दखल घेऊन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन ह्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले होते.
त्याचाच पाठपुरावा म्हणून शिरोळे ह्यांनी आज विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर बरोबर बैठक घेतली. बैठकीत झालेल्या निर्णयानुसार ५ जुलै रोजी वरसगाव धरणाच्या तीव्र उतार क्षेत्रात वृक्षलागवड करण्यात येणार असल्याचे शिरोळे ह्यांनी बैठकीनंतर बोलताना सांगितले. ह्या प्रसंगी जल संधारण विभागाचे अधिकारी संजीव चोपडे, रंगनाथ नाईकडे, पांडुरंग शेलार आदी उपस्थित होते.