पुणे: राष्ट्रीय सेवा योजना आणि नेहरू युवा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने, हुजूरपागा महिला वाणिज्य महाविद्यालय येथे महिला उद्योजिका मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. जागतिक महिला दिनाच्या औचित्याने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या ३० यशस्वी उद्योजिकांचा सत्कार करण्यात आला. तरचाकोरी बाहेरील क्षेत्र निवडून त्या क्षेत्रात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या बाग्यश्री आपटे (कॅनिंग), सायली भिडे (डायमंड), मेघना हल्लभावी (पेपर ट्यूब कारखाना) यांना शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन यावेळी गौरविण्यात आले. तर महाविद्यालाच्या आजी व माजी उद्योजिकांचा अमृता दातीर, रुपाली कडू, वृत्तीका जोशी आणि धनश्री देशपांडे यांनाही सन्मानित करण्यात आले. रश्मी कुलकर्णी आणि श्यामाताई जाधव यांच्या हस्ते या सर्व पुरस्कारांचे वितरण झाले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य के. पी बैरागी, संस्थेचे सुभाष महाजन, देवस्थळी, सोनावणी आदी मान्यवरही उपस्थित होते.
तुम्हांला जन्मत:च लागलेली ओळख बाजूला ठेवून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याचे ध्येय बाळगा. अशक्य असे या जगात काहीच नाही फक्त मी हे करू शकते असा सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. निरर्थक गोष्टीत वेळ वाया दडवू नका” असे विद्यार्थींनींना मार्गदर्शन करताना हल्लभावी यांनी सांगितले.
तर “आपल्यातील कलागुणांना ओळखा. नावीन्यपूर्ण आणि सृजनशील दृष्टीकोनातून आपल्या कलेस व्यावसायिक रूप कसे देता येईल याचा विचार करा. चूल आणि मूल एवढेच आपले आयुष्य मर्यादित ठेऊ नका,” असा मार्मिक सल्ला रश्मी कुलकर्णी यांनी विद्यार्थींनींना दिला. सायली भिडे, बाग्यश्री आपटे यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.
उद्योजक व महाविद्यालय यांच्यात सुसंवाद साधणे, विद्यार्थींनींपुढे यशस्वी उद्योजिकतेचा आदर्श निर्माण करणे करून त्यांना उद्योजिका होण्यासाठी प्रोत्साहन देणे या प्रमुख उद्देशाने हा मेळावा भरविण्यात आला असल्याचे के. पी बैरागी यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाचे संयोजन प्रा. रूपाली शेठ तर सूत्रसंचालन प्रा. वैजयंती चिपळूणकर यांनी केले. प्रा. अस्मिता कुलकर्णी यांनी आभार मानले.