पुणे : मनासारखी माणसे न मिळणे, पैसा कमी असणे अशी अनेक अप्रसन्नतेची कारणे आहेत. आज श्रद्धधेचे विवरण आणि भक्तीचे निरुपण बदलले आहे. पैसा हे साध्य नाही, तर साधन आहे. पैसा माणसाला स्थिर नाही, तर अस्थिर करतो. आपल्या शिक्षणात माती व आत्मा याचे नाते शिकविले जात नाही. त्यामुळे आधुनिकीकरण म्हणजे पाश्चिमात्यीकरण नाही, हे भारतीयांना कळत नाही, असे मत डॉ.संजय उपाध्ये यांनी व्यक्त केले.
आनंदवन बहुउद्देशीय संस्था आणि एनजीओ आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने दिवाळी निमित्त डॉ. संजय उपाध्ये यांचे ‘मन करा रे प्रसन्न’ या कार्यक्रमाचे आयोजन घोले रस्त्यावरील जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन येथे करण्यात आले होते. यावेळी रा. स्व. संघ पुणे महानगराचे कार्यवाह महेश करपे, आनंदवन बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष डॉ. अजय दुधाणे, दत्तात्रय सोनार ,विवेक राजगुरू, अनिरुद्ध हळंदे , जयंत हिरे, संतोष पटवर्धन, प्रमोद शेळके, विशाल शिंदे आदी उपस्थित होते.
डॉ.संजय उपाध्ये म्हणाले, युरोपियन अभ्यासक व इतर देशांमधील विद्वानांना तत्वज्ञ समजले जाते. मात्र, भारतातील संतांना तत्वज्ञ समजले जात आही. संत ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराजांनी जे सांगितले, तेच आज पाश्चात्यांकडून सांगितले जाते आणि त्याचेच आपल्याला अप्रूप वाटते, हे दुर्देव आहे.
ते पुढे म्हणाले, मन याविषयावर अनेक पुस्तके व कविता आपल्या मराठी साहित्यात आहेत. केवळ मनोरंजन ही पाश्चात्यांची संस्कृती असून मनोरंजनासोबत ज्ञान व प्रबोधन ही आपली संकल्पना आहे, असे सांगत आयुष्य कसे जगावे, मन कसे प्रसन्न ठेवावे, हे देखील त्यांनी उपस्थितांना सांगितले. संजय हिरवे यांनी सूत्रसंचालन केले.