बजेटमधील ५०० कोटींच्या तरतुदीचा विनियोग करा ;मग कर्ज उचला-माजी उपमहापौर आबा बागुल यांची मागणी
पुणे-
समान पाणीपुरवठ्यासाठी वाजतगाजत कर्जरोख्यातून उभारलेली दोनशे कोटी रुपयांची रक्कम न वापरता व्याज भरण्याची; अथवा बँकेकडे परत करण्याची नामुष्की टाळण्यासाठी महापालिका प्रशासनाने बनवा-बनवीचा मार्ग पत्करला आहे.
समान पाणीपुरवठ्याच्या कामाच्या निविदाही निघालेल्या नसताना केवळ कागदावर या २०० कोटी रुपयातील ४ कोटींच्या रकमा पाणीपुरवठ्याशी संबंधित कामांवर खर्चात दाखविण्याचा ‘प्रताप’ आयुक्तांनी विभागप्रमुखांना सूचना देऊन केला आहे . मात्र हा कागदोपत्री खेळ ही केवळ पुणेकरांचीच नव्हे; तर प्रशासन स्वतःचीच फसवणूक करून घेत असल्याची टीका माजी उपमहापौर आबा बागुल यांनी केली आहे.तसेच तात्काळ उचललेले २०० कोटींचे कर्ज बँकेला परत करून अंदाजपत्रकातील ५०० कोटींच्या तरतुदीचा समान पाणीपुरवठाच्या कामांसाठी विनियोग करावा अशी मागणीही आबा बागुल यांनी आयुक्तांसह मुख्यलेखापाल , मुख्यलेखापरीक्षक आणि पाणीपुरवठा विभागप्रमुखांकडे केला आहे.
विशेष म्हणजे कर्जाच्या २०० कोटी रुपयांमधून समान पाणीपुरवठा योजनेच्या कामासाठी रक्कम वापरण्याची माहितीही अधिकाऱ्यांना नाही तसेच बजेटमध्ये ५०० कोटींची तरतूद असताना या रकमेची गरज नाही हेही अधिकाऱ्यांनी निदर्शनास आणून दिलेले आहे तरीही आयुक्तांनी स्मार्ट कारभारासाठी २०० कोटींचे कर्ज उचललेले आणि नाहक दरमहा दीड कोटी रुपये व्याजाच्या भार पालिकेच्या तिजोरीवर ओढवून घेतला आहे मात्र व्याजाच्या भुर्दंडाचे खापर स्वतःवर फुटणार असल्याने आता कागदोपत्री रक्कम खर्ची घालण्याची शक्कल आयुक्तांनी लढविली आहे मात्र ही कृती कायदेशीरदृष्ट्या गंभीर स्वरूपाची आहे याकडेही आबा बागुल यांनी लक्ष वेधले आहे.
घोडचूक होऊनही केवळ स्वतःचा ‘अहं’ सुखावण्यासाठी महापालिकेला कर्जाच्या खाईत जाणीवपूर्वक लोटणे ,आर्थिक नुकसान करणे ,हे अतिशय चुकीचे आहे. वास्तविक २०१७-२०१८ च्या महापालिकेच्या अंदाजपत्रकातील समान पाणीपुरवठ्यासाठी ५०० कोटी रुपयांची तरतूद पूर्ण खर्ची पडल्याशिवाय कर्जरोख्यातून कोणतीही रक्कम बँकांकडून उचलू नये अशी मागणीही आबा बागुल यांनी केली आहे.