जालना : दुष्काळ सदृश्य परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना अपेक्षित असे पीक मिळत नसल्याने शेतकरी आत्महत्या करत आहेत. अशा शेतकऱ्यांच्या कुटूंबियांना शासनामार्फत सर्वतोपरी मदत करण्यात येत आहे. परंतु समाजातील सर्व घटकातील नागरिकांनी अशा शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदत करण्याची गरज असून शासन शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे असल्याचे प्रतिपादन, पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी केले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृह जालना येथे श्री.गणेश महासंघ व मातोश्री बहुउद्देशीय सेवाभावी संस्था जालना यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील 32 आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना बबनराव लोणीकर यांच्या हस्ते साडी, चोळी रोख रूपये 10 हजार प्रत्येकी मदत वाटप करण्यात आली. याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी सुनील आर्दड, अभय करवा, चंपालाल भगत, जालन्याचे उपविभागीय अधिकारी श्रीकुमार चिंचकर, तहसीलदार रेवनाथ लबडे, परतूरचे तहसीलदार विनोद गुंडमवार आदी उपस्थित होते.
श्री. लोणीकर म्हणाले की, राज्यात नापिकीमुळे शेतकरी आत्महत्या करीत आहे. त्या शेतकऱ्यांच्या कुटूंबियांना शासनामार्फत विविध सोई सुविधांचा लाभ देण्याबरोबरच 3 लक्ष रुपये एवढ्या किमतीची एक विहीर व एक शेततळे देण्यात येणार आहे. येत्या काळात सर्व शेतकऱ्यांना सोलर पंपाचे वितरण शासनामार्फत करण्यात येणार आहे. या पंपामुळे शेतकऱ्यांना वीज देयक भरण्याची गरज लागणार नाही.
गतवर्षात खरीप हंगामामध्ये बाधित झालेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अनुदानाचे तसेच पीक विमा, ठिंबक सिंचनाचे अनुदानही पात्र शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले. शेतकऱ्यांप्रती शासनाचा सकारात्मक दृष्टीकोन असून त्यांना कर्जवाटप, छोट्या, मोठ्या उद्योगासाठी आर्थिक मदत देण्यात येईल. शेतकऱ्यांनी अशा परिस्थितीमध्ये आत्महत्या न करता मनोधैर्य कायम राखत या संकटाचा सामना करावा.