मुंबई- ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे हे माझ्या दृष्टीने साहित्य क्षेत्रातले दहशतवादी आहेत तर बाबासाहेब पुरंदरेंना देण्यात येणारा सन्मान योग्य आहे, असे ‘पानिपत‘कार विश्वास पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
बाबासाहेब पुरंदरे यांना ‘महाराष्ट्रभूषण‘ पुरस्कार देण्यावरून विविध नेत्यांनी वक्तव्ये केली आहे. पत्रकार परिषदेत बोलताना विश्वास पाटील म्हणाले, ‘भालचंद्र नेमाडे हे माझ्या दृष्टीने साहित्य क्षेत्रातले दहशतवादी आहेत. नेमाडे शिवछत्रपतींबद्दल बोलतात हाच मोठा विनोद आहे. नेमाडेंनी शिवचरित्रावर, छत्रपतींच्या कार्याबद्दल समोरासमोर येऊन खुलेपणाने बोलावे. नेमाडे यांनी ज्ञानपीठाची शान ठेवावी. त्यांनी आमच्या सोबत खुली चर्चा करावी. ‘बाबासाहेबांनी कधीही स्वतःचा टेंभा मिरवला नाही. ते स्वतःला इतिहासकार नव्हे तर शिवशाहीर संबोधतात. बाबासाहेबांचा सन्मान हा मराठी मातीचा सन्मान आहे. बाबासाहेबांना पुरस्कार मिळू न देणे हा पुरस्काराचा आणि त्यांचा अवमान आहे. मात्र, यावेळी साहित्यिक मुग गिळून बसले आहेत. त्यांनी पुढे येऊन बोलावे. बाबासाहेबांना लक्ष केले जात आहे, बाबासाहेबांना सन्मान मिळू न देणे हे दुर्गप्रेमींचा अवमान आहे. बाबासाहेबांनी मराठ्यांसोबत ब्राह्मण फितुरांचाही उल्लेख केला आहे. जातिभेदाच्या द्वेषातून पुरंदरेंना विरोध करणे ही दुर्दैवी बाब आहे. पुरंदरेंनी हिंदुत्ववादी शिवाजी रंगवले असे म्हणणेही चुकीचे आहे. अमेरिकन लेखक जेम्स लेनच्या लिखाणाला पुरंदरेंची मदत नाही. लेनची गाढवावरून धिंड काढली पाहिजे.‘ असेही पाटील म्हणाले.