पुणे : मकरसंक्रातीनिमित्त पतंगोत्सव साजरा करताना उच्च आणि लघुदाबाच्या वीजवाहिन्या, रोहित्र, फीडर पिलर आणि वीजयंत्रणेपासून सावधगिरी बाळगावी, असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे.
प्रामुख्याने शहरी भागासह ग्रामीण भागातही महावितरण कंपनीच्या उच्च आणि लघुदाबाच्या वीजवाहिन्या, रोहित्र तसेच इतर वीजयंत्रणा अस्तित्वात आहेत. वीजवाहिन्या असलेल्या परिसरात नागरिक आणि लहान मुले पतंग उडवितात. अनेक पतंग या वीजवाहिन्यांमध्ये किंवा इतर यंत्रणेत अडकतात. वीजप्रवाह सुरु असलेल्या वाहिन्या, रोहित्रांमध्ये अडकलेले पतंग काढण्यासाठी जाणते अजाणतेपणी धोका पत्करला जातो. असा धोका पत्करल्यास विजेचा धक्का लागून अपघात होण्याची मोठी शक्यता आहे. याशिवाय अडकलेल्या पतंगाच्या मांज्यामुळे वीजवाहिन्यांमध्ये शॉर्टसर्किट होऊन वीजपुरवठा खंडित होतो व अपघात होऊ शकतो.
नागरिक आणि विशेषतः लहान मुलांनी वीजवाहिन्या तसेच वीजयंत्रणा असलेल्या परिसराऐवजी सुरक्षित आणि मोकळ्या मैदानात पतंगोत्सव साजरा करावा. पालकांनी याबाबत दक्ष राहून लहान मुलांना सुरक्षितपणे पतंग उडविण्याबाबत मार्गदर्शन करावे. तसेच पतंग उडविताना प्रत्येकाने सावध असावे. वीजप्रवाह असलेल्या वीजयंत्रणेपासून दूर अंतरावर पतंगोत्सव साजरा करावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.