सोलापूर – नेपाळ ला दहा हजार कोटी दिले देवू द्यात पण असेच दहा हजार कोटी येथील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिले असते तर इथले सारे प्रश्नच सुटले नसते काय ? असा सवाल करीत अगोदर आपल्या घरात काय जळत आहे ते पहा, ते पाहूनच शेजारधर्म हि पाळा असा सल्ला केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला येथून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला
सोलापूर येथील जिल्हा कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते . ते म्हणाले , ‘’नेपाळमध्ये भूकंप आल्यावर केंद्र सरकारने त्यांना दहा हजार कोटी रुपये दिले. शेजारच्या देशांना मदत जरूर करावी. परंतु आमच्या येथील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे काय? त्यांना वाऱ्यावर सोडून नेपाळला दहा हजार कोटी दिले. ऊस उत्पादकांसाठी दहा हजार कोटी दिले असते, तर येथील सर्वच प्रश्नच सुटले असते.
राज्यात आणि देशातही सत्तेत असलेल्या शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरेच सांगत आहेत की, सर्वत्र भ्रष्टाचार बोकाळलेला दिसतो आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी म्हणतात की, देशात आणीबाणीसारखी स्थिती आहे. या सरकारची लक्षणे काही ठीक दिसत नाहीत.
शिक्षणमंत्री विनोद तावडे इंजिनिअर असल्याचे सांगायचे. आता त्यांची डिग्रीच बोगस आहे. राज्याचे शिक्षणमंत्रीच जर बोगस डिग्री घेऊन फिरत असतील, तर आमच्या गोर-गरीबांच्या पोरांनी कुणाकडं बघावे. दिल्लीत मंत्र्याला बोगस डिग्रीमुळे शिक्षा होऊ शकते, मग महाराष्ट्रात का नाही? काही मंत्री तर इनशर्ट करतात आणि कमरेला पिस्तुल असल्याचे दाखवत फिरतात. मंत्री झाल्यावर पोलिस बंदोबस्त असतो, हे त्यांना बहुधा माहितीच नसावे.
देवेंद्र फडणवीस स्वत: नागपूरचे आहेत. नितीन गडकरीही नागपूरचे आहेत, ते तिकडे दिल्लीत बसलेत. गिरीश बापट पुण्याचे आहेत. तसे प्रकाश जावडेकर पण पुण्याचे आहेत. पण ग्रामीण भागाचा चेहरा असलेला नेताच यांच्याकडे नाही. एकनाथ खडसे ग्रामीण भागाचे नेते होते. पण तेही मंत्री झाल्यापासून काहीही बोलायला लागलेत. अरे विरोधी पक्षनेते असताना कसे बोलत होते आणि आता का असं वंगाळ वागायला लागलात? बाबांनो यांना ग्रामीण भागाशी काहीही देणे-घेणे नाही. शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्याची दानतच या युती सरकारमध्ये नाही.’’ असा आरोप हि यावेळी अजित पवार यांनी केला