तय्यबिया अनाथ गृहात प्रथमच दिवाळी साजरी ! राष्ट्रीय एकात्मता, सहिष्णुता वृद्धीसाठी प्रत्येक कृती महत्वाची : अन्वर राजन
पुणे :
“प्रबोधन माध्यम’ या संस्थेतर्फे “सर्वधर्मीय आणि कृतज्ञ दिवाळी’ या उपक्रमाचे यावर्षी तैय्यबिया अनाथगृहात (पुणे कॅम्प) येथे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचे हे पाचवे वर्ष आहे. . शनिवार, दिनांक 7 नोव्हेंबर 2015, रोजी सकाळी दिवाळीच्या “वसूबारस’ या पहिल्या दिवशी हा उपक्रम ईस्ट स्ट्रिट पुणे कॅम्प येथील तैय्यबिया यतिमखाना (ऑर्फनेज) मधील विद्यार्थ्यांसमवेत साजरा झाला.
तय्यबिया अनाथ गृह या 1909 साली स्थापन झालेल्या या अनाथ गृहात प्रथमच दिवाळी साजरी झाली.”प्रबोधन माध्यम’संस्थेचे हे तपपूर्ती वर्ष आहे
“देशात द्वेष आणि असहिष्णुतेचे वातावरण वाढत असताना सर्वधर्मियांना एकत्र आणणारी प्रत्येक कृती राष्ट्रीय एकात्मता आणि सहिष्णुता वृद्धीसाठी महत्वाची ठरणार आहे’, असे उद्गार ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि “महाराष्ट्र गांधी स्मारक निधी’चे सचिव अन्वर राजन यांनी काढले.
ते म्हणाले, “सर्व धमियांचे सण पूर्वी एकत्र साजरे होत असत, घरोघरी फराळ पोहोचवला जात असे. पुण्यातल्या मध्यवस्तीत नाना पेठे सारख्या ठिकाणी आठ धर्मांची प्रार्थना स्थळे आहेत आणि सर्वजण गुण्या गोविंदाने राहात आहेत. सर्व धर्मियांनी एकमेकांचे सण एकत्र साजरे केले तर एकात्मता वृद्धीस लागेल. त्यादृष्टीने “प्रबोधन माध्यम’चा हा उपक्रम महत्वपूर्ण आहे.’
यावेळी अन्वर राजन, शिक्षण मंडळाच्या माध्यमातून उर्दू शाळांच्या आधुनिकीकरणासाठी निर्णय घेणारे मंडळाचे तत्कालीन अध्यक्ष रवी चौधरी, युवक क्रांती दलाचे कार्यवाह संदीप बर्वे, “प्रबोधन माध्यम’चे संस्थापक दीपक बिडकर, संचालक गौरी बिडकर, “तय्यबिया अनाथ आश्रमा’चे मुख्याध्यापक वाहिद बियाबानी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना दिवाळी फराळ व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी सारीका रोजेकर, सचिन सुर्यवंशी, जयदीप कोकीळ व गायत्री कोकीळ उपस्थित होते.
दिवाळी हा आनंदाचा कृतज्ञतेचा सण आहे. त्यात सर्व धर्मियांना, सर्व समाज घटकांना सहभागी करून घ्यावे या उद्देशाने या विशेष उपक्रमाचे आयोजन सलग चार वर्षापासून केले जात आहे. या उपक्रमातंर्गत आत्तापर्यंत गरीब, अनाथ विद्यार्थी, कचरावेचक, काश्मीरमधील विद्यार्थी, मदरसामधील विद्यार्थी, वृत्तपत्र विक्रेते, बॅक स्टेज आर्टीस्ट, सामाजिक कार्यकर्ते आदी समाजातील विविध घटक सहभागी झाले आहेत.