मुंबई
महाराष्ट्रात जनतेचे सरकार आले आहे. आता झोपडपट्टीवासियांच्या समस्या प्राधान्याने सोडवल्या जातील. याबाबत मी, स्वतः जातीने लक्ष घालणार आहे. मुंबईतील रखडलेल्या योजनांना गती देण्याकरिता पंधरा दिवसातून दोन वेळा एसआरए प्राधिकरणाच्या कार्यालयात जावून झोपडपट्टीवासियांच्या घरांचा प्रश्न कायमचा मार्गी लावू असे ठाम आश्वासन पर्यटन, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता आणि महिला व बालकल्याण मंत्री श्री. मंगलप्रभात लोढा यांनी दिले. दादर वसंत स्मृती येथे मुंबई भारतीय जनता पार्टी झोपडपट्टी मोर्चाच्या वतीने आयोजित कार्यकर्ता संमेलनात ते शनिवारी बोलत होते. संमेलनात ‘झोपडपट्टी समस्या निवारण’ पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
मंत्री श्री. मंगलप्रभात लोढा म्हणाले, ‘झोपडपट्टी समस्या व निवारण’ हे पुस्तक मार्गदर्शक ठरेल. भारतीय जनता पार्टी नेहमीच झोपडपट्टीवासियांसोबत आहे. आपले सरकार अन्याय विरोधात लढणारे आहे. आता झोपडपट्टीतील कुणावरही अन्याय होऊ देणार नाही अशी ग्वाही मंत्री श्री. मंगलप्रभात लोढा यांनी दिली.
खासदार गोपाळ शेट्टी म्हणाले, आपल्या समस्या सोडवण्यासाठी झोपडपट्टीधारकाने कागदपत्रांची पूर्तता करावी. पेपरवर्क अत्यंत महत्त्वाचे आहे. एसआरएची स्थिती बिघडली आहे. येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणात संघर्ष करावा लागणार आहे असेही ते म्हणाले. गेल्या ३५ वर्षांत झोपडपट्टीधारकांसाठी केवळ २ लाख ९० हजार घरे झाली आहेत. १५ लाखांपेक्षा जास्त लोक झोपडपट्टीत राहतात. त्यांच्यासाठी कायदा असूनही प्रश्न सुटलेले नाहीत. सरकारचे काम लोकांना घर देणे आहे. मात्र, त्याकडे साफ दुर्लक्ष केले जाते. यापुढे आपल्या समस्या सोडवण्यासाठी झोपडपट्टीतील प्रत्येकाने स्वतःला झोकून देऊन काम करावे असे आवाहन खासदार गोपाळ शेट्टी यांनी केले.
मुंबई भाजपा उपाध्यक्ष, अमरजीत सिंह, आचार्य पवन त्रिपाठी, भाजप मुंबई सचिव व राष्ट्रीय ओबीसी मोर्चा सदस्य प्रतिक कर्पे यांनी मनोगत व्यक्त केले. झोपडपट्टी मोर्चा मुंबईचे अध्यक्ष आर. डी. यादव यांनी प्रास्ताविक केले. धनंजय कोळकर, योगेश खेमकर, दयाशंकर यादव आदी उपस्थित होते. महामंत्री सुरेश पाल यांनी सूत्रसंचालन केले.