पुणे- प्रख्यात कॉस्मेटॉलॉजिस्ट डॉ. गौरांगी श्रावत यांनी गेल्या आठवड्यात हयात पुणे हॉटेलमध्ये अत्यंत दिमाखात झालेल्या ‘मिसेस इंडिया – एम्प्रेस ऑफ द नेशन २०१८’ या प्रतिष्ठेच्या सौंदर्य स्पर्धेत सम्राज्ञीपदाचा मुकूट पटकावला आहे. त्वचेची निगा हे डॉ. गौरांगी यांचे कौशल्य क्षेत्र असल्याने त्यांनी या स्पर्धेत ‘मिसेस ब्युटिफुल स्किन’ हा किताबही सहज प्राप्त केला आहे.
डॉ. गौरांगी या एम.डी. असून पुण्यातील सॅलिस्बरी पार्कमधील ‘स्किनवर्क्स’ या त्वचा, केस व लेझर क्लिनिकच्या संस्थापक आहेत. पुण्यातील बीव्हीपीएमसी महाविद्यालयातून वर्ष २०१० मध्ये पदवी संपादन केल्यानंतर त्यांना विशेष ज्ञानशाखेत विस्तार करायचा होता. यासंदर्भात त्यांनी सांगितले, की “मी त्वचारोगशास्त्र (डरमॅटॉलॉजी) हा विषय निवडला, कारण मला हे क्षेत्र अद्भुत, प्रचंड सुप्त संधी असणारे वाटलेच, पण आणखीही एक प्रेरणादायी घटक त्यामागे होता. माझ्या रुपवान आईचे तिच्या तरुण वयात मीरत शहरात स्वतःचे भरभराटीला आलेले सलून होते, जेथे ती महिलांना सौंदर्यवर्धनाचे मार्गदर्शन करत असे. मी गेली ३ वर्षे सुपर-स्पेशॅलिस्ट म्हणून माझ्या कौशल्याला पैलू पाडत होते. मास्टर्स डिग्री घेतल्यानंतर मी कॉस्मेटॉलॉजी या क्षेत्रात पदार्पण केले.”
सौंदर्य स्पर्धेत घवघवीत यश संपादन करुन सम्राज्ञीपदाचा मुकूट जिंकण्याच्या कामगिरीबद्दल बोलताना हा प्रसंग आपले जीवन बदलून टाकणाऱ्या क्षणांपैकी एक असल्याचे आणि त्याने बाह्य जगाकडे बघण्याच्या आपल्या दृष्टीकोनात परिवर्तन घडवल्याचे डॉ. गौरांगी यांनी मान्य केले. त्या म्हणाल्या, “मी केवळ माझ्या करिअरवर लक्ष केंद्रित केले असतानाच्या काळातच मिसेस इंडिया सौंदर्य स्पर्धेची संधी समोर चालून आली. या स्पर्धेने मला तत्काळ नाव आणि प्रसिद्धी मिळवून दिलीच, पण आघाडीच्या कॉस्मेटॉलॉजिस्ट असा गौरवही प्राप्त करुन दिला. मी मेराकी सलूनच्या सह-संस्थापक नलिनी धीर यांचेही खूप आभार मानते, ज्यांनी मला स्पर्धेत भाग घेण्यासाठी उत्तेजन दिले.”
त्या पुढे म्हणाल्या, “या सौंदर्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत देशभरातील आणि विविध क्षेत्रांतील ३२ लावण्यवती महिलांनी आपल्यातील सौंदर्य, आरोग्य व बुद्धिमत्तेच्या पैलूंचा आविष्कार घडवला. त्या केवळ एकमेकींशीच स्पर्धा करत नव्हत्या तर आपल्यातील चैतन्याचाही शोध घेत होत्या. मी ज्यात भाग घेत होते त्या उपक्रमाचा आवाका लक्षात आल्यावर मलाही त्या चैतन्य किरणांचा स्पर्श झाला,” असे डॉ. गौरांगी म्हणाल्या.
“पण मी माझ्या यशाचे श्रेय निःसंशय माझ्या २ गुरूंना देते. या दोन व्यक्ती, ज्यांनी आम्हाला त्यांच्या प्रेमळ पंखाखाली घेऊन मार्गदर्शन केले, त्या आमच्यातील प्रत्येक स्पर्धकाच्या आयुष्यभर आठवणीत राहतील. हे दोन गुरू म्हणजे अंजना (आंतरराष्ट्रीय सौंदर्य स्पर्धा प्रशिक्षक) आणि डिवा सौंदर्य स्पर्धेचे कार्ल मस्कारेन्हास. या महान व्यक्तींनी आम्हाला केवळ आपल्यातील सर्वोत्तम गुणांचे मंचावर व जीवनात प्रदर्शन करायला शिकवले नसून आम्ही जीवनात जोडीदारासमवेत कोणती ध्येये आखून घ्यायची, याचेही मार्गदर्शन केले. खरंतर हा दुसरा टप्पा त्यांच्या योजनेचा भाग नव्हता. म्हणूनच माझ्यासाठी ते नेहमीच गुरु-संगोपनकर्ते-मार्गदर्शक राहतील.” या शब्दांत त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
मुख्य कार्यक्रमाआधीचे चार दिवस मिळालेल्या या प्रशिक्षणातूनच डॉ. गौरांगी यांना त्यांच्यातील सुप्त सामर्थ्याची जाणीव झाली. ही खरोखर यंदाची सर्वांत मोठी सौंदर्य स्पर्धा होती. पुण्यातील नामवंत व्यक्ती या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. परीक्षक मंडळात मिस वर्ल्ड १९९९ स्पर्धा विजेत्या युक्ता मुखी, मिसेस वर्ल्ड २००१ स्पर्धा विजेत्या अदिती गोवित्रीकर, प्रख्यात गायिका शिबानी कश्यप, मिसेस टुरिझम २००५ विजेत्या सोनल चौहान आणि प्रसिद्ध अभिनेता शरहान सिंग यांचा समावेश होता, तर विजय अरान्हा, सुमित कुमार (हयात पुणेचे सरव्यवस्थापक), सौ. सपना आनंद छाजेड, डॉ. अक्षया जैन व कार्ल मस्कारेन्हास या मान्यवरांचीही त्यांना साथ लाभली. लोकप्रिय दूरचित्रवाणी अभिनेता अमन वर्मा याने त्याच्या दिमाखदार आणि उत्कृष्ट शैलीत सूत्रसंचालन करुन आमंत्रित प्रेक्षकवर्गाला मंत्रमुग्ध केले.
“स्पर्धेच्या अंतिम फेरीत विचारलेला प्रश्न माझ्या अंतःकरणाला भिडणारा होता. तो म्हणजे सौंदर्य स्पर्धा जिंकण्याबाबत तुम्ही गंभीर असाल तर त्यासाठी मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे, असे तुम्हाला वाटते का. यावर माझे उत्तर होते. होय. असे प्रशिक्षण हा खरोखर सौंदर्य स्पर्धेचा अत्यंत महत्त्वपूर्ण भाग आहे, कारण डिवा सौंदर्य स्पर्धेने पुरवलेल्या प्रशिक्षणानंतर माझ्यातच झालेला बदल मी अनुभवते आहे. अर्थात हे सगळे शक्य झाले ते माझ्या पतीच्या, डॉ. भक्ती सारंगी यांच्या आणि माझ्या प्रेमळ कुटूंबाच्या पाठिंब्यामुळेच. स्पर्धेचा हा प्रवास भारावून टाकणारा होता आणि त्यानेच मला आजची ताकदवान, आत्मविश्वासू आणि चैतन्यपूर्ण महिला घडवले आहे,” या शब्दांत डॉ. गौरांगी यांनी समारोप केला.