नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच सोशल मीडिया सोडण्याच्या विचारात आहेत. आज (2 मार्च) सोमवारी संध्याकाळी पंतप्रधानांनी एक आश्चर्यकारक ट्विट केले. येत्या रविवारपासून मी सोशल मीडिया सोडणार असल्याचे या ट्विटमध्ये सांगितले आहे. यामुळे सोशल मीडियावर मोठी खळबळ माजली आहे. दरम्यान मोदीजी ट्विटर नाही तर द्वेष सोडा असा सल्ला काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिला आहे. फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब ही सोशल मीडिया अकाउंट येत्या रविवारपासून बंद करण्याचा माझा विचार आहे, असं मोदींनी ट्विटमध्ये म्हटलंय. यामुळे सर्वत्र वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. मोदींचे ट्विटरवर ५३.३ मिलिअन फॉलोअर्स आहेत. फेसबुकवर ४४, ५९७, ३१७ जण त्यांना फॉलो करतात. तर इन्स्टाग्रामवर त्यांचे ३५.२ मिलिअन फॉलोअर्स आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकीय यशात सोशल मीडियाचा मोठा वाटा आहे. गुजरातचे मुख्यमंत्री ते देशाचे पंतप्रधान ह्या वेगवान राजकीय प्रवासात सोशल मीडियाची त्यांना मोठी मदत झाली. राजकीय विश्लेष सोशल मीडियावरील त्यांच्या सक्रियतेलाही महत्त्वाचे मानतात. गुजरातचे मुख्यमंत्री असताना सोशल मीडियावरून त्यांची लोकप्रियता वाढली होती. सोशल मीडियावरील मोदींची वाढती लोकप्रियता पाहून अनेक नेत्यांना सोशल मीडियाची वाट धरली. लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीवेळी उमेदवारांची नावांची घोषणाही सर्व राजकीय पक्ष सोशल मीडियावरच करतात.