पुणे : वृद्धापकाळात भेडसावणाऱ्या एकटेपणा व स्मृतिभ्रंशाच्या समस्येवर मात करण्यासाठी कल्पक कार्यपुस्तिकेची निर्मिती करणाऱ्या माया देशपांडे लिखित ‘स्मृती वर्धन’ या पुस्तकाचे प्रकाशन गुरुवारी झाले.
कोथरूडमधील गोकुळ हॉल येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पुस्तकाचे प्रकाशन डॉ. रोहिणी पटवर्धन, डॉ. श्रुती पानसे, प्रकाशक सतीश पुरंदरे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.
माया देशपांडे या सुमारे ३५ वर्षे बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये कार्यरत होत्या. वृद्धापकाळात एकटेपणा जाणवू नये व विस्मरणाचा धोका टळावा यासाठी त्यांनी हे पुस्तक लिहिले आहे. लेखनाविषयी बोलताना माया देशपांडे म्हणाल्या, वृद्धावस्थेत अनेकांना स्मृतिभ्रंशाच्या समस्येला सामोरे जावे लागते. या समस्येवर मात करण्यासाठी मेंदूला कार्यरत ठेवावे लागते. हे पुस्तक या दृष्टीने प्रत्येकास उपयुक्त ठरणार आहे.
वृद्धांसाठीच्या अभिवन कल्पनेचे कौतुक करून डॉ. रोहिणी पटवर्धन म्हणाल्या, मन आणि शरीर ही आयुष्याची दोन चाके आहेत. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर त्याचे स्वरूप बदललेले असते. यातील एक चाक जरी बिघडले तरी त्याचा परिणाम आयुष्यावर होतो. बाल, तरुणांच्या मानसशास्त्राप्रमाणे वृद्धांचेही मानसशास्त्र आहे, त्याकडेही आवर्जून लक्ष दिले गेले पाहिजे.
डॉ. श्रुती पानसे यांनी मेंदूची कार्यपद्धती सोप्या रीतीने समजावत त्याला सतत खाद्य पुरवले तर विस्मरणाचा धोका टळू शकतो, व हे पुस्तक त्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरेल असे सांगितले. सतीश पुरंदरे यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंजली वैशंपायन यांनी केले तर आभार अंजली मुळे यांनी मानले. मान्यवरांचा सत्कार माया देशपांडे, सीमा पेशवा, अंजली मुळे यांनी केला.

