पुणे – कोविड प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतल्यानंतरही कोविडची बाधा होणे, त्यात मृत्यू होणे असे प्रकार घडत आहेत. त्याची माहिती संकलित करुन राज्य सरकारने त्यावर अभ्यास करावा अशी सूचना आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी केली.
राज्याचे उपमुख्य मंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोविड आढावा बैठक आज (शनिवारी) घेण्यात आली. त्यातील चर्चेत आमदार शिरोळे यांनी काही सूचना सरकारला केल्या. कोविड प्रतिबंधासाठी लसीकरण अत्यंत आवश्यक आहे. परंतु, दोनदा लस घेऊनही काही लोकं आजारी पडल्याची, काहींचे मृत्यूही झाल्याची उदाहरणे समोर आली आहेत. समाजातील सर्वच घटकात हा प्रकार घडलेला आहे प्रशासनातील काही वरीष्ठ अधिकारी, डॉक्टर्स यांचाही आजारी पडलेल्र्यांमध्ये समावेश आहे. लसीकरणानंतरही असे प्रकार घडत अल्यामुळे समाजात शंका व्यक्त केल्या जातात. याकरिता महाराष्ट्रातील अशा रुग्णांचा तपशील गोळा करुन वैद्यकीयदृष्ट्या त्या प्रकरणांचा अभ्यास केला जावा. त्यातून येणारे निष्कर्ष लक्षात घेऊन उपाययोजना केल्या जाव्यात, जेणेकरुन लोकांमधील शंकाही दूर होतील असे आमदार शिरोळे यांनी बैठकीत बोलताना सांगितले.
विविध पातळ्यांवर कोविडच्या तिसऱ्या लाटेची शक्यता व्यक्त केली जात आहे. पहिल्या दोन लाटांचा अनुभव लक्षात घेऊन जंबो हॉस्पिटल आणि कोविड सेंटर्स बंद करण्याची घाई केली जावू नये, असेही आमदार शिरोळे यांनी सांगितले.
मुंबईतील एका हौसिंग सोसायटीमध्ये कोविडची बोगस लस दिल्याचा प्रकार आढळून आला आहे. अन्य शहरातही असे बोगस लस दिल्याचे प्रकार घडू शकतात. सरकारने वेळीच सावध होऊन दक्षता घ्यावी. त्याकरिता कडक उपाययोजना केल्या जाव्यात, अशी मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी केली.
कोवॅक्सीन लस घेतलेल्या विद्यार्थ्यांना विदेशी जाण्यात अडचणी येत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) कोवॅक्सीन लसीलाही मान्यता देण्याची गरज आहे, तरच हा तिढा सुटू शकतो. डब्ल्यूएचओकडून कोवॅक्सीनला परवानगी मिळावी यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करीत आहे. राज्य सरकारनेही त्याकरिता केंद्राकडे पाठपुरावा करावा असे आमदार शिरोळे म्हणाले.
भुयारी मार्गाचे काम लवकर सुरु व्हावे
पंचवटी ते सेनापती बापट रस्ता आणि पंचवटी ते कोथरूड यासाठीच्या भुयारी मार्ग प्रस्तावावर उपमुख्य मंत्री पवार यांच्याशी चर्चा करण्यात आली. या मार्गाचा अंतिम आराखडा डिसेंबर महिन्यापर्यंत तयार केला जाईल आणि जानेवारी २०२२ मध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल असे आश्वासन उपमुख्यमंत्री पवार यांनी आमदार शिरोळे यांना दिले.
होम स्टे (घरगुती निवास), होम किचन (घरगुती उपहारगृह) यांना
सरकारने प्रोत्साहन द्यावे
राज्य सरकारने होम डायनिंग आणि होम किचन (घरगुती भोजनालय) या व्यवसायाला प्रोत्साहन द्यावे अशी मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी केली आहे.
राज्याचे उपमुख्य मंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पर्यटन विभागाची बैठक आज (शनिवारी) झाली. या बैठकीत आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी सहभाग घेतला. कोविडची साथ, टाळेबंदी, निर्बंध अशा कारणांमुळे पर्यटन व्यवसाय मंदावला आणि त्या कारणाने पर्यटन स्थळांपासची घरगुती भोजनालये आणि त्यावर अवलंबून असणारी असंख्य कुटुंब आर्थिक संकटात सापडली आहेत. याकरिता राज्य सरकारने पर्यटन स्थळे, किल्ले अशा ठिकाणच्या होम स्टे (घरगुती निवास), होम किचन (घरगुती उपहारगृह) अशा व्यवसायांना प्रोत्साहन द्यायला हवे तरच या व्यवसायातील कुटुंब सावरतील. याकरिता राज्य सरकारने या व्यावसायिकांना परवाने देण्याची पद्धत सोपी करावी अशी सूचना आमदार शिरोळे यांनी उपमुख्य मंत्री अजित पवार यांना केली.तसेच, राज्य सरकारच्या पर्यटन महामंडळाच्या रिसॉर्टचे खाजगी सहभागातून (प्रायव्हेट सेक्टर) नूतनीकरण करावे असा प्रस्ताव आमदार शिरोळे यांनी मांडला.