पुणे-कोपर्डीतील हत्याकांड अमानवी आहे. कोपर्डी प्रकरण पुरोगामी महाराष्ट्राला लागलेला डाग आहे. परंतु आता कथित संत भैय्यू महाराज कोपर्डीत पीडितेचे स्मारक उभे करत आहे. परंतु स्मारके हे शौर्याचे व पराक्रमाची आठवण करून देणारी असतात. कोपर्डीत जे घडले ते पाहून प्रत्येक माणसाची मान शरमेने खाली गेली आहे. म्हणून अशा प्रसंगाचे स्मारक उभारून माणुसकीला काळीमा फासण्याचे काम भैय्यू महाराज यांनी करू नये, असे सांगत कोपर्डीत निर्भयाच्या उभारल्या जाणा-या स्मारकाचा संभाजी ब्रिगेडने तीव्र निषेध केला.
कोपर्डी घटनेला उद्या एक वर्ष पूर्ण होत आहे. घटनेच्या निषेधार्थ व निर्भयाच्या त्यागाला संभाजी ब्रिगेडच्या वतीने झाशीची राणी चौक, बालगंधर्व येथे श्रद्धांजली सभा व कँडल मार्च काढण्यात आला. यावेळी एक ज्योती निर्भयासाठी… म्हणत कँडल पेटवून श्रद्धांजली देण्यात आली. यावेळी संभाजी ब्रिगेडचे विकास पासलकर, संतोष शिंदे, प्रशांत धुमाळ, सुरेखा जुजगर, संजय चव्हाण, सचिन कदम, मयूर शिरोळे, महाडिक, अक्षय शिंदे, तन्मय गोरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते
यावेळी कोपर्डीत स्मारक बांधून कुणासाठी आदर्श निर्माण करायचा आहे…? हे तपासले पाहिजे. याला चळवळीतील कार्यकर्ता व जागृत व्यक्ती म्हणून तीव्र विरोध करण्यात आला. जिजाऊ, सावित्री, अहिल्याच्या महाराष्ट्रात ‘स्त्री स्वातंत्र्याला’ मिळणारा सन्मान हा या सध्याच्या वासनांध व विकृत घटनेने मोडकळीस आलेला आहे. विकृत पुरुषी मानसिकता ठेचून काढली पाहिजे. हे या घटनेने दाखवून दिले. म्हणून अशा नराधमांना तात्काळ फाशीच दिली पाहिजे, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. तसेच कोपर्डी प्रकरण जलदगती न्यायालयात चालवून आरोपींना कठोर शासन करू, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते. मात्र, वर्ष झाले, या विरोधात लाखोचे मोर्चे महाराष्ट्रभर निघाले परंतु सरकारवर याचा काहीही परिणाम झालेला नाही. याचाही संभाजी ब्रिगेडच्या वतीने निषेध करण्यात आला.