जोधपूर– काळवीट शिकार प्रकरणी दोषी ठरलेल्या सलमान खानला सेशन्स कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. 50 हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर न्यायमूर्ती रवींद्रकुमार जोशी यांनी सलमानला जामीन मंजूर केला आहे. गुरुवारपासून जोधपूर मध्यवर्ती कारागृहात असलेला सलमान आज संध्याकाळपर्यंत बाहेर येण्याची शक्यता आहे.
कांकाणी गावातील काळवीट शिकार प्रकरणी दोषी ठरलेल्या सलमान खानच्या जामीन अर्जावर आज सत्र न्यायालयात सुनावणी झाली. बचाव पक्ष आणि सरकारी पक्षाचा युक्तीवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायमूर्ती जोशी यांनी दुपारी 3 पर्यंत निर्णय राखून ठेवला होता. जज रवींद्र जोशी यांनी दुपारी तीन वाजता जामीन मंजूर केला. दरम्यान, सकाळी 10.30 वाजता न्यायालयाबाहेर त्याची बहिण अलवीरा आणि बॉडीगार्ड शेरा हजर होते. सलमानच्या जामीन अर्जावर सुनावणी करणारे न्यायाधीश रवींद्र जोशी यांच्यासह राजस्थान मधील 87 न्यायाधीशांची शुक्रवारी रात्री बदली झाली. यामुळे शनिवारी सलमानच्या अर्जावर सुनावणी होणार की नाही, यावर तर्क-वितर्क सुरु होते. शनिवारी सकाळी न्यायाधीश जोशी कोर्टात पोहोचले आणि सर्व चर्चेला पूर्णविराम मिळाला. शुक्रवारी सलमानच्या जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण होऊ शकली नव्हती. जिल्हा आणि सत्र न्यायाधीश रवींद्र जोशी यांनी ट्रायल कोर्टचे रेकॉर्ड मागवले होते. ट्रायल कोर्टने सलमानला गुरुवारी काळवीट शिकार प्रकरणी दोषी ठरवत 5 वर्षे कैद आणि 10 हजार रुपये दंड ठोठावला होता.
कोर्टरूमध्ये काय झाले?
– सलमानचे वकील महेश बोडा म्हणाले, 20 वर्षांपासून हा खटला सुरु असून सलमान जामीनावर बाहेर होता. त्याने नेहमीच कोर्टाचा आदर केला आहे, जेव्हा सांगितले तेव्हा सुनावणीला हजर झाला होता. त्यामुळे त्याच्या जामीन अर्जाचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा.
– त्यावर सरकारी वकील पोकरराम यांनी म्हटले, की साक्षीदार आणि पोस्टमॉर्टम रिपोर्टने स्पष्ट झाले आहे की सलमानने गोळी मारुन काळविटाची शिकार केली. त्याच आधारावर ट्रायल कोर्टाने त्याला दोषी ठरवले आहे. तेव्हा त्याला जामीन देऊ नये.
– दुसरीकडे, बिष्णोई समाजाचे वकील महिपाल बिष्णोई म्हणाले, सलमानविरोधात आरोपी निश्चित झाले आहेत. त्यामुळे त्याच्या जामीनावर सुनावणी करण्याऐवजी तुरुंगात ठेवण्यावर लवकर सुनावणी केली पाहिजे. त्याच्या विरोधात ठोस पुरावे आहेत. पुराव्यांच्या आधारावर यापुढेही त्याला दोषीच ठरवले जाईल.