महिला, शालेय विद्यार्थी, कामगार संघटना, वारकरी आणि साहित्यिक सहभागी
दिंडीचे पूजन संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस, स्वागताध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील
आणि पिंपरी-चिंचवडच्या महापौर शकुंतला धराडे यांच्या हस्ते
दिंडीच्या माध्यमातून ११ कोटी मराठी बांधवांना संमेलनाध्यक्षांचे निमंत्रण
ग्यानबा तुकाराम साहित्य नगरी, पिंपरी, पुणे ता. १५: उद्योगनगरी असणार्या पिंपरी-चिंचवडमध्ये ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची अधिकृत सुरूवात भव्य अशा ग्रंथदिंडीने गुरुवारी दुपारी झाली. त्यामध्ये महिला, शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनी, आळंदी आणि देहूतील वारकरी तसेच साहित्यिक मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. दिंडीतील ग्रंथांचे पूजन संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस, स्वागताध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य, अमेरिकन दुतावासातील ज्येष्ठ अधिकारी व विचारवंत ज्ञानेश्वर मुळे, तसेच पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महापौर शकुंतला धराडे, संमेलनाचे समन्वयक सचिन इटकर आणि भारतीय जनता पक्षाचे खासदार अमर साबळे यांच्या उपस्थितीत झाले.
विविध ग्रंथांनी सजलेल्या दिंडीतील पालखीत ‘सकलसंत गाथा’ हा सर्व संतांच्या रचनांचा प्रातिनिधिक ग्रंथ, देशाच्या संविधानाची प्रत, महात्मा फुले, अण्णाभाऊ साठे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे ग्रंथांचा या ग्रंथदिंडीत समावेश करण्यात आला होता. उपस्थितांमध्ये संत साहित्याचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे, तसेच महामंडळाचे कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनिल महाजन, संमेलन निधीच्या विश्वस्त डॉ. कल्याणी दिवेकर इत्यादी मान्यवरही उपस्थित होते
पुणे-मुंबई महामार्गावरील पिंपरी चौकात असणार्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून ही दिंडी महामार्गाने पिंपरीत वल्लभ नगर आणि संत तुकाराम नगरमार्गे संमेलनस्थळी पोचली. तुतारीच्या निनादात निघालेल्या या दिंडीत शेकडो अब्दागिर्या, केशरी फेटा आणि पारंपरिक पोषाख केलेले तरुण तरुणींचा समावेश होता. ढोल ताशा पथके, महिलांचे पारंपरिक खेेळ, तलवारबाजीची थरारक प्रात्यक्षिके, चित्ररथ, पर्यावरण दिंडी, श्री. मोरया गोसावी भक्ती मंडळ, ज्ञानदीप विद्यालय भजनी मंडळाचे कार्यकर्ते ‘ग्यानबा तुकारामा’च्या घोषात संमेलनस्थळी निघाले. सुमारे ४ किलोमीटरची ही दिंडी संमेलनस्थळी पोचल्यावर संमेलनाच्या बोधचिन्ह असलेला ध्वजारोहणाचा समारंभही झाला. हे ध्वजवंदन महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य आणि स्वागताध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील यांच्या हस्ते झाले.
ग्रंथदिंडीच्या आरंभी संमेलनाध्यक्ष डॉ. सबनीसांनी मराठी भाषा आणि साहित्याची उज्वल आणि अभिमानास्पद परंपरेचा गौरव केला. मराठी माणसाला अभिमान वाटेल असे या दिंडीचे आणि संमेलनाचे आयोजन करणार्या स्वागताध्यक्ष डॉ. पाटील आणि समन्वयक इटकर यांचे त्यांनी अभिनंदन केले.
दिंडीबद्दलच्या मनोगतात डॉ. सबनीस म्हणाले की, सर्वार्थाने वैभवशाली असा हा सोहळा भक्तीने रंगलेल्या भूमीत रंगला आहे. ज्ञान, साहित्य आणि भक्तीचा त्रिेवेणी सन्मान यानिमित्ताने होत आहे. सर्व धर्म, जाती आणि पंथ जोडणार्या मराठी भाषेची ताकदच यातून प्रतित होताना दिसते आहे. आपण सर्व एक आहोत याची अनुभूती या दिंडीच्या माध्यमातून होते. अशा मंगलमय वातावरणात महाराष्ट्रातील ११ कोटी मराठी बांधवांना मी संमेलनाचे निमंत्रण देत आहे. संमेलनात वाद हे होतात- पण संवादी भूमिका, सौंदर्य आणि सत्य या शाश्वत मूल्यांच्या मिलाफातून ते आपण पार पाडूयात, असा सकारात्मक संदेशही संमेलनाध्यक्षांनी दिला.