पुणे-“मृत्यु हे जगण्याचे प्रमाणपत्र आहे. जीवन कसे जगला आहात हे जर समजायचे असेल तर मृत्युवरून समजते की माणसाने कसे आयुष्य जगले असेल. जगात मृत्यु नसेल तर काय झाले असते? ही वृद्धावस्त, होणारा त्रास किती वेळा पर्यंत सहण करत बसले असते. मृत्यू हा शाप नाही तर वरदान आहे. जर मृत्यु आयुष्यात नसेल तर हे आयुष्य निरर्थक आहे. मृत्यु अटळ आहे, जो या जगात आला आहे तो एक ना एक दिवस जाणार आहे. राजा असो, गुरू असो, चेला असो की अजून कोणी असो त्याला या जगातून एक ना एक दिवस जावच लागणार आहे, हे लक्षात घेऊन मृत्यू बद्दलचे भय काढून टाका. मृत्यू नंतर सगळेजण हळहळले पाहिजेत, असे चांगले कार्य जीवंत असताना करा.” असा संदेश मुनिश्री पुलकसागर महाराज यांनी दिला.
सकल जैन वर्षा योग समितीतर्फे मुनिश्रींच्या चातुर्मासाचे आयोजन धर्मानुरागी रसिकलाल एम. धारिवाल नगरी, महालक्ष्मी लॉन्स येथे सुरू आहे. यावेळी ज्ञानगंगा महोत्सवात प्रवचनाचे तेरावे पुष्प गुंफतांना ‘यमराज की चिट्टी’ या विषयावर ते बोलत होते. याप्रसंगी समितीच्या अध्यक्षा शोभा धारिवाल, कार्याध्यक्ष मिलिंद फडे, अजित पाटील, सुजाता शहा, जितेंद्र शहा, वीरकुमार शहा, संजीव नाईक, सुदिन खोत, सुरेंद्र गांधी आदी मंचावर उपस्थित होते. तसेच पुण्याचे माजी महापौर व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे, उदयपूरचे फादर राणा आणि माजी नगरसेवक श्याम मानकर यांनी याप्रसंगी उपस्थित राहुन मुनिश्रींच्या प्रवचनाचा लाभ घेतला. कार्यक्रमाच्या सुरवातीस राजीव शहा यांच्या हस्ते कलशस्थापना करण्यात आली. पादप्रक्षालण पुलकसखी ग्रुपच्या महिलांनी केले. मार्केटयार्ड येथील वैष्णवी भूषण शहा ग्रुपतर्फे मंगलाचरण सादर करण्यात आले. यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. स्वागत व प्रास्ताविक कार्याध्यक्ष मिलिंद फडे यांनी केले. मुनिश्रींच्या प्रवचनाचे थेट प्रक्षेपण जिनवाणी वाहिणीवरून केले जाते.
मुनिश्रीं प्रवचनात पुढे म्हणाले, समजा तुम्ही अमर झालात तर कसे जगणार, मृत्युची वाट तर पाहाल ना. मृत्यु या पृथ्वी तलावावर नसता तर किती दिवस वृद्धपकाळ, आजार घेऊन फिरला असतात. हा वृद्धपकाळ हा तुम्हाला ओझं बनला असता. जर मृत्यु नसता तर दुःखापासून तुमची मुक्ती पण झाली नसती. मृत्यु वाईट गोष्ट नाही तर चांगली गोष्ट आहे. ज्या प्रकारे मोबाईलची बॉडी खराब झाली तर आपण मोबाईल फेकून न देता त्याची नवीन बॉडी टाकून घेतो. त्याप्रमाणे मृत्यु देखील हेच काम करत असतो. जून्या बॉडीला सोडून नव्या बॉडीला अंगी कारत असतो. त्यामुळे मृत्यु ही चांगली गोष्ट आहे. जीवनात पद मिळो ना मिळो, धन मिळो ना मिळो, मोठे बनून मोठे व्यक्ती बनो ना बनो, जगात काही मिळो ना मिळो पण मात्र मृत्यु जरून येणार आहे. याची जाणीव मनी बाळगावी असे मुनिश्री यांनी सांगितले.
माजी महापौर व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी मुनिश्रींना श्रीफळ अर्पण करून आशिर्वाद घेतले. याप्रसंगी ते म्हणाले, मुनिश्रींचे दर्शन घेऊन मी खूप प्रसन्न झालो आहे. छत्रपती शिवाजी महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज यांच्या या भूमित मी मुनिश्री पुलकसागर महाराजांचे मनापासून स्वागत करतो. पुढच्या महिन्यात गणेश उत्सव आहे पुण्याचेच नव्हे तर सार्या महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असणार्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती येथे आपण आवर्जून यावे अशी आग्रहाची विनंती त्यांनी मुनिश्रींना केली.
उदयपूरवरून आलेले फादर राणा याप्रसंगी म्हणाले, मी दुसर्यांदा पुणे येथे आलो आहे. मुनिश्रींना ऐकणे मी माझे भाग्य समजतो. पुलकसागरजी या युगाचे क्रांती पुरूष आहेत. मी जगात सगळीकडे प्रवचन देत असतो. आज पर्यंत मी 500 प्रवचन दिले आहेत. परंतु आज मला मुनिश्रींना ऐकण्याची संधी मिळाली, ही बाब माझ्या आयुष्यातील मोठा ठेवा आहे असे मी मानतो असे ते म्हणाले.
आभार प्रदर्शन उपाध्यक्ष अजित पाटील यांनी केले.