पुणे :’देशघडणीसाठी अध्यात्म आणि राष्ट्रीयत्व गरजेचे आहे ‘, असे प्रतिपादन माजी सनदी अधिकारी आणि ‘चाणक्य मंडल ‘ चे संस्थापक अविनाश धर्माधिकारी यांनी केले.
विवेकानंद केंद्राचे संस्थापक एकनाथजी रानडे यांच्या उद्बोधनपर भाषणांचे संकलन असलेल्या ‘सेवा समर्पण’ ( अध्यात्मिक जीवनाची साधना) ग्रंथाचे प्रकाशन शनिवार २५ ऑगस्ट रोजी सकाळी पुण्यात टिळक स्मारक मंदिर येथे निवृत्त सनदी अधिकारी आणि ‘चाणक्य मंडल’चे संस्थापक अविनाश धर्माधिकारी, आणि ‘लोकमान्य मल्टीपर्पज को ऑपरेटिव्ह क्रेडीट सोसायटी’चे संस्थापक अध्यक्ष किरण ठाकूर यांच्या हस्ते झाले.विवेकानंद केंद्र मराठी प्रकाशन विभागाचे हे १२५ वे पुस्तक आहे.
या कार्यक्रमात अविनाश धर्माधिकारी यांचे ‘प्रशासनातील सेवाभाव’ विषयावर व्याख्यान झाले.
अविनाश धर्माधिकारी म्हणाले, ‘राष्ट्रविरोधी कारवाया सुरु असताना ईशान्य भारतात राष्ट्रीय विचाराची शक्ती विवेकानंद केंद्रामुळे टिकून राहिली. विवेकानंदांच्या विचाराने प्रेरित होऊन एकनाथजींनी मनुष्य घडणीचे काम केले. विज्ञाननिष्ठ अध्यात्म विचाराने व्यावहारिक जगातील समस्या सोडवता येतात. त्यासाठी एकनाथजी रानडे यांनी सांगीतलेली संघटना सूत्रे उपयुक्त ठरतील. हा संघटनाविचार त्यांनी जगून दाखवला. संघटना शास्त्रात,व्यवस्थापनशास्त्रात भारतीय विचार चाणक्य, समर्थ रामदास यांच्या माध्यमातून विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात आला पाहिजे.
स्वामी विवेकानंद ही सर्वांचीच प्रेरणा आहे. त्यांचे विचार जगालाही प्रेरणादायक आहेत, ‘ असे उद्गार किरण ठाकूर यांनी काढले. एकनाथजींचे कार्यकर्ता घडणीचे विचार आज मार्गदर्शक आहेत. राष्ट्र पुनरुत्थानाचे विवेकानंद यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी एकनाथजी रानडे यांनी आयुष्यात समर्पित काम केले. आपल्या संस्कृतीनुसार आचरणात आलेले व्यवस्थापनच जगात सर्वोत्कृष्ट असते, हे भारतीयांनी समजून घेतले पाहिजे
एकनाथजी रानडे यांनी जीवनव्रती प्रशिक्षणार्थींना वेळोवेळी केलेल्या उद्बोधनपर व्याख्यानांचे संकलन ‘सेवा समर्पण’ या ग्रंथात आहे अशी माहिती सुधीर जोगळेकर (मराठी प्रकाशन विभागाचे सचिव) यांनी प्रास्ताविकात दिली.
जयंत कुलकर्णी (विवेकानंद केंद्र संचालक, पुणे शाखा) या वेळी उपस्थित होते.
या पुस्तकाचे लेखन सुनिता करकरे यांनी तर पुस्तकाचे संपादन निवेदिता भिडे यांनी केले आहे .
कन्याकुमारीतील शिलाखंडावरील विवेकानंद स्मारकाला २०२० साली ५० वर्षे होत आहेत तर विवेकानंद केंद्राच्या स्थापनेला २०२२ साली ५० वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने विवेकानंद केंद्राच्या मराठी प्रकाशन विभागाने अनेक महत्वाकांक्षी प्रकाशनांची आखणी केली आहे.
केंद्राचे संस्थापक एकनाथजी रानडे यांनी विवेकानंदांचा विचार देशभर घेऊन जाणाऱ्या जीवनव्रती कार्यकर्त्यांची कल्पना मांडली आणि तिला देशभरातून युवक-युवतींचा उत्तम प्रतिसाद लाभला. त्यातून निवडलेल्या कार्यकर्त्यांपुढे एकनाथजी ४० व्याख्याने गुंफत असत. ती सर्वच व्याख्याने ध्वनिमुद्रित झाली नव्हती, परंतु त्यातल्या अनेकांची टिपणे कालांतराने उपलब्ध होत गेली. त्या व्याख्यानांचे शब्दांकन म्हणजे पूर्वीचे ‘सेवा साधना ‘आणि आताचे विस्तारित रूपातील ‘सेवा समर्पण’ हा ग्रंथ आहे, असे सुधीर जोगळेकर यांनी सांगितले.