जीवनातील काळोखाला कोलटकर यांनी टिपले : भास्करराव हंडे यांची भावना
‘रसिक मित्र मंडळ‘च्या ‘एक कवी एक भाषा‘ व्याख्यानाला चांगला प्रतिसाद
पुणे :जीवनात प्रकाशमय बाजूपेक्षा काळोखी बाजू अधिक असते, आणि तीच टिपण्याचे काम कवी-चित्रकार अरुण कोलटकर यांनी त्यांच्या कवितातून केले,अशा भावना अरुण कोलटकर यांचे सहकारी आणि प्रसिद्ध चित्रकार भास्करराव हंडे (नेदरलँड) यांनी व्यक्त केली.
‘रसिक मित्र मंडळ‘ आयोजित ‘एक कवी एक भाषा‘ व्याख्यानमालेत 54 व्या मासिक व्याख्यानाचे आयोजन ‘पुणे श्रमिक पत्रकार संघ‘ येथे करण्यात आले होते. हा कार्यक्रम शुकवारी सायंकाळी झाला. अध्यक्षस्थानी ‘रसिक मित्र मंडळ‘चे अध्यक्ष सुरेशचंद्र सुरतवाला होते.
चित्रकार हंडे म्हणाले, ‘कोलटकर हे श्रेष्ठ चित्रकार, श्रेष्ठ कवी, श्रेष्ठ रचनाकार होते, त्यांनी ‘भिजकी‘ वही’ काव्यसंग्रहातील कवितातून स्त्रियांच्या वेदना,सोशिकपणा टिपला, कमीतकमी रेषातून त्यांनी चित्रे रेखाटली. कमीतकमी शब्दात आषयगर्भ कविता लिहिल्या. मराठीचा जातीवंत वास येणाऱ्या कविता त्यांनी लिहिल्या.
त्यांना अधिक चांगले बुध्दीमत्तेची पारख करणारे समीक्षक मिळायला हवे होते, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
‘कवी आणि चित्ररचनाकार एकच असतो, तेव्हा त्याच्या ज्ञानेंद्रियात ज्या प्रक्रिया घडतात, त्या समजणे अवघड असते, म्हणून कोलटकर आपल्याला समजत नाहीत ‘, असेही हंडे यiनी सांगितले.
श्याम मनोहर, प्रा. माधव वझे, प्रा. माधवी वैद्य, प्रदीप निफाडकर तसेच कोलटकर यांचे बंधू -भगिनी यावैळी उपस्थित होते.