त्यावेळी आमचा अंत आम्ही स्वत: करू-डाॅ. गणेश देवी
पुणे, दि. 28 जुलै : संविधानाच्या सूर्यावर काळे ढग येत असताना ते नाहीसे करण्याचे काम आम्ही सर्व शक्तीनिशी करतोय. आणि शेवटपर्यंत तो करीत राहणार आहोत. ज्यावेळी हे काम करण्याची शक्ती अंगात राहणार नाही त्यावेळी आमचा अंत आम्ही स्वत: करू, असे उद्गार आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भाषातज्ञ व समाजसेवक डाॅ. गणेश देवी यांनी आज येथे काढले.
डीपर, सर फाउंडेशन व साद माणुसकीची या संस्थांच्या वतीने डॉ. गणेश देवी व डॉ. सुरेखा देवी यांना महापालक राष्ट्रीय सन्मानाने गौरवण्यात आले. पुण्यातील कोथरुड येथील जे पी नाईक सेंटर येथे हा कार्यक्रम झाला. एक लाख रुपये, सन्मान चिन्ह, सन्मान पत्र असे सन्मानाचे स्वरूप होते. याप्रसंगी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस, आयोजक संस्थापक अध्यक्ष हरीश बुटले, डॉ. रोहिणी बुटले आदी मान्यवर उपस्थित होते.
आम्ही दोघे पती व पत्नी एकाच वर्षी जन्माला आलो. एकाच वेळी शिकलो आणि पीएचडी एकाचवेळी पूर्ण झाली. डॉ. आंबेडकर व महात्मा गांधी यांच्या पर्वात आम्ही वाढत होतो. त्यामुळे त्यांच्या विचारांचे संस्कार आमच्यावर झाल्याचे डॉ. गणेश देवी यांनी सांगितले. ते म्हणाले की, सॉक्रेटिस, गांधी व आंबेडकर यांच्यात असलेली शक्ती कालातीत व सीमाहीन असते. ती शक्ती आपल्याला उत्क्रांतीकडे घेऊन जाते. हरीश बुटले यांनी सुरु केलेले काम असेच उत्क्रांती कडे घेऊन जाणारे आहे.
शिक्षक, सेवक, भाषातज्ज्ञ म्हणून सेवाभावी वृत्तीने काम करणारे देवी दांपत्य प्रत्येक क्षण समाजासाठी जगताहेत. पुरस्काराचे धंदे सुरू असताना हरीश बुटले व त्यांच्या संस्था अशा चांगल्या पद्धतीने काम करीत आहेत. भाषा जगली पाहिजे तरच माणूस जगेल. आणि म्हणूनच डॉ. देवी दांपत्य उच्चशिक्षित असूनही त्यांचे भाषेसाठीचे व आदिवासींसाठींचे काम महत्वाचे ठरते, असे डाॅ. श्रीपाल सबनीस यांनी यावेळी सांगितले.
सध्या गांधीऐवजी गोडसे यांना माननारे वाढत आहेत ही चिंतेची बाब आहे. अशा परिस्थितीत डॉ. देवी यांच्यासारख्या संशोधकांचे संशोधन समाजाला आवश्यक आहे, असे सांगून ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी इतिहासातले अनेक दाखले देत सध्याच्या राजकीय व सामाजिक परिस्थितीचे विवेचन केले.
डीपर, सर फाउंडेशन व साद माणुसकीची या संस्थांच्या माध्यमातून सुरु असलेल्या शैक्षणिक व सामाजिक कामांबाबत आयोजक संस्थापक अध्यक्ष हरीश बुटले यांनी प्रास्ताविकादरम्यान माहिती दिली.
शैक्षणिक व्यवस्थेची पुनर्बांधणी विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये सिद्धगिरी मठाचे मठाधिपती अदृश्य काडसिद्धेश्वर महाराज, सामाजिक कार्यकर्ते किशोर देशपांडे, सिस्कॉमचे राजेंद्र धारणकर, विज्ञानाश्रमाचे योगेश कुलकर्णी, शिक्षणतज्ज्ञ अभिजीत पाटील, सुधीर दाणी, अभ्यासक प्राचार्य डॉ. चंद्रकांत रागीट, श्यामची आई फाउंडेशनच्या शीतल बापट आणि आयआयटी प्रतिष्ठानचे दुर्गेश मंगेशकर सहभागी झाले होते. श्रमाला प्रतिष्ठा मिळणे अत्यंत आवश्यक असून तरच कौशल्य आधारित शिक्षणाला महत्व प्राप्त होईल, असे मत मान्यवरांनी मांडले.
युवा कार्यकर्ता संवाद व प्रशिक्षण कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते किशोर देशपांडे, रयत सेवक संघाचे प्रशांत खांडे पाटील, आकार फाउंडेशनचे राम वाघ, अनाम प्रेमचे अजित कुलकर्णी, ज्ञानदीप संस्थेचे आनंदा थोरात, सोशल नेटवर्कींग फोरमचे प्रमोद गायकवाड सहभागी झाले होते. याबरोबरच कार्यकर्त्यांचे अनुभवकथन, कार्यकर्ता संवाद, पुढील वाटचाल यासंबंधी कार्यक्रमही झाले.