पुणे : बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि इतर मागास वर्गीयांच्या (ओबीसी) हितरक्षणार्थ नेमलेल्या मंडल आयोगाचे अध्यक्ष बिंदेश्वरी प्रसाद मंडल यांच्या जन्मशताब्दीवर्षानिमित्त आज पुण्यातील महात्मा फुले वाडा येथे ओबीसी समाजाच्या वतीने त्यांना आदरांजली वाहण्यात आली. वर्षांनुवर्षे उपेक्षित समाजाला अस्तित्व मिळवून देण्याऱ्या बिंदेश्वरी मंडल यांना केंद्र सरकारने भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
बिंदेश्वरी प्रसाद मंडल यांचे हे जन्मशताब्दी वर्ष असल्याने महात्मा फुले वाडा येथे विशेष आदरांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते मृणाल ढोले पाटील, विठ्ठल सातव, अक्षय कोठावळे, ओबीसी महासंघ महिला प्रदेशाध्यक्ष सुनीता भगत आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेद्वारे उपेक्षित समाजाला हक्क दिले. परंतु, त्याची अंमलबजावणी करण्यासाठी मंडल आयोग महत्वपूर्ण ठरला. हजारो वर्षे ज्या समाजाला ओळख नव्हती, सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक दारिद्र्यात जो समाज जगत आला त्या सर्व मागासवर्गीय समाजावर मंडल यांचे उपकार मोठे आहेत, अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.