पुणे : विद्यार्थ्यांमधील कल्पनाशक्तीला नवनिर्मितीची जोड मिळाली पाहिजे. दुसऱ्याला कॉपी करून यश कधीच मिळू शकत नाही व मिळालेले यश टिकतही नाही. त्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत नाविन्याचा शोध घेत कार्यरत राहावे लागते, असे मत क्विकहिल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष कैलास काटकर यांनी आज व्यक्त केले.
पंखच्या संस्थापक अध्यक्षा स्मिती आपटे यांनी कैलास काटकर यांची आज प्रकट मुलाखत घेतली. यावेळी विद्यार्थ्यांसमोर बोलताना कैलास काटकर यांनी आयुष्यात यशाला शॉर्ट कट कधीच नसतो. आणि आपली स्पर्धा आपल्याशीच असते. इतरांबरोबर स्पर्धा करण्यात आपण विनाकारण वेळ खर्च करीत असतो, असेही सांगितले.
पंख व क्विकहिल फाउंडेशनच्या वतीने देहू येथील संत तुकाराम विद्यालय व जिजाबाई कन्या विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी शाळांगण उपक्रम राबविला जातो. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाबरोबरच कलागुणांना वाव मिळावा म्हणून विशेष कार्यक्रम राबविले जातात. याचाच भाग म्हणून आज ‘घे भरारी’ कार्यक्रमांतर्गत क्विकहिल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष व प्रसिद्ध उद्योजक कैलास काटकर यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. यावेळी अक्षर भारतीच्या वतीने शाळेला पुस्तके भेट देण्यात आली. याप्रसंगी क्विकहिल फाउंडेशनचे सीएसआर प्रमुख अजय शिर्के, पंखच्या विश्वस्त कल्याणी भाबड, क्विकहिल फाउंडेशनच्या पूजा यांदे, मुख्याध्यापक विठ्ठल कदम, मुख्याध्यापिका शुभांगी पंडित, समुपदेशक सचिन करंजुळे, ज्योती कातिकर, अक्षर भारतीचे केदार तापिकर आदी मान्यवर उपस्थित होते.
स्मिता आपटे यांनी विचारलेल्या प्रश्नांना कैलास काटकर यांनी दिलखुलास उत्तरे दिली. लहानपण, शाळा, पहिला व्यवसाय ते आजपर्यंतची वाटचाल इत्यादींबाबत उत्तरे देताना काटकर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांचे मनोधैर्य वाढेल आणि आयुष्याकडे बघण्याचा त्यांचा दृष्टीकोन सकारात्मक होईल याबाबतीत विद्यार्थ्यांना मार्गदर्शनही केले. काटकर म्हणाले की, कोणतेही काम छोटे-मोठे नसते. माझ्यावर आई-वडील व अवतीभवतीच्या लोकांकडून चांगले संस्कार झाले. त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकत गेलो. शेवटच्या श्वासापर्यंत माणूस शिकत असतो. त्यामुळे दुसऱ्याला रोल मॉडेल समजण्यापेक्षा आपणच आपले रोल मॉडेल बनून काम करायला पाहिजे.