आजपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात होत आहे. राज्यात गेले दोन वर्ष कोरोनाचे संकट होते. कोरोनामुळे लावण्यात आलेल्या निर्बंधांमुळे सणोत्सवांवर बंधने आली होती. मात्र यंदा दोन वर्षानंतर सर्व निर्बंध हटवण्यात आल्यामुळे, सर्वच उत्सव मोठ्या उत्साहात साजरी होत आहेत. नवरात्रोत्सव निमित्ताने पुढील दहा दिवस आदिशक्तीचा जागर पहायला मिळणार आहे. राज्यात नवरात्रोत्सवाची जय्यात तयारी केली असून, यंदा कोल्हापूर, तुळजापूरमध्ये रेकॉर्ड ब्रेक भाविकांची गर्दी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने देखील जय्यत तयारी केली आहे.नवरात्रोत्सवाने राज्यासह देशभरात चैतन्याचे वातावरण आहे. नवरात्रोत्सवानिमित्त राज्यातील शक्तीपीठं गजबजली आहेत. साडेतीन शक्तीपीठं असलेल्या देवस्थानांमध्ये नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची तुळजाभवानी, माहूरची रेणुकामाता आणि नाशिकच्या वणीची सप्तश्रुंगी देवीचं मंदिर नवरात्रोत्सवानिमित्त सजली आहेत.