अलिबाग : महावितरण, महापारेषण व महानिर्मिती या वीज कंपन्यांमधील मराविमं अधिकारी संघटनेचे 43 वे राज्यस्तरीय दोन दिवसीय अधिवेशन अलिबाग येथे दि. 8 व 9 फेब्रुवारी रोजी उत्साहात झाले. वीज क्षेत्रात झपाट्याने होत असलेले बदल, आव्हाने, ग्राहकाभिमुख उत्तमोत्तम सेवा, अधिकाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न, वीज क्षेत्र विषयक भविष्यकालीन उपाययोजना याबाबत सदर अधिवेशनात तपशीलवार चर्चा करण्यात आली.
या अधिवेशनाचे उद्घाटन रायगड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. अनिल पारसकर यांच्याहस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापारेषणचे कार्यकारी संचालक (मानव संसाधन) श्री. सुगत गमरे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून महापारेषणचे प्रभारी संचालक (वित्त) श्री. अनिल कालेकर, महावितरणचे मुख्य महाव्यवस्थापक (वित्त) सतीश तळणीकर, मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री. संजय ढोके, महापारेषणचे मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री. अनंत पाटील, अधिकारी संघटनेचे अध्यक्ष श्री. विकास आढे, सरचिटणीस श्री. डी. आर. शिंदे आणि संघटन सचिव प्रविण बागुल आदींची उपस्थिती होती.
पोलीस अधीक्षक श्री. पारसकर म्हणाले, की वीज कंपन्या तांत्रिक स्वरुपाच्या असल्या तरी अतांत्रिक अधिकाऱ्यांची भूमिका व योगदान महत्वाचे आहे. वीज ही आता मुलभूत गरज झाली आहे. अतांत्रिक अधिकारी हे तांत्रिक कंपनीमध्ये सहाय्यभूत व आधारभूत घटक आहेत. कंपनी अंतर्गत कामकाज आणखी गतीमान करण्यासाठी नवीन तंत्रज्ञान स्वीकारावे तसेच अधिवेशनामध्ये चांगल्या संकल्पनांची देवाणघेवाण करावी, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी महापारेषणचे कार्यकारी संचालक श्री. गमरे म्हणाले, की सध्या वीजक्षेत्रातील आव्हानांचे स्वरुप बदलत आहे. या नव्या आव्हानांचा स्वीकार करणे अपरिहार्य आहे. दैनंदिन कामकाजामध्ये नव्या संकल्पनांचा वापर करणे, नाविन्यपूर्णतेने कामकाज करणे या पद्धतीने नव्या आव्हानांना सहज सामोरे जावे लागेल ,असे मत त्यांनी व्यक्त केले केले. अधिकारी संघटनेचे सरचिटणीस श्री. शिंदे यांनी वीजकंपन्यांचे बदलते स्वरुप, अतांत्रिक अधिकाऱ्यांची जबाबदारी व संघटनेची भूमिका स्पष्ट केली. यावेळी संघटनेचे अध्यक्ष श्री. विकास आढे यांच्यासह उपस्थित प्रमुख पाहुण्यांनी मनोगत व्यक्त केले.
आपत्कालिन स्थितीत जनसंपर्काच्या माध्यमातून मदतकार्य सुरु करण्यासाठी पुढाकार घेणारे महावितरणचे जनसंपर्क अधिकारी श्री. विश्वजित भोसले (मुंबई) तसेच उल्लेखनीय कामगिरीबद्दल व्यवस्थापक (मासं) श्री. शिवाजी तिकांडे (अकोला), वरिष्ठ व्यवस्थापक (मासं) श्री. मुरलीधर गवळी या सभासद अधिकाऱ्यांचा तर सेवानिवृत्तीनिमित्त मुख्य महाव्यवस्थापक (मासं) श्री. संदेश हाके, मुख्य जनसंपर्क अधिकारी श्री. पी. एस. पाटील यांचा स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक महाव्यवस्थापक श्री. सुनील पाठक तर सुत्रसंचालन श्री. शिवाजी तिकांडे यांनी तर आभार शंकर गोसावी यांनी केले. या अधिवेशनासाठी राज्यभरातून आलेले अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.