पुणे : मुठा कालवा फुटल्याने सुरक्षिततेचा उपाय म्हणून बंद ठेवण्यात आलेल्या चार रोहित्रांचा शुक्रवारी (दि. 28) दुपारी चार वाजता वीजपुरवठा सुरु केल्यानंतर 350 घरांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे. मात्र 150 घरांमध्ये अद्यापही पाणी असल्याने व भिंतींची पडझड झाल्यामुळे वीजपुरवठा सुरु करणे शक्य झाले नाही.
गुरुवारी मुठा उजवा कालवा फुटल्यामुळे दांडेकर पूल परिसरातील घरांमध्ये पाणी शिरले होते. त्यामुळे महावितरणकडून सुरक्षिततेचा उपाय म्हणून या परिसरातील चार रोहित्रांचा वीजपुरवठा बंद ठेवण्यात आला होता. शुक्रवारी (दि. 28) सकाळी महावितरणचे 35 अभियंते व जनमित्रांनी पाण्यामुळे बाधीत घरांमधील वीजयंत्रणेची पाहणी सुरु केली. त्याप्रमाणे देखभाल व दुरुस्तीचे कामेही सुरु केली. यामध्ये सर्व्हीस वायर बदलणे, वीजमीटरची जागा बदलणे, नवीन वीजमीटर लावणे तसेच इतर दुरुस्तीचे कामे करण्यात आली. दुपारी चार वाजता चारही रोहित्रांचा वीजपुरवठा सुरु केल्यानंतर 350 घरांमधील वीजपुरवठा सुरु झाला. मात्र या परिसरातील 150 घरांमध्ये अद्यापही पाणी आहे. भितींमध्ये ओल आहे व भितींची पडझड झालेली आहे. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव या घरांमध्ये वीजपुरवठा सुरु करणे शक्य झाले नाही. या घरांची आवश्यक दुरुस्ती झाल्यानंतर वीजपुरवठा सुरु करण्यात येणार आहे.