पुणे : दिल्लीत सुरू असलेली दंगल हे केंद्र सरकारचे अपयश आहे. या घटनेची जबाबदारी स्वीकारून केंद्रीय गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी खासदार अमोल कोल्हे यांनी पुण्यात केली. ते पुणे महापालिकेत हडपसर विधानसभा मतदारसंघाच्या समस्यांचा आढावा घेण्यासाठी आले होते. त्यानंतर त्यांनी विविध मुद्द्यांवर माध्यमांशी बातचीत केली.भामा आसखेड प्रकल्पाचे काम येत्या ६ते ८ महिन्यांत पूर्ण होणार आहे, अशी माहिती कोल्हे यांनी दिली.
यावेळी विरोधी पक्षनेते दीपाली धुमाळ, नगरसेवक प्रकाश कदम,विशाल कदम , गफूरभाई पठाण ,नगरसेविका नंदा नारायण लोणकर, अमृता बाबर, नगरसेवक विशाल् धनवडे आदी मान्यवर उपस्थित होते .
अमोल कोल्हे यांनी शिरूर मतदारसंघात पिण्याच्या पाण्याची, वाहतूक कोंडी यासह अनेक समस्या सोडविण्याची मागणी महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांच्याकडे केली.भामा – आसखेड प्रकल्प पूर्ण होण्यासाठी शेतकऱ्यां सोबत सातत्याने संवाद साधला जात आहे. स्थानिक आमदार दिलीप मोहिते पाटील, पालकमंत्री अजित पवार आणि मी स्वतः प्रयत्न करीत आहे. या प्रकल्पामुळे पुणेकरांना पाणी मिळणार आहे. तसेच शेतकऱ्यांचेही नुकसान होऊ नये, असे कोल्हे म्हणाले.
दरम्यान, भामा – आसखेड प्रकल्प पूर्ण झाल्यावर पुणेकरांना 3 ते साडे तीन टीएमसी पाणी मिळणार आहे. पिंपरी – चिंचवड महापालिका, वाडगावशेरी, नगररोड, हडपसर भागांतील नागरिकांना पाणी मिळणार आहे.
पुढे ते म्हणाले की, चाकण एमआयडीसीचा विचार करता किमान डेमोस्टीक विमानतळ होणे गरजेचे असल्याचे मी यापूर्वीच संसदेत बोललो आहे. खेडचे विमानतळ दुदैवी धोरणामुळे आणि तत्कालीन लोकप्रतिनिधींच्या भूमिकेमुळे गेले असल्याची टीकाही त्यांनी केले. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या ‘नाशिक-पुणे’ रस्त्याचे काम आगामी दिड ते दोन वर्षात पुणे – नाशिक रस्त्याचे काम पूर्ण होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. पुणे – नाशिक रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. खेड घाट बायपासचे कामपूर्ण होत आहे. याशिवाय इतर चार बायपासची निवीदा प्रक्रीया अंतिम टप्प्यात असून पावसाळ्यानंतर काम सुरू होईल असेही ते म्हणाले.