रसिकलालजी एम. धारीवाल फाऊंडेशनचा उपक्रम; साधू-साध्वींच्या सान्निध्यात भक्तिमय वातावरण
पुणे : श्री रसिकलालजी एम. धारीवाल फाऊंडेशनच्या वतीने बिबवेवाडी येथे महामंगलकारी ‘श्री उवसग्गहरं स्तोत्र’ या जापचे सामुदायिक पठण हजारो भाविकांच्या उपस्थितीत उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात पार पडले. रविवार, दि. 6 सप्टेंबर 2026 रोजी दुपारी 4 वाजता बिबवेवाडी जैन स्थानकाबाहेरील प्रांगणात उभारण्यात आलेल्या भव्य सुशोभित मंडपात हा कार्यक्रम झाला.
मुंबई येथील तान्हारीरी ग्रुपने ‘श्री उवसग्गहरं स्तोत्र’चे संगीतमय सादरीकरण केले. या सादरीकरणाने उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले. दिगंबर आचार्य पू. श्री प्रणामसागरजी म. सा., वाणी के जादुगर पू. श्री रमणिकमुनिजी म. सा., विरायतनच्या शिल्पकार आचार्य पू. श्री चंदनाजी म. सा. यांच्या सुशिष्या पू. श्री विभाजी म. सा. व पू. श्री सुमित्राजी म. सा., तसेच महासाध्वी पू. श्री सुयशाश्रीजी म. सा. यांच्यासह साधू-साध्वीगणांच्या सान्निध्यात सामुदायिक जाप संपन्न झाला.
कार्यक्रमाचे आयोजन श्री रसिकलालजी एम. धारीवाल फाऊंडेशनच्या अध्यक्षा जान्हवी धारीवाल बालन, उपाध्यक्षा शोभाताई धारीवाल आणि उद्योजक पुनीत बालन यांच्या परिवाराच्या वतीने करण्यात आले होते.
यावेळी ऑल इंडिया अँटी टेररिस्ट फ्रंटचे (AIATF) अध्यक्ष मनिंदरजीत सिंग बिट्टा, बिबवेवाडी जैन श्रावक संघाचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल, एज्युकेशन कॅम्प सोसायटीचे अध्यक्ष वालचंद संचेती, मिलिंद फडे, देवीदास भन्साळी, अचल जैन, नगरसेविका मनिषा चोरबेले, प्रवीण चोरबेले यांच्यासह विविध जैन संस्थांचे पदाधिकारी, उद्योजक तसेच जैन-अजैन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात शोभाताई धारीवाल यांनी फाऊंडेशनच्या वतीने उपस्थितांचे स्वागत केले. त्या म्हणाल्या, “जैन धर्मात संस्कार आणि मूल्यांची परंपरा हजारो वर्षांपासून सुरू आहे. धर्मात अनेक मंत्र सांगितले आहेत. त्यापैकी ‘श्री उवसग्गहरं स्तोत्र’ संकटावर मात करण्यासाठी सकारात्मक ऊर्जा देणारे असल्याचा माझा वैयक्तिक अनुभव आहे.”
रसिकलालजी धारीवाल उपचारासाठी रुग्णालयात व्हेंटिलेटरवर असताना आपण या स्तोत्राचे पठण करत असल्याची आठवणही त्यांनी सांगितली. त्या काळात या जापमुळे सकारात्मक ऊर्जा मिळाल्याचा आपला अनुभव असल्याचे त्यांनी नमूद केले. याच श्रद्धेतून रसिकलालजी एम. धारीवाल फाऊंडेशनच्या वतीने गेल्या दहा वर्षांपासून सातत्याने या स्तोत्राच्या सामुदायिक पठणाचे आयोजन केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाला दरवर्षी चांगला प्रतिसाद मिळत असून अनेक भाविकांकडून सकारात्मक अनुभव व्यक्त केले जात असल्याचेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या शेवटी शोभाताई धारीवाल परिवाराच्या वतीने गौतम प्रसादीचे आयोजन करण्यात आले होते.

