डॉ. नीलम गोऱ्हे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बांधली राखी; डॉ.गोऱ्हे यांच्या पुढाकारातून गरजू मुलींसाठी मोफत पोलीस भरती प्रशिक्षण
ठाणे: रक्षाबंधनाच्या निमित्ताने ठाण्यातील टेंभी नाका येथील आनंद आश्रमात आयोजित कार्यक्रमात शिवसेना नेत्या तथा विधान परिषद सदस्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांना राखी बांधून शुभेच्छा दिल्या. या भावपूर्ण प्रसंगी एकनाथ शिंदे यांच्या हस्ते राज्यातील गरजू आणि होतकरू मुलींसाठी सुरू करण्यात आलेल्या ‘शौर्यकन्या पोलीस भरती मोफत प्रशिक्षण योजनेचा’ शुभारंभ करण्यात आला.

एकनाथ शिंदे यांच्या मातोश्री स्वर्गीय गंगूबाई संभाजी शिंदे यांच्या स्मरणार्थ, एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या पुढाकारातून ही योजना राबविण्यात येणार आहे. आर्थिक परिस्थितीमुळे पोलीस भरतीचे प्रशिक्षण घेऊ न शकणाऱ्या राज्यातील गरजू मुलींना दर्जेदार मार्गदर्शन उपलब्ध करून देणे, त्यांचा आत्मविश्वास वाढविणे आणि त्यांना पोलीस दलातील सेवेसाठी सक्षम करणे हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे.
यावेळी डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, “राखीचा धागा हा केवळ भाऊ-बहिणीच्या नात्याचे प्रतीक नसून संरक्षण, विश्वास आणि जबाबदारीचेही प्रतीक आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नेहमीच महिलांच्या सुरक्षिततेला आणि सक्षमीकरणाला प्राधान्य दिले आहे. त्यांच्या हस्ते ‘शौर्यकन्या’ योजनेचा शुभारंभ होणे ही आनंदाची आणि प्रेरणादायी बाब आहे.”
ग्रामीण, आदिवासी, दुर्गम तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांतील अनेक मुलींमध्ये पोलीस अधिकारी होण्याची क्षमता आणि जिद्द असते. मात्र, योग्य प्रशिक्षण, अभ्यास साहित्य आणि मार्गदर्शनाअभावी त्यांचे स्वप्न अपूर्ण राहते. अशा मुलींना योग्य संधी देऊन त्यांच्या मेहनतीला दिशा देण्याचे काम या योजनेच्या माध्यमातून केले जाणार असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या उपक्रमाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या. राज्यातील मुलींनी आत्मविश्वासाने पोलीस दलात पुढे यावे, असे आवाहन केले. मुलींचे शिक्षण, रोजगार, सुरक्षितता आणि स्वावलंबनासाठी शासन सातत्याने प्रयत्नशील आहे. ‘शौर्यकन्या’सारख्या उपक्रमांमुळे गरजू मुलींना त्यांचे ध्येय गाठण्यासाठी निश्चितच मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
योजनेत सहभागी होण्यासाठी इच्छुक गरजू मुलींनी क्यूआर कोडच्या माध्यमातून गुगल फॉर्म भरून नावनोंदणी करणे आवश्यक आहे. पात्र विद्यार्थिनींची निवड झाल्यानंतर त्यांना डिजिटल माध्यमातून पोलीस भरतीचा प्रशिक्षण अभ्यासक्रम विनामूल्य उपलब्ध करून दिला जाणार आहे. संबंधित अभ्यासक्रमाचा कालावधी नऊ महिन्यांपर्यंत असेल. निवड झालेल्या विद्यार्थिनींसाठीच हा अभ्यासक्रम वैध राहणार असून, तो अन्य व्यक्तीला हस्तांतरित करता येणार नाही.
“स्वतःच्या कर्तृत्वावर, मेहनतीवर आणि जिद्दीवर पोलीस अधिकारी बनू इच्छिणाऱ्या होतकरू व ध्येयवादी मुलींसाठी ही योजना सुवर्णसंधी ठरेल,” असा विश्वास डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केला.
योजनेसाठी नावनोंदणी १२ सप्टेंबर २०२६ पासून सुरू होणार आहे. अधिक माहितीसाठी ९८८१८१५८०९ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

