विद्यार्थिनींवर दबाव टाकून व्हिडिओ बनवल्याचा ABVP कोथरूड विभागप्रमुखांची तक्रार व आरोप
पुणे, दि. २२ ऑगस्ट : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या पुण्यातील ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला शिवाजीनगर येथील COEP टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीच्या हॉस्टेल परिसरात झालेल्या राड्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात सौरभ आमराळे,अक्षय जैन,पुष्कर आबनावे, भूषण राणभरे, सागर धाडवे आणि प्रथमेश आबनावे यांची नावे FIRमध्ये नमूद असून, त्यांच्यासह NSUI आणि युवक काँग्रेसच्या सुमारे ५० ते ६० कार्यकर्त्यांना आरोपी करण्यात आले आहे.
शिवाजीनगर पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा क्रमांक ०२३०/२०२६ नोंदविण्यात आला असून FIRची नोंद २२ ऑगस्ट रोजी पहाटे ५ वाजून ३६ मिनिटांनी करण्यात आली. भारतीय न्याय संहितेच्या कलम ११५(२), १८९(१), १८९(२), १९१(२), ३५१(१), ३५२ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम १३५ आणि ३७(३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमके काय घडले?
या प्रकरणात तक्रारदार अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कोथरूड विभाग प्रमुख मल्हार निलेश पाटील यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार, ते बी.एस्सी. इकॉनॉमिक्सच्या तिसऱ्या वर्षात शिक्षण घेत असून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेशी संबंधित काम पाहतात. २१ ऑगस्ट रोजी रात्री साडेआठच्या सुमारास त्यांच्या मित्राचा फोन आला. COEP हॉस्टेलमध्ये एका विद्यार्थिनीवर दबाव टाकला जात असल्याची माहिती मित्राने दिल्याचे पाटील यांनी तक्रारीत म्हटले आहे.
यानंतर रात्री साधारण ९ ते ९.३०च्या दरम्यान पाटील COEP हॉस्टेलमध्ये पोहोचले. हॉस्टेलच्या गेटवरील रजिस्टरमध्ये नाव नोंदवून त्यांनी आत प्रवेश केला. तेथे उपस्थित मित्रांकडून, NSUI आणि युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एका विद्यार्थिनीवर दबाव टाकून तिच्याकडून व्हिडिओ तयार करून घेतल्याचे समजल्याचा दावा त्यांनी FIRमध्ये केला आहे. त्या कथित प्रकाराबाबत विचारपूस करण्यासाठी ABVPशी संबंधित कार्यकर्ते हॉस्टेलमध्ये आले होते, असेही तक्रारीत म्हटले आहे.
त्या वेळी तेथे NSUI आणि युवक काँग्रेसचे कार्यकर्ते घोषणाबाजी करीत होते. त्यानंतर दोन्ही बाजूंमध्ये तणाव वाढला आणि परिस्थिती हातघाईवर गेल्याचे FIRमधील तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
‘शिवीगाळ, धक्काबुक्की आणि मारहाण’ केल्याचा आरोप
तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, गर्दीमध्ये काही कार्यकर्ते मुलांना आणि महिलांना धक्काबुक्की व शिवीगाळ करीत होते. याचवेळी पुष्कर आबनावे त्यांच्याजवळ आले आणि काय झाले, अशी विचारणा केली. त्यानंतर एका अनोळखी व्यक्तीने धक्का देत पुढे जाण्यास सांगितले आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे.
तक्रारीत पुढे भूषण राणभरे यांनी लाथ मारून मारहाण केली, तर अक्षय जैन, सौरभ आमराळे, सागर धाडवे आणि प्रथमेश आबनावे यांनी धक्काबुक्की करून शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यानंतर आणखी ५० ते ६० कार्यकर्ते मारहाण करण्यासाठी धावून आले आणि तेथे उपस्थित पोलिसांनी आपल्याला वाचवल्याचे पाटील यांनी आपल्या जबाबात म्हटले आहे.
पाटील यांनी आपल्या तक्रारीत पुष्कर आबनावे, भूषण राणभरे, अक्षय जैन, सौरभ आमराळे, सागर धाडवे, प्रथमेश आबनावे तसेच त्यांच्या सोबत असलेल्या NSUI आणि युवक काँग्रेसच्या ५० ते ६० कार्यकर्त्यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
FIRमध्ये नावजद आरोपी कोण?
या प्रकरणातील FIRमध्ये खालील सहा जणांची नावे स्पष्टपणे नमूद आहेत:
- पुष्कर आबनावे
- भूषण राणभरे
- अक्षय जैन
- सौरभ आमराळे
- सागर धाडवे
- प्रथमेश आबनावे
याशिवाय NSUI आणि युवक काँग्रेसचे ५० ते ६० कार्यकर्ते असा उल्लेख FIRमध्ये करण्यात आला आहे.
काही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले
घटनेनंतर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. पुणे पोलिसांच्या अधिकाऱ्यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, दोन गटांमध्ये संघर्ष झाल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. काही जण घोषणाबाजी करून रस्ता अडवण्याचा प्रयत्न करीत असल्याचे आढळल्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले. मात्र, ताब्यात घेतलेल्या व्यक्तींची नावे अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेली नाहीत.
त्यामुळे FIRमध्ये नाव असलेल्या सहा जणांनाच अटक करण्यात आली आहे, असा निष्कर्ष सध्याच्या उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे काढता येत नाही.
काँग्रेसची मात्र वेगळी बाजू
या घटनेबाबत काँग्रेस आणि ABVPकडून परस्परविरोधी दावे करण्यात आले आहेत. ABVPच्या तक्रारीत एका विद्यार्थिनीवर राहुल गांधी यांच्या कार्यक्रमासाठी नोंदणी करण्याचा आणि व्हिडिओ तयार करण्याचा दबाव आणण्यात आल्याचा आरोप आहे. दुसरीकडे काँग्रेस नेत्यांनी दोन विद्यार्थिनींनी शिष्यवृत्तीचे प्रश्न उपस्थित करून ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमाला पाठिंबा दिल्यानंतर त्यांना ABVP कार्यकर्त्यांकडून धमकावण्यात आल्याचा आरोप केला आहे.
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही घटनास्थळी भेट देऊन विद्यार्थिनींना धमकावण्यात आल्याचा आरोप केला होता. त्यामुळे पोलिसांसमोर आता दोन्ही बाजूंच्या दाव्यांची पडताळणी करण्याचे आव्हान आहे.
तपास पोलीस निरीक्षक अमर काळंगे यांच्याकडे
FIRनुसार या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक अमर नामदेव काळंगे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
राहुल गांधी यांच्या ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमाच्या काही तास आधीच घडलेल्या या प्रकारामुळे पुण्यातील राजकीय वातावरण तापले आहे. एका बाजूला ABVPकडून काँग्रेस-NSUI कार्यकर्त्यांवर विद्यार्थिनीवर दबाव आणि मारहाणीचे आरोप करण्यात येत आहेत, तर दुसऱ्या बाजूला काँग्रेस ABVPवरच विद्यार्थिनींना धमकावल्याचा आरोप करीत आहे. या दोन्ही दाव्यांमधील सत्य पोलिस तपासातून स्पष्ट होणार आहे.

