आंदोलनात फरफटत नेल्याने तोंडातून रक्त आले; दोन-तीन ठोसे बसले, तरी विद्यार्थ्यांसाठी संघर्ष सुरूच ठेवणार
नवी दिल्ली : विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीमाराच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. आंदोलनादरम्यान पोलिसांनी आपल्याला फरफटत नेले, दोन-तीन ठोसे मारले आणि त्यामुळे तोंडातून रक्त आले, असा दावा त्यांनी केला. मात्र, ही फार मोठी गोष्ट नसून विद्यार्थ्यांचा आवाज उठवण्यासाठी विरोधी पक्षनेता म्हणून आपण ही किंमत मोजण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले.
दिल्लीतील इंदिरा भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी २० जुलै रोजी झालेल्या ‘पार्लमेंट चलो’ आंदोलनातील काही व्हिडिओ दाखवले. या आंदोलनात सहभागी विद्यार्थ्यांना सुरक्षा दलांनी निर्दयपणे मारहाण केल्याचा आरोप त्यांनी केला.
राहुल गांधी म्हणाले, “पोलिसांनी मला ओढत नेले, हे खरे आहे. मात्र त्याचवेळी एका पोलिसाने माझ्या कानात ‘हे सरकार हटवा’ असे सांगितले. काहीतरी मोठे घडत असल्याचे हे लक्षण आहे. काँग्रेससह संपूर्ण विरोधी पक्ष देशातील विद्यार्थ्यांच्या मागण्यांसोबत शंभर टक्के उभा आहे.”
‘दोन-तीन ठोसे बसले; ही छोटी किंमत’
आंदोलनादरम्यान झालेल्या दुखापतीबद्दल विचारले असता राहुल गांधी म्हणाले, “मला या सगळ्याची सवय आहे. देशातील लोकांची इच्छा आणि त्यांच्या समस्या मांडणे हे माझे काम आहे. विरोधी पक्षनेता म्हणून ही एक छोटी किंमत आहे. आंदोलनात मला दोन-तीन ठोसे बसले, तोंडातून रक्त आले; पण ही फार मोठी गोष्ट नाही. विद्यार्थ्यांच्या बाजूने उभा राहिलो, याचा मला अभिमान आहे.”
या घटनेचा उल्लेख करत त्यांनी केंद्र सरकार विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला. शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना पदावरून हटवावे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांची माफी मागावी, अशी मागणीही त्यांनी केली.
‘गेल्या दहा वर्षांत १५२ पेपरफुटी’
देशातील शिक्षण आणि परीक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत राहुल गांधी म्हणाले की, गेल्या दहा वर्षांत देशभरात १५२ पेपरफुटीची प्रकरणे घडली आहेत. प्रत्यक्षातील आकडा यापेक्षाही अधिक असण्याची शक्यता आहे. मात्र, या प्रकरणांमध्ये दोषींना शिक्षा झाल्याचे दिसत नाही, असा आरोप त्यांनी केला.
“देशातील विद्यार्थी अनेक वर्षे दररोज आठ ते दहा तास अभ्यास करून परीक्षेची तयारी करतात. त्यानंतर पैसे असलेली व्यक्ती प्रश्नपत्रिका विकत घेऊ शकते, असे समोर आले तर विद्यार्थ्यांच्या मेहनतीला काय अर्थ उरतो? पेपरफुटीमुळे कोट्यवधी विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबीयांवर परिणाम झाला आहे,” असे राहुल गांधी म्हणाले.
नीटसह विविध परीक्षांमधील कथित गैरव्यवहारांमुळे विद्यार्थी संतप्त झाल्याचेही त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याऐवजी सरकार आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवरच बळाचा वापर करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
शिक्षणाच्या खर्चाची आकडेवारी मांडली
राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत शिक्षणावरील खर्चाची आकडेवारीही मांडली. केंद्र सरकारचे वार्षिक शिक्षण बजेट सुमारे १.४ लाख कोटी रुपये असल्याचे सांगत, भारतीय कुटुंबांकडून नीट परीक्षेची तयारी, शिकवणी आणि संबंधित खर्चावर सुमारे १.३२ लाख कोटी रुपये खर्च केले जात असल्याचा दावा त्यांनी केला.
“सरकार वर्षभर कर गोळा करून शिक्षणासाठी निधी उपलब्ध करते. दुसरीकडे पालकांना आपल्या मुलांच्या परीक्षांसाठी जवळपास तेवढाच खर्च करावा लागतो. शिक्षण, रोजगार आणि चांगले भविष्य उपलब्ध करून देणे ही सरकारची जबाबदारी आहे. मात्र धर्मेंद्र प्रधान यांच्या कार्यकाळात देशाची शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त झाली आहे,” असा आरोप राहुल गांधी यांनी केला.
‘संसदेत चर्चा नाकारल्याने रस्त्यावर उतरलो’
पंतप्रधानांच्या निवासस्थानाच्या दिशेने मोर्चा काढण्याची गरज काय होती, या प्रश्नावर राहुल गांधी म्हणाले की, देशातील विद्यार्थी रस्त्यावर उतरले असताना विरोधी पक्षानेही त्यांच्या पाठीशी रस्त्यावर उतरले पाहिजे.
“आंदोलनापूर्वी विरोधी पक्षाच्या नेत्यांनी लोकसभा अध्यक्षांची भेट घेऊन या विषयावर संसदेत चर्चा करण्याची मागणी केली होती. अध्यक्षांनी सरकारशी बोलण्याचे सांगितले; मात्र चर्चा झाली नाही. या संपूर्ण विषयाकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांचा आवाज देशापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही पंतप्रधानांच्या निवासस्थानाच्या दिशेने मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला,” असे राहुल गांधी यांनी सांगितले.
सरकारकडून आंदोलनाच्या सुरक्षेबाबत करण्यात आलेल्या आरोपांची आपल्याला चिंता नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. “मी विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभा आहे. विद्यार्थ्यांचे प्रश्न सरकारपर्यंत आणि संपूर्ण देशापर्यंत पोहोचवणे हे विरोधी पक्षाचे कर्तव्य आहे,” असे ते म्हणाले.
धर्मेंद्र प्रधान प्रतीक; राजीनामा आवश्यक
केवळ शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याने सर्व समस्या सुटतील का, या प्रश्नावर राहुल गांधी म्हणाले की, प्रधान हे सध्याच्या ढासळलेल्या शिक्षण व्यवस्थेचे प्रतीक आहेत. त्यामुळे त्यांना पदावरून हटवणे आवश्यक आहे.
राहुल गांधी यांनी केंद्र सरकारसमोर प्रमुख मागण्या मांडल्या. पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांची माफी मागावी, शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित हल्ल्याची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी आणि आंदोलक विद्यार्थ्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणी त्यांनी केली.
याशिवाय शिक्षण व्यवस्था, पेपरफुटी आणि विद्यार्थ्यांवरील कथित लाठीमार या विषयांवर लोकसभा व राज्यसभेत सविस्तर चर्चा घेण्यात यावी, असेही राहुल गांधी यांनी सांगितले.
“सरकारला विद्यार्थ्यांची बाजू ऐकावीच लागेल. धर्मेंद्र प्रधान यांना जावे लागेल आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना उत्तर द्यावे लागेल,” असा इशाराही राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत दिला.






