ना. चंद्रकांतदादा पाटील यांचे अधिकाऱ्यांना निर्देश
एक महिन्यात दीर्घकालीन उपाययोजनांचा अहवाल सादर करण्याच्या सूचना
पुणे-राजाराम पूल ते म्हात्रे पुल डीपी रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा कोथरुडचे आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. तसेच, वाहतूक कोंडीवरील दीर्घकालीन उपाययोजनांचा सविस्तर अहवाल एक महिन्याच्या आत सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ह्या रस्त्यावर पॅडेस्ट्रीयन क्रॉसिंग करणे, सिग्नल बसविणे, अतिक्रमानांवर कारवाई करणे असे उपाय आठ दिवसात करण्याबाबत ही त्यांनी निर्देश दिले.
कोथरुड मतदारसंघाला जोडणाऱ्या राजाराम पूल ते म्हात्रे डीपी रस्त्यावर आता सिंहगड रस्त्यावरून राजाराम पुल मार्गे येणारी वाहने देखील वाढल्याने परिसरात वाढत्या रहदारीमुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी आज संबंधित भागाची प्रत्यक्ष पाहणी करून अधिकाऱ्यांकडून सविस्तर आढावा घेतला.
वारजे कर्वेनगर प्रभाग समितीच्या अध्यक्ष नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी सोमवारी अधिकाऱ्यांसोबत केलेल्या पाहणीचा अहवाल सादर केला.त्यात नागरिकांनी केलेल्या सूचनांवर आज विस्तृत चर्चा करण्यात आली.
यावेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे, वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे,सहाय्य्क आयुक्त अस्मिता तांबे, त्यात स्थानिक नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांच्यासह नगरसेवक पुनीत जोशी,पृथ्वीराज सुतार,ॲड. मिताली सावळेकर, राजाभाऊ बराटे, रेश्मा बराटे, तेजश्री पवळे, प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर,शहर सरचिटणीस सुशील मेंगडे,प्रशांत हरसुले,मंडळ अध्यक्ष गिरीश खत्री,ऍड. प्राची बगाटे, कुलदीप सावळेकर, अनघा जगताप, राजेंद्र येडे, वैभव जमदाडे, बाळासाहेब धनवे,हेमंत भावे,मालन सरवदे, संगीताताई शेवडे,दीपक पवार,अरुण साकळे,प्रतीक खर्डेकर,निलेश घोडके, शंतनू खिलारे,सुधीर फाटक, सतीश मोहिते,जयेश सरनोबत,महापालिका व वाहतूक विभागाचे अधिकारी, स्थानिक नागरिक तसेच भाजपचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीच्या प्रारंभी ना. पाटील यांनी परिसराची प्रत्यक्ष पाहणी करून नागरिकांकडून समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांकडून सुरू असलेल्या आणि प्रस्तावित उपाययोजनांचा आढावा घेतला.
यावेळी अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी या भागातील जमीन अधिग्रहणासंदर्भात जागामालकांशी चर्चा सुरू असल्याची माहिती दिली. तसेच, राजाराम पूल आणि परिसरातील वाहतूक कोंडीवर दीर्घकालीन उपाययोजना सुचविण्यासाठी महापालिकेने तज्ज्ञ सल्लागाराची नियुक्ती केल्याचेही त्यांनी सांगितले.
यावर ना. पाटील यांनी या कामाचा दर आठवड्याला आढावा घेणार असल्याचे स्पष्ट केले. तसेच, सल्लागाराचा अहवाल एक महिन्याच्या आत सादर करण्याचे निर्देश दिले. वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरणारी अतिक्रमणे तातडीने हटवावीत, तसेच दीनानाथ मंगेशकर रुग्णालय परिसरासह इतर वाहतूक कोंडीच्या ठिकाणीही वाहतूक विभागाने आवश्यक ते कठोर उपाय करावेत, असे निर्देश त्यांनी दिले.
यासाठी प्रशासनाच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे असल्याचे आश्वासन देत, मतदारसंघातील वाहतूक व्यवस्थापनासाठी लोकसहभागातून ३० वाहतूक वॉर्डन उपलब्ध करून दिल्याची माहिती त्यांनी दिली. वाहतूक शाखेला आणखी मनुष्यबळाची आवश्यकता भासल्यास अतिरिक्त २५० वाहतूक वॉर्डन उपलब्ध करून देण्याची ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.
संदीप खर्डेकर यांनी सूत्रसंचालन केले व आपल्या प्रस्ताविकात नागरिकांच्या समस्या मांडल्या.

