भारतीय खलाशाचा मृत्यू; भारताशी संबंधित ११ जहाजे आणि १४८ खलाशी पर्शियन आखातात अडकले
नवी दिल्ली/वॉशिंग्टन : होर्मुझच्या सामुद्रधुनीतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने इराणला जहाजांवरील हल्ले तातडीने थांबविण्याचे आवाहन केले आहे. संयुक्त अरब अमिरातीच्या (UAE) दोन तेलवाहू टँकरवर झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात एका भारतीय खलाशाचा मृत्यू झाला असून, सहा भारतीयांसह आठ जण जखमी झाले आहेत. या घटनेनंतर भारताने इराणचे उप-राजदूत मोहम्मद जवाद हुसेनी यांना परराष्ट्र मंत्रालयात पाचारण करून तीव्र निषेध नोंदवला आणि स्पष्टीकरण मागितले.
दरम्यान, अमेरिकेने इराणमधील बुशेहर, चाबहार, जास्क, कोनारक, अबू मुसा आणि बंदर अब्बास येथील लष्करी तळांवर हवाई हल्ले केल्याचा दावा केला आहे. त्याचवेळी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुझ सामुद्रधुनीतून जाणाऱ्या मालवाहू जहाजांवर २० टक्के शुल्क आकारण्याची घोषणा केली असून, इराणी जहाजे आणि त्यांच्या ग्राहकांवर नव्या निर्बंधांची घोषणाही केली आहे.
इराणने मात्र होर्मुझ सामुद्रधुनीवरील नियंत्रण सोडण्यास नकार दिला आहे. सर्वोच्च नेत्यांचे सल्लागार मोहम्मद मोखबर यांनी अमेरिकेच्या दबावापुढे झुकणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान, रशियाचे विशेष कमांड विमान Tu-214PU तेहरानमध्ये दाखल झाल्याने या संघर्षाकडे जगाचे लक्ष लागले आहे.
११ जहाजे आणि १४८ भारतीय खलाशी अडकले
होर्मुझ सामुद्रधुनीतील तणावामुळे भारताशी संबंधित ११ जहाजे आणि १४८ भारतीय खलाशी पर्शियन आखातात अडकले आहेत. यामध्ये भारताचा माल वाहून नेणारी ७ भारतीय ध्वजांकित आणि ४ परदेशी ध्वजांकित जहाजांचा समावेश आहे. त्यापैकी चार जहाजे खतांचा साठा घेऊन भारताकडे येत आहेत.
केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार, संघर्ष सुरू झाल्यापासून भारतासाठी माल वाहून नेणाऱ्या ५७ जहाजांनी होर्मुझ मार्गाचा वापर केला आहे. आतापर्यंत हजारो भारतीय खलाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले असले तरी काही जहाजे अद्याप मार्ग मोकळा होण्याची प्रतीक्षा करत आहेत.
जलवाहतूक जवळपास ठप्प
होर्मुझच्या सामुद्रधुनीतील परिस्थिती गंभीर बनली असून, सोमवारी या मार्गावरून केवळ १० जहाजांची वाहतूक झाली. युद्धापूर्वी दररोज १३० हून अधिक जहाजे या मार्गाने प्रवास करत होती. वाढत्या धोक्यामुळे अनेक जहाज कंपन्यांनी आपली जहाजे थांबविण्याचा निर्णय घेतला आहे.
भारताची स्पष्ट भूमिका
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितले की, पश्चिम आशियातील परिस्थितीवर भारताचे बारकाईने लक्ष असून, होर्मुझ सामुद्रधुनीतून जहाजांची सुरक्षित आणि अखंड वाहतूक सुरू राहणे हे जागतिक ऊर्जा व आर्थिक सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे सर्व संबंधित पक्षांनी संयम बाळगून व्यापारी जहाजांवरील हल्ले तातडीने थांबवावेत, असे भारताने स्पष्ट केले आहे.

