चंद्रपुरातील वाघ हल्लाप्रकरणाची डॉ. गोऱ्हे यांच्याकडून गंभीर दखल
रोजगार हमी योजनेअंतर्गत तेंदूपत्ता लागवडीवर भर द्यावा; मजुरांसोबत कंत्राटदारांनी सुरक्षा रक्षक देणे बंधनकारक करावे.
मुंबई, दि.२३ : सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील गुंजेवाही जंगलात तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेल्या चार महिलांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याच्या घटनेची शिवसेना नेत्या व आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी गंभीर दखल घेतली आहे. वन्यप्राण्यांना जंगलातच रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात आणि स्थानिक नागरिकांसाठी पर्यायी रोजगाराची व्यवस्था उभी करावी, अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली.
या घटनेनंतर डॉ. गोऱ्हे यांनी वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधून तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. गेल्या पाच वर्षांत चंद्रपूर जिल्ह्यात सुमारे २०० ग्रामस्थांचा वाघाच्या हल्ल्यांत बळी गेला असून, चालू वर्षातच १९ जणांचा मृत्यू झाला आहे. मागील वर्षीही १० मे २०२५ रोजी गुंजेवाही परिसरात तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेल्या तीन महिलांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता.
मृतांमध्ये दोन सख्या बहिणींचा समावेश असल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. हजारो ग्रामीण नागरिकांचा उदरनिर्वाह तेंदूपत्ता संकलनावर अवलंबून असताना, त्यांना जीव धोक्यात घालून जंगलात जावे लागत असल्याची खंत डॉ. गोऱ्हे यांनी व्यक्त केली. “वन विभागाने तेंदूपत्ता संकलनाचे ठेके देण्याऐवजी स्थानिक नागरिकांना रोजगार हमी योजनेतून पर्यायी रोजगार उपलब्ध करून द्यावा. रोजगार हमी योजनेअंतर्गत तेंदूपत्ता लागवडीवर भर द्यावा. तसेच तेंदूपत्ता संकलनासाठी जाणाऱ्या मजुरांसोबत कंत्राटदारांनी सुरक्षा रक्षक देणे बंधनकारक करावे. नागरिकांना जंगलात ढकलून त्यांच्या जीवाशी खेळणे थांबले पाहिजे,” असे त्या म्हणाल्या.
राज्य शासनाने स्थापन केलेल्या ‘चंद्रपूर जिल्हा वाघ-मानव संघर्ष तांत्रिक समिती’ने २०२१ मध्ये विविध उपाययोजना सुचवून अहवाल सादर केला होता. मात्र, पाच वर्षांनंतरही त्याची प्रभावी अंमलबजावणी झालेली नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. रोजगार हमी विभागाच्या निष्क्रियतेमुळे नागरिकांना पुन्हा जंगलावरच अवलंबून राहावे लागत असून, त्यामुळेच अशा दुर्घटना वाढत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
“वन्यप्राण्यांचे संरक्षण आवश्यक आहे; मात्र त्याचवेळी स्थानिक नागरिकांचे जीवही तितकेच महत्त्वाचे आहेत. जंगलातील लोकांना सुरक्षित आणि सन्मानजनक पर्यायी रोजगार उपलब्ध करून दिल्यास अशा घटना टाळता येऊ शकतात,” असे डॉ. गोऱ्हे यांनी स्पष्ट केले. तसेच समितीच्या शिफारशींवर साधक-बाधक चर्चा करून तातडीने धोरणात्मक निर्णय घ्यावेत, अशी मागणीही त्यांनी प्रशासनाकडे केली.
डॉ. गोऱ्हे यांनी या घटनेतील मृत्यूमुखी पडलेल्या कुटुंबीयांशी दूरध्वनीद्वारे संवाद साधून त्यांना धीर दिला. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेबाबत प्रशासनाकडून आढावा घेतला असून, तात्काळ योग्य ती मदत देण्याच्या सूचना दिल्या असल्याची माहितीही त्यांनी दिली.

