पुणे : “गुरू भक्ती केली तर देव वारकर्यांना सर्व सुखे प्राप्त करून देते. भक्तीचे फळ व भाग्य त्याला मिळणारच. त्यामुळे पंढरपुरची वारी करतांना वारकर्यांच्या मुखात सदैव पांडुरंगाचे नामस्मरण असावे.” अशा प्रकारे गुरू किती महत्वाचा आहे हे आळंदी देवाची येथील ह.भ.प. श्री. गणपत महाराज जगताप यांनी आपल्या प्रवचणात वारकर्यांना समजावून सांगत होते.
विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे व श्री क्षेत्र आळंदी-देहू परिसर विकास समिती यांच्या संयुक्त विद्यमाने श्री संत ज्ञानेश्वर-तुकाराम ज्ञानतीर्थ, विश्वरूप दर्शन मंच, श्री क्षेत्र आळंदी येथे पालखी सोहळा प्रस्थानाच्या निमित्ताने युनेस्को अध्यासन अंतर्गत लोकशाही, मानवाधिकार, शांती व सहिष्णुतेसाठीचा लोकशिक्षणाचा अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्रथम पुष्प गुंफतांना ते बोलत होते.
यावेळी सौ. उर्मिला विश्वनाथ कराड, ह.भ.प.डॉ. सुदाम महाराज पानेगांवकर, पं.उध्दवबापू आपेगांवकर, श्रीमती उषाताई जोगळेकर, महेश महाराज नलावडे, व श्री. शालीकराम खंदारे हे उपस्थित होते.
ह.भ.प.श्री.गणपत महाराज जगताप म्हणाले, गुरूचा महिमा अपरंपार आहे. अंतःकरण शुध्द असेल, तर भक्ती ही सरळ व मधुर होते. खरे म्हणजे देवापेक्षाही गुरू श्रेष्ठ आहे कारण देव प्रसन्न झाला तर धन दौलत मिळेल. पण गुरू प्रसन्न झाला, तर प्रत्यक्ष देवच प्राप्त करून देईल. गुरू आपल्या हदयात असेल, तर या संसाराच्या चक्रातून तो आपली सुटका करेल. त्यासाठी विविकाने त्याच्या बद्दल विशेष आदराने वागावे. तो आपल्या डोळ्यात झणझणीत अंजन घालतो त्यामुळे आपल्या दृष्टीला चांगली दिशा मिळते. त्यातून जमीनीत दडलेल्या ज्ञानरूपी द्रव्याचा ठेवा दिसू लागतो. त्याच्या कृपेने आपले सर्व हेतू पूर्ण होतात.
तसेच, पर्यावरणाविषयी सुद्धा संतांनी जागृती केली आहे. त्यांना झाडे झुडपे व पशू पक्षी आपले नातेवाईक आहेत असेच वाटते. जणू काय आकाशाचा मंडप व पृथ्वीचे आसन यामध्ये आपले मन रमुन जाते. वार आपल्याला सुखवितो. आपले मन आपोआपच स्वतःशी संवाद करून देवाच्या भक्तीकडे वळते.
ह.भ.प.श्री.ज्ञानेश्वर माऊली वाबळे गुरूजी म्हणाले,“एकदाका भाविक भक्त वारीत सामील झाला, की त्याला व्यसनांचा सुद्धा विसर पडतो. टाळ मृदुगाच्या साथीत तो जेव्हा भजन करीत पाऊले टाकतो, तेव्हा आपल्या शेजारी कोण आहे याच्या जातीची तो अजिबात चौकशी करीत नाही. कारण विठ्ठलाचा भक्त एवढी एकच जात त्याला माहित असते.”
या नंतर संगीत अलंकार ह.भ.प.श्री. राधाकृष्ण गरड गुरूजी यांचा भक्ती स्वरगंध हा अभंगवाणीचा कार्यक्रम झाला.
वरील कार्यक्रमाचा इंद्रायणीच्या दोन्ही तीरावरील लाखों वारकर्यांनी अध्यात्मिक अनुभतीचा लाभ घेतला.