पुणे- अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या वतीने १ जून हा ‘प्रभात दिन’ म्हणून साजरा करण्यात आला. फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या ठिकाणी असलेल्या प्रभात संग्रहाल्यातील प्रभात कंपनीचे निर्माते व्ही. शांताराम, एस. फत्तेलाल, केशवराव धायबर, सीताराम कुलकर्णी व विष्णू पंत दामले यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून या समारंभास आरंभ झाला. या वेळी प्रभात कंपनीच्या आठवणींचा ठेवा सर्वांना पाहण्यासाठी खुला केला होता. १ जून हा ‘प्रभातचा वर्धापनदिन असतो. याचे औचित्य साधून हा समारंभ घेण्यात आला होता.
त्यानंतर राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयामधील प्रेक्षागृहात एक विशेष समारंभ करण्यात आला. या समारंभात प्रभातचे वारसदार जयंत दामले, मदन कुलकर्णी, हर्षद मिस्त्री फत्तेलाल तसेच ‘रिंगण’ या राष्ट्रीय पारितोषिक विजेत्या टीमचा सन्मान करण्यात आला.
या समारंभात डॉ. आगाशे म्हणाले, की प्रभात दिन साजरा करणे ही खूप चांगली गोष्ट आहे. पुण्यासारख्या ठिकाणी एके काळी एवढी मोठी भव्यदिव्य प्रभात कंपनी होती. चित्रपट क्षेत्रातील ती एके काळी देशाचे प्रतिनिधित्व करत होती. हा वारसा आपण जतन करून ठेवला पाहिजा. जर वर्षी ‘प्रभात दिन’ झालाच पाहिजे आणि हा ठेवा आपण सर्वानी जपून ठेवला पाहिजे.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून फिल्म इन्स्टिट्यूटचे माजी संचालक व जेष्ठ अभिनेते डॉ .मोहन आगाशे, कार्यक्रमाचे अध्यक्ष समर नखाते, प्रसिद्ध वात्रटिकाकार रामदास फुटाणे, अ. भा. चि. महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, जेष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे, अभिनेते विजय पाटकर, चित्रपट महामंडळाच्या संचालिका निकिता मोघे, चैत्राली डोंगरे, संजय ठुबे, विजय खोचीकर, चित्रपट निर्माते बाळासाहेब बांगर असे अनेक मान्यवर या समारंभाला उपस्थित होते. समारंभ अखेरीस प्रभात कंपनीच्या कारकीर्दीवर आधारित ‘इट्स प्रभात’ हा माहितीपट दाखवण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील महाजन यांनी केले.