पुढील सरकारमध्ये आपले आमदार कोणत्याही परिस्थितीत बसवायचेच
मुंबई -काही दिवसांपूर्वी मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांनी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात जाऊन सर्वेक्षण केले. त्याचा अहवाल मिळाल्यावर राज ठाकरे यांनी विधानसभेच्या २२५ ते २५० जागा लढण्याची तयारी केली आहे. गुरुवारी पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात त्यांनी ही घोषणा केली. ते म्हणाले की, नेमक्या कोणत्या जागा लढवायच्या. तेथील महत्त्वाचे मुद्दे जाणून घेण्यासाठी आमखी दोन सर्वेक्षणे होणार आहेत. शिवाय मी १ आॅगस्टपासून महाराष्ट्राचा दौरा करणार आहे. येत्या विधानसभेत मनसेच्या काही नेत्यांना सत्तेत बसवण्याचे उद्दिष्ट मी ठेवले आहे. सध्या आपला पक्ष कुणाशी युती करणार का, याचा कोणताही विचार मनात आणू नका, असे त्यांनी बजावले. लोकसभेला राज यांनी महायुतीला पाठिंबा दिला होता. त्याचा मुंबई आणि कोकणातील एका मतदारसंघात फायदा झाल्याचे दिसते. नुकत्याच झालेल्या विधान परिषद पदवीधर निवडणुकीतही त्यांनी भाजपसाठी माघार घेतली होती. या पार्श्वभूमीवर विधानसभेच्या रणनीतीची माहिती राज यांनी मेळाव्यात पदाधिकाऱ्यांना माहिती दिली.
राज ठाकरे यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे… १) मध्यंतरी २०,२५ दिवस मी अमेरिकेत होतो, तिथे बृहन महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनात माझी मुलाखत होती. या निमित्ताने तिथे स्थायिक झालेल्या असंख्य मराठी बांधव-भगिनींशी भेट झाली. त्याच दरम्यान एकदा एक मराठी तरुण शिवलकर आडनावाचा मला भेटायला आला, म्हणाला की मी तुमची लहानपणापासून भाषणं ऐकत आलो. आणि त्यातून प्रेरणा घेऊन इथे मी स्वतःच रेस्टोरंट सुरु केलं आहे. त्याच्या रेस्टोरंटला मी कसंही करून भेट द्यावी अशी त्याची इच्छा होती, म्हणून त्याच्या रेस्टोरंटला गेलो. आतमध्ये जवळपास १०० आणि बाहेर ५० लोकं बसतील अशा क्षमतेचं ते रेस्टोरंट होतं, जे मी गेलो तेंव्हा पूर्ण भरलेलं होतं. आणि मला कळलं की तिकडे टेबल मिळायला कमीत कमी दीड तासांची प्रतीक्षा असते. भारतीय आणि अभारतीय लोकं मोठ्या प्रमाणावर आपलं जेवण जेवायला येतात हे पाहून मला खूप आनंद झाला. एकूणच आपल्या मराठी लोकांनी अमेरिकेत व्यवसाय उद्योगात मोठं यश मिळवलं आहे हे पाहून खूप छान वाटलं. २) अमेरिका, कॅनडा या दोन देशांमध्ये अनेक मोठे तलाव आहेत, पण त्यातले ५ मोठे तलाव आहेत ते इतके मोठे आहेत की ते जर तुम्ही गुगल अर्थ किंवा इतर एखाद्या माध्यमावर जाऊन बघायला गेलात तर तुम्हाला त्याचा अतिप्रचंड आकार दिसेल. हे तलाव इतके मोठे आहेत की अवकाशातून पण हे तलाव दिसतात. या तलावांच्यातला एक छोटा ठिपका म्हणजे जगप्रसिद्द नायगारा धबधबा. इतकं अतिप्रचंड पाणी, जंगलं असलेला हा प्रदेश आहे. इथे फिरताना मला नेहमी एक जाणवत रहायचं की हे सगळं असताना पण इथे पाणी वाचवणं, जंगल वाचवणं याचा किती विचार करतात. ३) पण आपल्याकडे हा विचार होताना दिसत नाही. दरवर्षी मे महिना आला की, पाऊस पडेल का? पडला तर पुरेसा पडेल का? दुष्काळ तर नाही ना पडणार? अशा चिंतांनी महाराष्ट्र ग्रासलेला असतो. पण म्हणून जे पाणी पावसाच्या रूपाने येतं त्याचं नियोजन आपण करत नाही. आपण आपली जंगलं पण वाचवत नाही. कुठलंही सरकार असू दे त्याला या गोष्टीशी काही घेणंदेणं नाही. आपल्याकडे अंतिमकर्म करायला दहन करायला लाकडं वापरतात, पण माझं म्हणणं आहे की काय हरकत आहे आपण विद्युतदाहिनीचा वापर केला तर? किती लाकूडतोड थांबेल याचा आपण विचार करतोय का? सरकारने मग ते केंद्रातील असो की राज्यातील, त्यांनी विद्युतदाहिन्यांवर भर दिला तर प्रचंड जंगलतोड वाचेल. आपण आपल्या धर्माबद्दल अभिमानी असलं पाहिजे, त्यात जे सांगितलं आहे ते पाळायला हरकत नाही फक्त हे करताना काळाच्या ओघात आपण निसर्गाची हानी करत नाही आहोत ना हे देखील बघायला हवं. ४) पण सध्या कोणाचं लक्ष नाहीये. सगळे व्यस्त आहेत ‘लाडकी बहीण’, ‘लाडक्या भावात’. लाडकी बहीण, लाडका भाऊ, लाडकी बहीण एकत्र आले असते तर दोन्ही पक्ष टिकले असते. मुळात अशा योजना राबवायला राज्यसरकारकडे पैसे आहेत का? सरकारकडे रस्त्यांवरचे खड्डे बुजवायला पैसे नाहीत, योजनांना कुठून पैसे येणार ?५) माझी महाराष्ट्र सैनिकांना विनंती आहे की, आज महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती आहे. लोकांना मदतीची गरज आहे. त्यामुळे तुम्ही या लोकांकडे जा, त्यांना मदत करा, त्यांना काय हवं नको ते पहा. ६) महाराष्ट्राचे खरे प्रश्न काय आहेत यांकडे कोणाचं लक्ष नाहीये. या प्रश्नांकडे आपण लक्ष दिलं पाहिजे, कारण इतर कोणाला काही पडलेली नाही. हेच तुमचं प्रचाराचं कॅम्पेन पाहिजे. ७) आज कुठला आमदार कुठल्या पक्षाचा, कुठल्या गटाचा आहे हे कळत नाही. येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये राजकीय पक्षांची स्पर्धा कुठवर जाईल हे सांगता येत नाही. मध्ये मला कोणीतरी सांगितलं की आपल्याकडचे एक, दोन लोकं दुसरीकडे जायला निघालेत. मी म्हणलं जरूर जा, हवं तर जाण्यासाठी मीच रेडकार्पेट घालतो. तिथे जे आहेत त्यांचंच काही खरं नाही, यांचं काय होणार आहे. ८) निवडणुका आल्या की सर्व्हे करणाऱ्या एजन्स्या येतात, ते सर्व्हे करतात, ती किती लोकांना भेटतात देव जाणे. पण आपल्याकडे मी मध्यंतरी पदाधिकाऱ्यांच्या टीम्स जिल्ह्या-जिल्ह्यात पाठवल्या होत्या, ते पदाधिकाऱ्यांना न भेटता, तिथल्या स्थानिकांना, पत्रकारांना भेटून त्यांचा अहवाल घेऊन मला भेटले. आता त्या टीम्स पुन्हा मी तुमच्याकडे पाठवणार आहे, त्या आता तुम्हाला भेटणार आहेत. त्यांना तुमच्या मतदारसंघातील परिस्थिती समजवून सांगा. त्यांना प्रामाणिकपणे वस्तुस्थितीची माहिती द्या, तुम्ही जे सांगाल, जी माहिती द्याल ती मी चेक करणार आहे, त्यामुळे जे खरं आहे तेच सांगा. आणि मी आत्ताच सांगतो लढण्याची,जिंकण्याची तयारी असलेल्यानाच तिकीट मिळेल, तिकीट मिळालं आणि मी आता पैसे काढायला मोकळा असल्याना मी तिकीट देणार नाही. ९) येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये मला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला, माझ्या महाराष्ट्र सैनिकांना काहीही करून सत्तेत बसवायचं आहे. यासाठी तयारी सुरु आहे. १०) आपली युती होईल का असल्या गोष्टींचा विचार करू नका, आपण स्वबळावर २२५ च्या वर जागा लढवणार आहोत. ११) पावसाची परिस्थिती बघून पण मी १ ऑगस्टपासून दौऱ्यावर येत आहे. त्यावेळेला महाराष्ट्रातील जिल्ह्या-जिल्ह्यांमधील माझ्या पदाधिकऱ्याना मी भेटणार आहे.