सांगली- मराठ्यांची ताकद आज राज्याला दिसतेय. चारही बाजूने मराठ्यांना घेरले जात आहे, आपल्याला हे षडयंत्र मोडून काढायचे, सावध राहा, गाफील राहू नका, 70 वर्षापासून मराठ्यांना वेढा पडलाय, हा वेढा तोडायचा आहे. आज समितीला पुरावे सापडले आहे. मराठा 50 टक्क्यांच्या आतमध्येच आहे. मराठा ओबीसी आरक्षणात आहे हे सिद्ध झाले आहे, असे मत मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
दरम्यान मनोज जरांगे पाटील म्हणाले की, ओबीसी प्रवर्गात सामाविष्ट व्हायचे असेल तर कुठल्याही जातीला निकष पूर्ण करावे लागतात. मराठा समाजाने हे सर्व निकष पूर्ण केलेत. विदर्भात मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊन त्यांचा समावेश केला. व्यावसायावर आधारित जाती निर्माण झाल्या, त्यावर आरक्षण मिळाले असेल तर आमचाही व्यवसाय शेती आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, आता इथून पुढच्या काळात आपल्या लेकरांचे वाटोळे होऊ द्यायचे नाही. आपल्या मुलांना सावली मिळण्यासाठी आज आपल्याला उन्हात बसावं लागेल. सांगलीत प्रचंड संख्येत जमलेल्या लोकांनी मराठ्यांची एकजूट दाखवली. एकजुटीशिवाय पर्याय नाही. महाराष्ट्रातील मराठा समाजाला माझे आवाहन आहे, की, आता एकजूट दाखवण्याची गरज आहे. बिगर कामाचे कळप एकत्र यायला लागलेत. आपली जात वाचवणे गरजेचे आहे. त्यासाठी आरक्षण असलेल्या आणि नसलेल्या मराठा बांधवांनी ताकदीने एकजूट दाखवा. मी मराठा समाजाला पाया पडून विनंती करतो. आपल्याला आव्हान पेलायचे आहे. स्वत:च्या लेकरांच्या हितासाठी लढायचे आहे. आपली जात उद्ध्वस्त होता कामा नये. पोरं संपली तर जात संपली, पोरांचे करिअर बर्बाद होऊ देऊ नका. आजपासून प्रत्येकाच्या खांद्यावर जबाबदारी आहे.
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, तुमची जात ओबीसी आरक्षणात गेली, ती कुठल्या आधारे गेली हे सांगा. या राज्यात मराठ्यांची त्सुनामी आली आहे. एवढ्या ताकदीने समाज आज रस्त्यावर उतरला आहे. आरक्षण नसलेल्या भावाच्या मदतीला ज्या मराठ्यांना आरक्षण मिळाले आहे, त्यांनी मदतीला या. आपल्याला लढून वेढा तोडायचा आहे. माझ्या सांगण्याकडे मराठा समाजाने बारकाईने लक्ष द्या, आम्ही संपलो तर उद्या मराठ्यांना संपवायला मागेपुढे पाहणार नाही. मराठ्यांची लेकरं पुढे जाऊ नये असा चंग बांधला आहे. यांचे स्वप्न पूर्ण होऊ द्यायचे नाही. आमचे आरक्षण 70 वर्ष खाल्ले आहे. ज्या ज्या वेळी समिती झाल्या तेव्हा प्रत्येक समितीने पुरावे दिले. परंतु तरीही मराठ्यांना आरक्षण दिले नाही. मराठ्यांच्या ताकदीवर हे पुरावे आता समोर आलेत. मराठ्यांना आरक्षण मिळाले असते तर सर्वात प्रगल्भ जात मराठाच राहिली असती असेही त्यांनी म्हटले आहे.
मनोज जरांगे म्हणाले की, एकही राजकारणी आपल्याला मदत करणार नाही, कुणीही राजकीय नेता आपल्या मदतीला येणार नाही. तुम्ही त्यांना साहेब म्हणता, साहेबांना मोठे केले, त्याच्या वडिलांना मोठे केले. मात्र ते आपल्याला मदत करायला येणार नाही. प्रत्येक पक्षाला मराठ्यांनी मोठे केले. सगळ्यांनाच मोठे व्हायला मदत केली. त्या नेत्यांना आपण मोठे केले कारण आपल्या बापजाद्यांना वाटले होते की हा माणूस मोठा झाला की आपल्या लेकराबाळांना मदत करेल. मात्र एकही राजकीय नेता आपल्याला मदत करत नाही. त्यामुळे आपण त्याला मोठे केले कशाला? असाही प्रश्न मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.
मनोज जरांगे म्हणाले की, मराठा समाजाला 70 वर्षांपूर्वी आरक्षण दिले असते तर मराठा जात प्रगत झाली असती. मराठ्यांचे पुरावे असतानाही मराठ्यांना आरक्षण दिले नाही आणि पुरावे ही सापडू दिले नाहीत. आज तेच पुरावे बाहेर निघालेत फक्त मराठ्यांच्या ताकतीवर आणि एकजुटीवर हे पुरावे बाहेर आल्याचे त्यांनी सांगितले. मराठा समाजाला ओबीसी आरक्षण मिळण्यासाठी जरांगे पाटील यांनी आमरण उपोषणाचे हत्यार उपसले होते. त्यांच्या या आंदोलनाला राज्य सरकारने प्रतिसाद दिला. मराठ्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याविषयी न्यायमूर्तींची समिती गठित केली. ही समिती तिचे काम करत आहे.