अंबड-मराठा समाजाची वाताहत कुणी केली? तुमचा खरा शत्रू ओबीसी नाही. तुम्हीच तुमचा खरा शत्रू ओळखा, अशा शब्दात अंबड येथे शुक्रवारी झालेल्या ओबीसींच्या एल्गार परिषदेत भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी मराठा आरक्षणावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली.
गोपीचंद पडळकर म्हणाले की, मराठा समाजातील गरिबांना आरक्षण मिळाले पाहिजे. आमचा मराठा आरक्षणाला विरोध नाही. पण त्यांना 346 जाती असणाऱ्या ओबीसी वर्गातील जातींना धक्का न लावता आरक्षण द्या. या प्रकरणी ओबीसी आरक्षणाला धक्का लावण्याचा प्रयत्न झाला तर अवघा महाराष्ट्र पेटून उठेल.ओबीसींची ही सभा पाहून आमच्याविरोधात काम करणाऱ्यांच्या काळजाचा थरकाप उडाला पाहिजे. देशात ओबीसी आरक्षणासाठी अनेक आंदोलने उभी राहिली, त्यानंतर ओबीसींना आरक्षण मिळाले. या आरक्षणात काटे आणण्याचे काम काही जण करत आहेत. त्यांना सरळ करण्याचे काम या ओबीसींमध्ये आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. पण ओबीसीमधील 346 जातींच्या आरक्षणाला हात लावता काम नये, असेही गोपीचंद पडळकर यावेळी म्हणाले.
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी ओबीसीच्या आरक्षणाला नख लावण्याचा प्रयत्न झाला तर ओबीसी समाज प्रस्थापितांना उत्तर देईल. मराठा समाजाने या प्रकरणी आपली वाताहत कुणी केली हे ओळखावे. ओबीसी समाज मराठ्यांचा शत्रू नाही. 2014 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला जसे आरक्षण दिले, तसेच आरक्षण मराठा समाजाला आरक्षण देण्याची गरज आहे, असे गोपीचंद पडळकर म्हणाले.गोपीचंद पडळकर यांनी यावेळी मंत्री तथा ओबीसी नेते छगन भुजबळ यांचे तोंड भरून कौतुक केले. आजच्या दिवसाची महाराष्ट्राच्या इतिहासात नोंद होईल. गटातटात विभागालेले ओबीसीचे नेते आता एकत्र आलेत. ओबीसींना सहजपणे आरक्षण मिळाले नाही. त्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला. पण आता काही जण आरक्षणासाठी त्याची वाटमारी करण्याचा प्रयत्न करत आहेत, असे ते म्हणाले.
आता ओबीसी समाज जागा झाला आहे. छगन भुजबळ ओबीसींचा ढाण्या वाघ आहे. वाघ म्हातारा झाला तरी तो डरकाळी फोडणे थांबवत नाही. म्हातारा झाला तरी तो गवत खात नाही. आम्ही सर्वजण छगन भुजबळ यांच्या पाठिशी आहेत, असेही ते यावेळी म्हणाले.गोपीचंद पडळकर म्हणाले, महात्मा फुले, सावित्री फुले यांचे रक्त आमच्या रक्तात सळसळत आहे. अन्यायाविरोधात बंड केले पाहीजे, हा महात्मा फुलेंचा मंत्र तंतोतत पाळण्याचे काम छगन भुजबळांनी केले आहे. पडळकर म्हणाले, गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहीजे, याला आमचा विरोध नाही. परंतू ३४६ जातींचा समावेश असलेल्या ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागला नाही पाहीजे, ही आमची भूमिका आहे. अजूनही ओबीसीमधील अनेक जातींना आरक्षणाचा लाभ मिळालेला नाही. अनेक जाती अशा आहेत ज्यामधील व्यक्तींना अजून सरपंच, ग्रामपंचायत सदस्य होता आलेले नाही. त्यामुळे ओबीसींच्या या आरक्षणाला धक्का लावला तर ओबीसी चवताळून उठल्याशिवाय राहणार नाही.पडळकर म्हणाले, ओबीसीत अजून कितीतरी जातसमूह अजून वंचित आहेत. त्यामुळे छगन भुजबळांनी जी भूमिका घेतली आहे, ती अतिशय योग्य आहे. महाराष्ट्रातील ५ कोटी धनगर समाज भुजबळांच्या सोबत आहे. मराठा समाजाची वाताहत कोणी केली? मराठा समाजाचा विरोधक कोण आहे? ओबीसी मराठ्यांचा शत्रू नाही. मराठा समाजातील नेतेच या समाजाचे शत्रू आहेत. ओबीसी फक्त स्वत:चे आरक्षण वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी महाराष्ट्रातील सर्व ओबीसींनी एकत्र येण्याची गरज आहे. .प्रस्थापितांना आपल्याला आता टक्कर द्यायची आहे. यासाठी ओबीसींची एक मोट बांधण्याची गरज आहे.