जालना-जालन्याच्या आंतरवाली सराटीत मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील आपल्या घरात जाऊन झोपले होते. पण राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजेश टोपे व रोहित पवार यांनी त्यांना उठवून उपोषण स्थळी नेऊन बसवले, असा मोठा आरोप मंत्री छगन भुजबळ यांनी शुक्रवारी केला.
जालना जिल्ह्यातील अंबड येथे शुक्रवारी ओबीसींचा महामेळावा झाला. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी या मेळाव्यात मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. यावेळी त्यांनी लाठीचार्जनंतर पडद्यामागे घडलेला घटनाक्रमही सांगितला.छगन भुजबळ यांनी सांगितले की, आंतरवाली सराटीत पोलिसांनी केलेला लाठीचार्ज सर्वांनी पाहिला. त्यात महिला पोलिसांसह जवळपास 70 पोलिस कर्मचारी जखमी झाले. हे पोलिस पाय घसरून पडले का? पोलिस तिथे मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करण्यासाठी गेले होते. पण त्यांनी त्यांना थोड्या वेळाने येण्यास सांगितले. त्यानंतर पोलिस उपोषणस्थळी गेले असता त्यांच्यावर दगडांचा मारा करण्यात आला. त्यात अनेकजण जखमी झाले, असे छगन भुजबळ म्हणाले.
लाठीचार्ज झाल्यानंतर हे शूर सरदार (मनोज जरांगे) पळून जावून आपल्या घरात जाऊन झोपले. त्यांना राजेश टोपे व रोहित पवार यांनी मध्यरात्री 3 वाजता जाऊन त्यांना उठवले. त्यांना शरद पवार साहेब येणार असल्याचे सांगितले. तसेच उपोषणस्थळी जाऊन बसण्याची सूचना केली. त्यानंतर पवारांनी त्यांची भेट घेतली. पण जरांगेंनी पवारांना लाठीचार्ज का झाले हे सांगितले नाही, असे छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले.पवार साहेबांना आम्ही आजसुद्धा उत्तम प्रशासक मानतो. त्यांना वस्तुस्थिती समजली असती तर एक वेगळा प्रकार झाला नसता. मराठा तरुणांना असणारी सहानुभूती गेली नसती. लाठीचार्जनंतर घडलेल्या घटनांत सर्वांचीच चूक होती. पोलिस अधीक्षकही चूकले. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना मारहाण झाल्याचे सांगण्याची गरज होती. त्यांनी माफी मागितली. यामुळे देशापुढे खरे चित्र आलेच नाही. आम्ही बोललो तर आमच्यावर तुफान टीका झाली, असे छगन भुजबळ म्हणाले.बीडमध्ये कोड नंबर देऊन राजकीय नेत्यांची घरे व कार्यालये जाळण्यात आल्याचा दावाही भुजबळ यांनी यावेळी केला. प्रकाश सोळंके यांचे घर जाळले. एक केवळ एक वाक्य बोलले होते. त्या ठिकाणी कोयते, चॉपर, पेट्रोल बॉम्ब सापडले. या हल्ल्यासाठी कोड नंबर देण्यात आले होते. 1 नंबर प्रकाश सोळंके, 10 नंबर सुभाष राऊत यांचं हॉटेल, 21 नंबर जयदत्तर क्षीरसागर, 25 नंबर अमरसिंह पंडीत असे कोंड नंबर ठरले होते, असे ते म्हणाले.