कोल्हापूर-हेमंत करकरे यांच्या शरीरात घुसलेली गोळी कसाबच्या किंवा कुठल्याही दहशतवाद्याच्या बंदुकीतील नव्हती. ती गोळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ धार्जिण्या असलेल्या एका पोलिस अधिकाऱ्याच्या पिस्तुलमधील होती. त्यावेळेस ते पुरावे लपवणारा देशद्रोही कोण असेल तर तो उज्ज्वल निकम आहे. अशा देशद्रोह्याला भाजप तिकीट देत असेल तर मात्र भाजप देशद्रोह्यांना थेट पाठिशी घालणारा पक्ष आहे, असे वादग्रस्त विधान विजय वडेट्टीवार यांनी करत भाजपवर देखील निशाणा साधला. ते कोल्हापूरात आयोजित सभेत बोलत होते यावेळी त्यांनी हे विधान केले. ते कोल्हापूरात बोलत होते. त्यांच्या विधानानंतर भाजपकडून त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे.
विजय वडेट्टीवार यांनी वकील तथा भाजपचे मुंबईतील उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यावर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले की, तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख तेव्हा निकम यांना म्हणाले होते की, कसाबला फाशी झाली म्हणजे श्रेय घेण्याचे गरज नाही. तालुका लेव्हलच्या बेलआऊट करणाऱ्या वकिलानेही हा खटला लढवला असता तरीही कसाबला फाशी झाली असती. कारण कसाब हा दहशतवादी होता.
त्यामुळे त्याला फाशी झालीच असती. त्यामुळे यामध्ये उज्ज्वल निकम यांनी डिंग मारण्याचे किंवा बडेजाव मिरवण्याचे कारण नाही, असे विलासराव देशमुख यांनी म्हटले होते. विलासराव देशमुख यांनी उज्ज्वल निकम यांना तेव्हाच ओळखलं होतं, असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले. आम्ही जे काय बोललो आहोत, त्याविषयी उज्ज्वल निकम यांनी खुलासा करावा. लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव नक्की आहे, असाही हल्लाबोल वडेट्टीवार यांनी केला.
वडेट्टीवारांनी केले स्पष्टीकरण
मुंबईवरील 26/11 हल्ल्याच्या वेळी शहीद झालेले पोलीस अधिकारी हेमंत करकरे यांच्या शरीरात घुसलेली गोळी अतिरेक्यांची नव्हती, असे वक्तव्य काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केले होते. या वक्तव्यावरुन गदारोळ निर्माण होताच विजय वडेट्टीवार यांनी स्पष्टीकरण दिले आहे. हेमंत करकरे यांच्या शरीरात घुसलेली गोळी अतिरेक्यांची नव्हती, हे माझे वक्तव्य एस.एम. मुश्रीफ यांनी लिहलेल्या पुस्तकाच्या आधारे केले होते. त्यामध्ये तसा उल्लेख होता. ती गोष्ट खरी असेल तर हा देशद्रोहाचा प्रकार आहे, असे मी म्हटल्याचे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.