पुणे, दि. 22: माहे एप्रिल 2025 अखेर क्रांतीज्योती बाल संगोपन योजनेअंतर्गत जिल्ह्यातील एकूण 8 हजार 114 इतक्या लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे, अशी माहिती महिला व बालविकास अधिकारी रोहिणी ढवळे यांनी दिली आहे.
शासन निर्णय महिला व बाल विकास विभाग 30 5.2023 अन्वये बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 सुधारित अधिनियम 2021 कलम 2 (14) व महाराष्ट्र राज्याचे बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) नियम 2018 नुसार अनाथ निराश्रीत निराधार, बेघर, संरक्षण व निवाऱ्यांची गरज असलेल्या ० ते 18 वयोगटातील मुला-मुलींना संस्थेत दाखल करण्याऐवजी कौंटुबिंक वातावरणात त्यांचे संगोपन व विकास घडवून आणणे हा योजनेचा मुख्य उद्देश आहे.
सदर योजना ही वैयक्तीक लाभाची योजना असून या योजनेअंतर्गत 0 ते 18 वयोगटातील मुला-मुलींना शिक्षणासाठी दरमहा 2250 रुपये थेट लाभ देण्यात येतो. अनाथ, निराधार, निराश्रीत बालके, बेघर, दुर्धर आजारी पालकांची मुले, कैद्याची मुले या योजनेचा लाभ घेतात. क्रांतीज्योती बालसंगोपन योजनेचा लाभ घेण्यासाठी नजिकच्या अंगणवाडी सेविका, पंचायत समिती , तसेच जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन श्रीमती ढवळे यांनी केले आहे.

