पुणे- लहानपणी आपण ‘चल रे भोपळ्या टुणूक टुणूक ..ची गोष्ट ऐकली असेल …या गोष्टीत मोठ्या चतुराईने आजीबाईंनी आपली सुटका वाघोबाच्या तावडीतून करून घेतली …पण आजच्या काळात ..प्रत्यक्षात ..डोक्यात बादली घालून पुण्यातील एका आजीबाईंना आपली सुटका बिबट्याच्या तावडीतून करवून घ्यावी लागल्याची घटना आज सकाळी येथे घडली आहे . शहरातील पूर्व भागातील मुंढवा-केशवनगर भागातील रेणुका मंदिर परिसरात एक बिबट्या अढळून आल्याने खळबळ उडाली होती. यावेळी हातातील बादली बिबट्याच्या डोक्यात घालून पळत सुटत ७० वर्षीय आजीबाईनी आपला बचाव केल्याचा प्रसंग घडला .अखेरीस बांधकाम सुरु असलेल्या एका इमारतीमध्ये दडून बसलेल्या या बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभाग आणि अग्निशामक दलाला यश आले आहे. या बिबट्याने ४ ते ५ लोकांवर हल्लाही होता.
अग्निशामकच्या माहितीनुसार, या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाचे पथक घटनास्थळी रवाना झाले होते. दरम्यान, या बिबट्याने ७ वर्षे वयाच्या मुलावर हल्ला केला होता, या मुलाला वाचवताना इतर ३ जखमी झाले आहेत. दरम्यान, अग्निशमनचे बचाव पथक , वनविभाग, कात्रज येथील प्राणी संग्राहलायाची टीम यांनी संयुक्त कारवाईद्वारे जाळी टाकून बिबट्याला पकडले.
बिबट्याच्या या हल्ल्यात एक आजीबाई जखमी झाल्या आहेत. तर आदित्य भंडारी नामक तरुणही यात जखमी झाला आहे.
पुण्यातील मुंढवा-केशवनगर भागात आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास बिबट्या शिरल्याची घटना घडली. या घटनेत भोई वस्ती येथे राहणार्या सुमित्रा सूर्यकांत तारू या ७० वर्षांच्या आजींना बिबट्याने जखमी केले आहे. मात्र, जर त्यांनी समोर असणाऱ्या बिबट्याच्या तोंडावर बादली फेकून मारली नसली तर हा हल्ला त्यांच्या जीवावर बेतू शकला असता.
दरम्यान, सुमित्रा तारू या आजींशी संवाद साधल्यानंतर त्यांनी हा थरारक अनुभव माध्यमांच्या प्रतिनिधीसमोर व्यक्त केला. त्या म्हणाल्या, मी नेहमीप्रमाणे सकाळी उठल्यावर घराबाहेरील चुलीवर पाणी ठेवण्यासाठी बाहेर गेले होते. चुलीच्या बाजूला एक रिकामी बादली होती. तेथून काही फुट अंतरावर मला भटकं कुत्रं असल्याचा भास झाला. मात्र, तो बिबट्या असल्याचे मला दिसले. त्यानंतर मी बचावासाठी त्याच्या तोंडावर जवळची बादली फेकून मारली. या अचानक हल्ल्यामुळे गोंधळलेल्या बिबट्याने माझ्यावर झडप घातली आणि मानेला तसेच डोक्याला इजा केली.
या जीवघेण्या हल्ल्यातून बचाव करण्यासाठी मी हातातील बादली त्याच्या डोक्यात घातली आणि बाहेरच्या बाजूला पळत सुटले. त्यानंतर आरडा ओरड करण्यास सुरुवात केली आणि वाघ आल्याचे सर्वांना सांगितले. तेवढ्यात भिंतीवरून उडी मारून बिबट्या पसर झाला. घरापासून २०० मीटर अंतरावर असलेल्या इमारतीमध्ये बिबट्या घुसल्याचे या आजीबाईंनी सांगितले. तसेच आपण या भागात ४० वर्षांपासून राहत आहोत. इतक्या वर्षात इथं कधीही कोणताही वन्यप्राणी आला नाही. मात्र आज बिबट्या कसा आला याचे आश्चर्य असल्याचे त्यांनी म्हटले आहे.