स्वतःला रोजगारक्षम बनविणे आवश्यक- सचिन खेर यांचा सल्ला
पुणे : “केवळ पदवी मिळवली म्हणजे आपल्याला रोजगार मिळेल किंवा आपण त्या योग्य आहोत, असे होत नाही. तर आपल्या क्षमता, कमतरता यावर काम करून स्वतःला रोजगारक्षम बनविणे हे आजच्या स्पर्धेच्या युगात आवश्यक आहे,” असा सल्ला एक्स्पर्ट ग्लोबल ग्रुपचे सचिन खेर यांनी विद्यार्थ्यांना दिला. ‘व्यवस्थापन व समाजशास्त्रात बहुशाखीय संशोधन’ या विषयावरील राष्ट्रीय परिषदेत सचिन खेर बोलत होते.
आकुर्डी येथील डॉ. डी. वाय. पाटील प्रतिष्ठानच्या डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (डीवायपीआयएमएस) आणि सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या वतीने या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले आहे. यावेळी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (आयआयएम) इंदोरचे प्रा. डॉ. जी. वेंकट रमण, संस्थेचे संचालक डॉ. आशुतोष मिसाळ, कॉर्पोरेट रिलेशन प्रमुख डॉ. जे. जी. पाटील, संस्थेचे कार्यकारी संचालक निवृत्त विंग कमांडर पीव्हीसी पाटील, कन्सल्टंट संचालक डी. आर. कनुरे व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.
सचिन खेर म्हणाले, “शिक्षण घेऊन बाहेर पडलेली मुले ओली माती असते, त्याला आकार देता येतो. फक्त मेहनतीची आणि घडण्याची तयारी हवी. त्यामुळे शिक्षण पूर्ण झाल्यावर २-३ वर्ष मिळेल ती संधी स्वीकारावी, पूर्ण झोकून देऊन काम करावे व शिकावे. प्रामाणिक व पारदर्शकरित्या आपण स्वतःला सादर करणे महत्वाचे असते. जे उत्तम जमते तेच आणि तेवढेच आत्मविश्वासाने करावे. तुमचे ध्येय, लक्ष्य स्पष्ट हवे आणि ते मिळविण्यासाठी हवे ते कष्ट, श्रम करण्याची तयारी हवी. भविष्यातील आव्हानांचा दूरदृष्टीने विचार करून त्यासाठी स्वतःला तयार करायला हवे. आपल्या क्षमता ओळखून त्यावर अधिक काम करायला हवे तसेच कमतरता कशी दूर करता येईल यावरही काम करायला हवे.
यावेळी व्यंकट रमण यांनी व्यवसायातील नैतिकता या विषयावर मार्गदर्शन करत या विषयाच्या अभ्यासक्रमाविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. योग्य-अयोग्य यापेक्षा आपण जे करतोय ते का आणि काय करत आहोत, याचा विचार अधिक महत्वाचा असतो. पायाभूत गोष्टी कधीच बदलत नाहीत. त्यामुळे काळाबरोबर चालताना पाया पक्का असेल, तर बाकी सर्व सोपे होते, असेही त्यांनी नमूद केले.
पीव्हीसी पाटील म्हणाले, “सध्या सगळ्याच क्षेत्रात बदल होत आहेत. ज्यांना बदलाचे व्यवस्थापन जमते तेच या काळात टिकू शकतात. त्यामुळेच अशा चर्चासत्रांमधून सादर होणारे प्रबंध उपयुक्त ठरतात.” अशा चर्चासत्रातून चौकटी बाहेरचा विचार व कृती करायला उपयुक्त ठरतात, तसेच यातून संशोधनाच्या वेगवेगळ्या पैलूंवर प्रकाश पडतो, असे डॉ. जे जी पाटील यांनी नमूद केले. डॉ. आशुतोष मिसाळ यांनी स्वागत-प्रास्ताविक केले. बरुण दास व निधी दत्ता यांनी सूत्रसंचालन केले. मिलन वाघ यांनी आभार मानले.