Home Blog Page 67

ट्रम्प यांची रविवारी नाटो (NATO) देशांना धमकी


दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील इंधन टॅंकवर हल्ला:अनेक उड्डाणे डायव्हर्ट, ट्रम्प म्हणाले – नाटोने मदत न केल्यास भविष्य वाईट

युद्धाच्या दरम्यान यूएईमध्ये १९ भारतीयांना अटक, फेक न्यूज पसरवल्याचा आरोप-युद्धाच्या दरम्यान यूएईने ३५ जणांना अटक करण्याचे आदेश दिले, ज्यात १९ भारतीय आहेत. पीटीआय वृत्तसंस्थेनुसार, त्यांच्यावर सोशल मीडियावर फेक व्हिडिओ आणि माहिती पसरवल्याचा आरोप आहे.यूएईचे ॲटर्नी जनरल डॉ. हमद सैफ अल शम्स यांनी सांगितले की, हे पाऊल डिजिटल प्लॅटफॉर्मच्या निगराणीनंतर उचलण्यात आले आहे, जेणेकरून खोटी माहिती पसरवून अशांतता किंवा भीती निर्माण करण्यापासून रोखता येईल.

तेल अवीव/तेहरान:ट्रम्प यांनी रविवारी नाटो (NATO) देशांना धमकी दिली. ते म्हणाले की, जर मित्र राष्ट्रांनी होर्मुझ सामुद्रधुनी खुली ठेवण्यास मदत केली नाही, तर नाटोचे भविष्य खूप वाईट असू शकते.ट्रम्प म्हणाले, “आपल्याकडे नाटो (NATO) नावाची एक व्यवस्था आहे. आम्ही त्यांच्यासोबत खूप चांगले वागलो आहोत. आम्हाला युक्रेनच्या बाबतीत त्यांची मदत करण्याची गरज नव्हती. तरीही आम्ही त्यांना मदत केली. आता ते आम्हाला मदत करतात का, हे पाहायचे आहे.”

त्यांनी असेही सांगितले की, जर चीनने होर्मुझ सामुद्रधुनी खुली ठेवण्यास मदत केली नाही, तर ते या महिन्याच्या अखेरीस चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासोबत होणारी त्यांची शिखर परिषद पुढे ढकलू शकतात. ट्रम्प ३१ मार्च रोजी चीनला जाणार आहेत. ट्रम्प यांनी होर्मुझ सामुद्रधुनीचा वापर करणाऱ्या देशांना या मार्गाचे संरक्षण करण्यासाठी युद्धनौका आणि आवश्यक मदत पाठवण्याची मागणी केली होती. जगभरातील २०% तेल याच मार्गातून जाते.
आज सकाळी दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ एका इंधन टाकीला लक्ष्य करण्यात आले. यापूर्वीही युद्धादरम्यान येथे हल्ला झाला होता. मात्र, या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही.इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) ने सांगितले की, इस्त्रायलच्या लष्करी आणि संरक्षण सुविधांना लक्ष्य करण्यात आले आहे. हे घन इंधनावर चालणारे सामरिक क्षेपणास्त्र आहे, जे 2000-2500 किलोमीटरपर्यंत हल्ला करू शकते.

द नॅशनल इंटरेस्ट मासिकाच्या मते, या क्षेपणास्त्राची पोहोच इजिप्त, सुदानच्या काही भागांपर्यंत, युक्रेनच्या मोठ्या भागांपर्यंत, दक्षिण रशिया, पश्चिम चीन, भारत आणि हिंद महासागर तसेच भूमध्य समुद्राच्या मोठ्या क्षेत्रांपर्यंत असू शकते.

ट्रम्प म्हणाले, “अमेरिकन मीडिया आणि इराण बनावट बातम्या पसरवत आहेत”
ट्रम्प यांनी इराण युद्धाबाबत वृत्तांकन करणाऱ्या अमेरिकन मीडियावर तीव्र हल्ला चढवला. त्यांनी चुकीची माहिती पसरवणाऱ्या मीडिया आउटलेटवर देशद्रोहाचा खटला चालवण्याची मागणी केली.त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, ट्रुथ सोशलवरील एका पोस्टमध्ये ट्रम्प यांनी आरोप केला की इराण अमेरिकन मीडियावर प्रभाव पाडत आहे आणि इराण चुकीची माहिती पसरवण्यासाठी एआयचा वापर करत आहे.त्यांनी म्हटले की इराण आणि फेक न्यूज मीडिया अमेरिकेच्या युद्धनौका यूएसएस अब्राहम लिंकनला समुद्रात जळत असल्याचे दाखवण्यासाठी संगनमत करत आहेत. ट्रम्प यांच्या मते, जहाजाला आग लागली नव्हती किंवा हल्लाही झाला नव्हता.ट्रम्प म्हणाले की ही बातमी जाणूनबुजून खोटी आहे आणि अशा बातम्या देणाऱ्या मीडिया आउटलेटवर देशद्रोहाचा आरोप लावला पाहिजे.त्यांनी असेही म्हटले की सत्य हे आहे की इराणचे मोठे नुकसान होत आहे आणि ते एआयने तयार केलेल्या खोट्या कथांद्वारेच विजयाचा दावा करत आहे, ज्या भ्रष्ट मीडिया आउटलेट पसरवतात.

मसाप मध्ये सत्तापालट :साहित्य संवर्धन ला बहुमत

मिलिंद जोशी ,सुनीताराजे पवार यांचा पराभव करत योगेश सोमण आणि स्वाती महाळंक विजयी

पुणे : राज्यातील आद्य साहित्य संस्था असलेल्यामहाराष्ट्र साहित्य परिषद,पुणे या संस्थेच्या बहुचर्चित आणि चुरशीच्या निवडणुकीत साहित्य संवर्धन आघाडी विजय झाला.साहित्य संवर्धन आघाडीच्या उमेदवारांनी अध्यक्ष,प्रमुख कार्यवाह आणि कोषाध्यक्ष या तीनही पदांवर विजय मिळवत संस्थेत सत्तापालट घडवून आणला.परिवर्तन उत्कर्ष आघाडीचे तीन आणि विरोधकांच्या साहित्य संवर्धन आघाडीचे चार उमेदवार निवडून आले. साहित्य संवर्धन आघाडीला भाजपच्या नेत्यांनी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दिला होता. ‘मसाप’च्या विद्यमान पदाधिकाऱ्यांनी परिवर्तन उत्कर्ष आघाडी म्हणून ही निवडणूक लढवली होती; तर विरोधकांनी साहित्य संवर्धन आघाडी या नावाने निवडणूक लढवली.
‘मसाप’च्या निवडणुकीचे निकाल रविवारी रात्री उशिरा जाहीर झाले. सकाळी साडेअकरापासून सुरू झालेली मतमोजणी रात्री साडेनऊच्या सुमारास संपल्यानंतर निकालाची घोषणा दहा वाजता झाली. साहित्य संवर्धन आघाडीच्या योगेश सोमण, स्वाती महाळंक आणि प्रदीप निफाडकर यांनी अनुक्रमे अध्यक्ष, प्रमुख कार्यवाह आणि कोषाध्यक्ष या पदांवर विजय मिळवताना प्रा. मिलिंद जोशी, सुनीताराजे पवार आणि विनोद कुलकर्णी यांचा पराभव केला.

निवडणुकीचा निकाल
अध्यक्ष :
योगेश सोमण (मते ५३६५)विजयी. विरुद्ध प्रा. मिलिंद जोशी (मते ५३२०)
प्रमुख कार्यवाह : स्वाती महाळंक
(मते ५४१४) विजयी.
विरुद्ध सुनीताराजे पवार(मते ५२८५)
कोषाध्यक्ष : प्रदीप निफाडकर (मते ५५३६)विजयी. विरुद्ध विनोद कुलकर्णी (मते ५१६८)

अन्य विजयी उमेदवार
सुनील महाजन:८३९ मते (साहित्य संवर्धन आघाडी)
अंजली कुलकर्णी : ८०८ मते (परिवर्तन उत्कर्ष)
सुनेत्रा मंकणी:८१४ मते (साहित्य संवर्धन आघाडी)
प्रसाद मिरासदार:८३९ मते (साहित्य संवर्धन आघाडी)
माधव राजगुरू:७६६ मते (परिवर्तन उत्कर्ष )
नितीन संगमनेरकर:८०७ मते (साहित्य संवर्धन आघाडी)
डॉ. आशुतोष जावडेकर :८४७ मते (परिवर्तन उत्कर्ष )



या निवडणुकीत तीन शीर्ष पदांसाठी एकूण १६,६०७ मतांपैकी १०,९०१ मतदान झाले होते. यातील १०,७१३ मते वैध ठरली; तर १८८ अवैध ठरली. पुण्यातील स्थानिक कार्यवाह पदांसाठी १६३१ तर पुणे जिल्हा प्रमुख पदासाठी १५०६ एवढे मतदान झाले. मात्र प्रत्येक पदासाठी अगदी चुरशीची निवडणूक झाली.अध्यक्ष ,प्रमुख कार्यवाह आणि कोषाध्यक्ष या पदांचाही विजयाचा फरक अनुक्रमे अवघ्या ४५, १३० आणि ३६८ मतांचा ठरला.
पुणे जिल्हा प्रमुख पदांचा निकाल दुपारी दीड वाजताच स्पष्ट झाला; तर पुण्यातील सात स्थानिक कार्यवाह पदांचा निकाल दुपारी साडेतीनच्या सुमारास स्पष्ट झाला. तीन शीर्ष पदांच्या निकालाला मात्र रात्री दहा वाजले. यात जवळपास साहित्य संवर्धन आघाडीचे प्रत्येक उमेदवार आघाडीवर होते. त्यांच्या मतांची आघाडी एकवेळ १३०० मतांपर्यंत गेली होती. मात्र, शेवटच्या दोन फेऱ्यांमध्ये ही आघाडी ३०० मतांपर्यंत कमी झाली. मात्र शेवटच्या फेरीत साहित्य संवर्धन आघाडीच्या उमेदवारांनो आघाडी कायम ठेवत विजय मिळविला. या निवडणुकीसाठी अॅड. प्रताप परदेशी यांनी मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून, तसेच संजीव खडके आणि गिरीश केमकर यांनी सह निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले.

साहित्य संवर्धन आघाडी ही समविचारी साहित्यप्रेमी आणि वाचककेंद्रित अशी आघाडी होती. निवडणुकीत आमचे उमेदवार बहुमताने विजयी झाले, याचा आनंद आहे. आमच्या आघाडीसाठी काम केलेल्या सर्वांचा हा विजय आहे. त्यांना हा विजय समर्पित करतो. यापुढे ‘मसाप’मध्ये कायद्याप्रमाणे, नियमानुसारच कारभार होईल.
-योगेश सोमण, मसापचे नवनिर्वाचित अध्यक्ष

महाराष्ट्र साहित्य परिषद ही संस्था मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीचेजतन-संवर्धन करणारे मोठे व्यासपीठ आहे. ‘साहित्य संवर्धन आघाडी’ला मिळालेला हा विजय म्हणजे साहित्यप्रेमी, लेखक, वाचक आणि कार्यकत्यांनी व्यक्त केलेला विश्वास आहे. पुढील काळात परिषद अधिक सक्रिय, सर्वसमावेशक आणि तरुण पिढीला जोडणारी बनवण्याचा आमचा प्रयत्न असेल. मराठी साहित्याच्या
समृद्धीसाठी परिषद कटिबध्द असेल.-राजेश पांडे, मुख्य संयोजक, पुणे पुस्तक महोत्सव


जुन्या,प्रदूषण करणाऱ्या वाहनांना पुण्यात रस्त्यावर दिसताच प्रदूषण शुल्क आकारण्याचा प्रस्ताव

पुण्यात शिवाजीनगर आणि पेठ परिसरात ‘लो एमिशन झोन’ लागू करण्याबाबत प्रशासनाचे मंथन

पुणे, दि. १५ – पुणे शहरातील वाढत्या वायू प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी शिवाजीनगर व पेठ परिसरात ‘लो एमिशन झोन’ (कमी प्रदूषण क्षेत्र) लागू करण्याबाबत प्रशासनाकडून विचारमंथन सुरू आहे. या क्षेत्रात जास्त प्रदूषण करणाऱ्या वाहनांना प्रवेशासाठी विशेष प्रदूषण शुल्क आकारण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे.

नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालयात विविध तज्ञ संस्था आणि संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीस जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम, पुणे महानगरपालिकेचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी व वाहतूक नियोजन क्षेत्रातील तज्ज्ञ उपस्थित होते.

पुणे शहरातील वायू प्रदूषणाचे प्रमुख कारण वाहने असल्याचे विविध अभ्यासांमधून स्पष्ट झाले आहे. २०२० मध्ये झालेल्या अभ्यासानुसार पुणे महानगर परिसरातील एकूण सूक्ष्म कण (पीएम २.५) प्रदूषणापैकी सुमारे ४६ टक्के प्रदूषण वाहनांमुळे होत असल्याचे आढळून आले आहे. हे सूक्ष्म कण मानवी आरोग्यास अत्यंत घातक ठरतात.
तसेच २०२३ मध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातील पेट्रोल, डिझेल व सीएनजीवर चालणाऱ्या सुमारे ७० टक्के वाहनांमध्ये ‘भारत स्टेज-४’ किंवा त्यापेक्षा जुने इंजिन तंत्रज्ञान असल्याचे दिसून आले आहे. केंद्र शासनाने वाहनांमधून होणाऱ्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी ‘भारत स्टेज’ उत्सर्जन मानके लागू केली असून सध्या ‘भारत स्टेज-६’ हे तुलनेने सर्वात कमी प्रदूषण करणारे इंजिन तंत्रज्ञान मानले जाते.

अभ्यासानुसार २००० पूर्वी नोंदणी झालेली एक कार जवळपास ११ आधुनिक ‘भारत स्टेज-६’ कारइतके प्रदूषण करते, तर जुन्या तंत्रज्ञानाच्या एका ट्रकमुळे सुमारे १४ आधुनिक ट्रकांइतके प्रदूषण होते. तसेच ‘भारत स्टेज-६’ डिझेल कारमधून होणारे सूक्ष्म कणांचे उत्सर्जन ‘भारत स्टेज-३’ डिझेल कारपेक्षा सुमारे ९० टक्के कमी असल्याचेही नमूद करण्यात आले.

या पार्श्वभूमीवर शिवाजीनगर व पेठ परिसरात ‘लो एमिशन झोन’ लागू करण्याचा विचार आहे. या क्षेत्रात ‘भारत स्टेज-३’ किंवा त्यापेक्षा जुन्या इंजिन तंत्रज्ञानाच्या वाहनांना प्रवेशासाठी दररोज प्रदूषण शुल्क आकारले जाऊ शकते. संबंधित शुल्क आगाऊ भरले नसल्यास नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. पुढील टप्प्यात ही अट ‘भारत स्टेज-४’ वाहनांनाही लागू करण्याचा तसेच लो एमिशन झोनचा विस्तार शहरातील इतर भागांमध्ये करण्याचा विचार प्रशासन करत आहे. या व्यवस्थेची अंमलबजावणी कॅमेऱ्यांच्या माध्यमातून करण्याचा प्रस्तावही बैठकीत मांडण्यात आला.

बैठकीत जास्त प्रदूषण करणाऱ्या वाहनांच्या वापरावर नियंत्रण ठेवण्याबरोबरच शहरातील पदपथ अधिक चालण्यायोग्य करणे, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करणे, बससेवा वाढविणे तसेच नागरिकांना स्वच्छ व पर्यायी वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देणे यांसारख्या उपाययोजनांवरही चर्चा करण्यात आली.

स्वच्छ हवा आणि आरोग्यदायी शहर निर्माण करण्याच्या दृष्टीने या उपाययोजना महत्त्वाच्या ठरणार असून याबाबत पुढील कार्यवाहीसाठी संबंधित विभागांकडून सविस्तर आराखडा तयार करण्याचे निर्देश बैठकीत देण्यात आले.

‘झेन कथा’तून सत्याचे तर ‘कात्रजचा घाट’ पुस्तकातून सत्तेचे दर्शन : डॉ. श्रीपाल सबनीस

पुणे : बहुधार्मिक समाजात संवादाशिवाय मानवाचे अस्तित्व शक्य नाही. धार्मिकता वेगळी असली तरी गौतम बुद्ध, भगवान महावीर आणि महात्मा गांधी यांनी जगाला शांतता, करूणा आणि मावनतेचा संदेश दिला, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले. ‘झेन कथा’तून सत्याचे तर ‘कात्रजचा घाट’ या पुस्तकातून सत्तेचे दर्शन घडते, अशी टिप्पणीही त्यांनी केली.

झेन मास्टर सुदस्सन लिखित ‘झेन कथा’ आणि प्रा. सुधीर भालेराव लिखित ‘कात्रजचा घाट’ पुस्तकांचे प्रकाशन आज (दि. १५) डॉ. सबनीस यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. सदाशिव पेठेतील भारत इतिहास संशोधन मंडळाच्या सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सिने कला दिग्दर्शक संतोष संखद, मैत्री प्रकाशनच्या मोहिनी कारंडे मंचावर होते.

जीएसटी अधिकारी प्रज्ञा बनसोडे-शिंदे, रमाई स्मारक समितीचे मुख्य समन्वयक विठ्ठल गायकवाड यांची उपस्थिती होती. डॉ. सबनीस पुढे म्हणाले, संत आणि महापुरुषांनी जगाच्या कल्याणासाठी आपले आयुष्य वेचले. त्यांनी दाखविलेल्या मार्गाने गेल्यास जगात शांतता नांदेल.

संतोष संखद म्हणाले, झेन कथा या पुस्तकातून आयुष्याचे सार सांगितले आहे तर कात्रजचा घाट पुस्तकातील कथांमधून आपल्यासमोर खरीखुरी पात्रे उभी राहतात.

लेखनाविषयी बोलताना प्रा. सुधीर भालेराव म्हणाले, समाजात चांगली-वाईट माणसे असतात मात्र सकारात्मक दृष्टीकोनातून लिखाण केले आहे. झेन मास्टर सुदस्सन म्हणाले, बोधकथांची सूत्रबद्ध मांडणी पुस्तकात केली आहे. झेन कथा या अत्यंत प्रेरणादायक आहेत, अंर्तगामी मन विकासासाठी त्या अत्यंत आवश्यक असतात. प्रास्ताविक मोहिनी कारंडे यांनी केले. ललिता उबाळे यांनी सूत्रसंचालन केले.

अजून किती ‘वैष्णवी’ मृत्यूला कवटाळणार?:सासरच्या छळाला आणि पैशांच्या मागणीला कंटाळून 22 वर्षीय तरुणीची आत्महत्या

पुणे-लोणीकंद येथील बकोरी रोडवरील गोकुळ पार्क परिसरात एका 22 वर्षीय विवाहितेने सासरच्या जाचाला कंटाळून गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वैष्णवी लाटे असे मृत तरुणीचे नाव आहे.लग्नानंतर ८ महिन्यातच या २२ वर्षीय विवाहितेनेआत्महत्या केलीय.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, वैष्णवीचं यशवंत लाटे याच्याशी ११ मार्च २०२५ रोजी लग्न ठरलं होतं. लग्न ठरल्यानंतर त्यांनी नवीन घराचं बांधकाम केलं होतं. त्या घरात फर्निचरसाठी २ लाखांची मागणी यशवंत लाटे यानं केली होती. ते पैसेही यशवंतला देण्यात आले होते. तर ७ मे रोजी लग्नात मानपान आणि इतर संसार उपयोगी वस्तू दिल्या होत्या. लग्नानंतर काही महिन्यातच यशवंतने वैष्णवीचा छळ सुरू केला.

पती यशवंतचे मुलीसोबत चॅटिंग सापडल्यानंतर वैष्णवीने जाबही विचारला होता. तेव्हा तिला मारहाण करत माहेरी पाठवून दिलं होतं. आता पुन्हा नांदवायचं असेल तर पाच लाख रुपये आणि चारचाकी गाडी घेऊन ये असं म्हणत तिचा छळ केल्याचा आरोप माहेरच्या कुटुंबियांनी केला. शेवटी माहेरच्या लोकांनी १७ जानेवारी २०२६ रोजी पाच लाख रुपये रोख रक्कम दिली असंही वैष्णवीच्या कुटुंबियांनी म्हटलंय.

दरम्यान, घरात इंटेरियर करण्यासाठी २० लाखांची मागणी केली जात आहे. पैसे आणले नाही तर तोंड दाखवू नकोस अशी धमकी पतीने दिल्याचा फोन वैष्णवीने गेल्या आठवड्यात आईला केला होता. यानंतर वैष्णवीचे कुटुंबिय पतीच्या घरी गेले होते. पैसे आणले नाही तर मुलाचे दुसरे लग्न लावून देऊ असं वैष्णवीच्या सासरच्यांनी तिच्या आईला सांगितलं.

वैष्णवीचे आई भेटून गेल्यानंतर दुसर्‍याच दिवशी वैष्णवीने गळफास घेऊन आत्महत्या केली. तिने राहत्या घरात ओढणीने गळफास घेतला. या प्रकरणी तिच्या आईने पोलिसात तक्रार दिली असून पतीसह सासू सासऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

या घटनेमुळे विवाहित महिलांवरील छळाचा आणि हुंडाबळीचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. लग्नानंतर अवघ्या काही काळातच एका 22 वर्षीय तरुणीला कौटुंबिक छळामुळे आपला जीव गमवावा लागल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. सासरच्या जाचाला कंटाळून अजून किती ‘वैष्णवी’ अशा प्रकारे मृत्यूला कवटाळणार? असा संतप्त सवाल या निमित्ताने उपस्थित होत असून, दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची चंद्रकांतदादा पाटील,नितेश राणे , महापौर नागपुरे यांनी घेतली भेट; तब्येतीची केली विचारपूस

पुणे-“आण्णा काळजी घ्या, लवकर बरे होऊन पुन्हा जोमाने कामाला लागा!” अशा शब्दात राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना शुभेच्छा दिल्या.त्याचबरोबर नितेश राणे आणि पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांनीही रुग्णालयात जाऊन मोहोळ यांची भेट घेतली .

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना २९ वर्षांपूर्वी कुस्ती खेळताना पायाला दुखापत झाली होती. त्यावर नुकतीच एक शस्त्रक्रिया करण्यात आली. या पार्श्वभूमीवर चंद्रकांतदादा पाटील यांनी रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली आणि त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. यावेळी त्यांनी उपस्थित डॉक्टरांशीही चर्चा करून मोहोळ यांच्या प्रकृतीबाबत माहिती जाणून घेतली.

“आण्णा, स्वतःच्या प्रकृतीची काळजी घ्या आणि लवकरात लवकर बरे होऊन पुन्हा त्याच उत्साहाने जनसेवेच्या कामात सक्रिय व्हा,” अशी सदिच्छा चंद्रकांत दादा पाटील यांनी आणि मान्यवरांनी यावेळी व्यक्त केली.

हिंजवडी – शिवाजीनगर मेट्रोचा पहिला टप्पा मे, तर दुसरा टप्पा जुलैमध्ये सुरू होणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा

पुणे-पुण्यात सध्या ३३ किमी मेट्रो सुरू असून रोज अडीच लाख लोक तिचा वापर करत आहेत. गणपती उत्सवादरम्यान दररोज पावणेसहा लाख प्रवाशांनी मेट्रोने प्रवास केला. आता हिंजवडी ते शिवाजीनगर या २३ किमी लांबीच्या मेट्रो मार्गाचा पहिला टप्पा मे महिन्यात (११ किमी) आणि दुसरा टप्पा जुलै महिन्यात (१२ किमी) सुरू करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुणे मेट्रो भवनचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, खासदार मेधा कुलकर्णी, महापौर मंजुषा नागपुरे,सभागृहनेते गणेश बिडकर, स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले, विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, असीम गुप्ता आणि मेट्रोचे सीईओ श्रावण हर्डीकर उपस्थित होते.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, पुणे मेट्रोला आज एक नवीन घर मिळाले आहे. कामाला सुरुवात होण्यास काही उशीर झाला असला तरी, त्यानंतर देशात सर्वाधिक वेगाने पुणे मेट्रोचे काम झाले आहे. मेट्रो स्टेशन आणि इतर उपाययोजना चांगल्या प्रकारे उभारण्यात आल्या आहेत. मेट्रोच्या सुचारू कामकाजासाठी सुसज्ज मेट्रो भवन आवश्यक आहे.
पुण्याच्या वाहतुकीला गती देण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. पुणे हे आयटी हबनंतर आता जीसीसी (ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर्स) क्रेझच्या दिशेने वाटचाल करत आहे, ज्यामुळे भविष्यात उच्च पगाराच्या नोकऱ्या उपलब्ध होतील. शहरात लवकरच जमिनीखालील रस्ते नेटवर्कही तयार केले जाईल, ज्यामुळे पुणे वाहतूक कोंडीमुक्त शहर बनेल.

पुणे हे सर्वाधिक नागरीकरण दर असलेले शहर आहे. त्यामुळे सर्व कामे एकत्रितपणे करावी लागतील आणि त्यासाठी आवश्यक निधीही दिला जाईल. पुण्याला सक्षम वाहतूक व्यवस्था दिली जाईल, असेही त्यांनी नमूद केले.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सांगितले की, पुणे मेट्रोचे काम मार्गी लावण्यासाठी अनेकांचा हातभार लागला आहे. दिवंगत अजित पवार यांनी पुण्याच्या प्रशासकीय वैभवात भर घालण्यासाठी विविध दर्जेदार इमारतींच्या उभारणीवर लक्ष केंद्रित केले होते. एकेकाळी सायकलींचे शहर म्हणून ओळखले जाणारे पुणे आता आधुनिक मेट्रो शहर म्हणून ओळखले जाईल, असेही त्या म्हणाल्या.

पुणे मेट्रोचे महाव्यवस्थापक श्रावण हर्डीकर यांनी माहिती दिली की, पुणे मेट्रोची स्थापना २०१५-१६ दरम्यान झाली. त्यानंतर विविध ठिकाणी कार्यालये स्थलांतरित करण्यात आली. अखेर आज शिवाजीनगर येथील सिव्हिल कोर्ट परिसरात हक्काचे ठिकाण मिळाले आहे.

बारामती व राहुरी विधानसभा मतदारसंघांसाठी पोटनिवडणूक जाहीर

मतदान 23 एप्रिलला तर 4 मे 2026 रोजी मतमोजणी होणार

मुंबई, दि. १५ : भारत निवडणूक आयोगाने देशातील सहा राज्यांतील आठ विधानसभा मतदारसंघांसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील राहुरी (जि. अहमदनगर) आणि बारामती (जि. पुणे) या दोन विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे.

राहुरी मतदारसंघाचे आमदार शिवाजी भानुदास कर्डिले आणि बारामती मतदारसंघाचे आमदार अजित अनंतराव पवार यांच्या निधनामुळे या जागा रिक्त झाल्या असून त्यासाठी ही पोटनिवडणूक घेतली जाणार आहे.

निवडणूक आयोगाने या निवडणुकांसाठी आवश्यक कार्यक्रम जाहीर केला असून मतदानासाठी सर्व मतदान केंद्रांवर इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (EVM) आणि व्हीव्हीपॅट (VVPAT) यांचा वापर करण्यात येणार आहे.

मतदारांची ओळख पटवण्यासाठी मतदार फोटो ओळखपत्र (EPIC) हा मुख्य पुरावा असेल. याशिवाय आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट, बँक किंवा पोस्ट ऑफिस पासबुक, मनरेगा जॉब कार्ड, आरोग्य विमा स्मार्ट कार्ड आदी कागदपत्रेही ग्राह्य धरली जाणार आहेत.

दरम्यान, निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच राहुरी आणि बारामती मतदारसंघात आचारसंहिता तत्काळ लागू झाली आहे. तसेच गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांची माहिती उमेदवार आणि राजकीय पक्षांनी प्रचार काळात तीन वेळा प्रसिद्ध करणे बंधनकारक असल्याचेही आयोगाने स्पष्ट केले आहे.

भारत निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आलेल्या कार्यक्रमानुसार मतदान 23 एप्रिल 2026 रोजी होणार असून मतमोजणी 4 मे 2026 रोजी केली जाणार आहे.

जाहीर कार्यक्रमानुसार 30 मार्च 2026 (सोमवार) रोजी निवडणुकीसाठी राजपत्र अधिसूचना जारी केली जाईल. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 6 एप्रिल 2026 (सोमवार) निश्चित करण्यात आली आहे. दाखल झालेल्या अर्जांची छाननी 7 एप्रिल 2026 (मंगळवार) रोजी होणार आहे.

उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 9 एप्रिल 2026 (गुरुवार) आहे. त्यानंतर संबंधित मतदारसंघांमध्ये 23 एप्रिल 2026 (गुरुवार) रोजी मतदान पार पडेल.

मतदानानंतर 4 मे 2026 (सोमवार) रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाईल. तर संपूर्ण निवडणूक प्रक्रिया 6 मे 2026 (बुधवार) पर्यंत पूर्ण केली जाणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.

या पोटनिवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने सर्व यंत्रणांना आवश्यक तयारी करण्याच्या सूचना दिल्या असून आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

पुण्यात मेट्रोचे २०० किमीचे जाळे उभारणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे मेट्रो भवनचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

पुणे, दि. १५ – पुणे मेट्रो प्रकल्पामुळे शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला मोठी चालना मिळाली असून पुणेकरांनी मेट्रो सेवेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. सध्या दररोज सुमारे अडीच लाख प्रवासी मेट्रोचा वापर करत आहेत. भविष्यात पुणे महानगरपालिका, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि पीएमआरडीए क्षेत्राचा समावेश असलेले जवळपास २०० किलोमीटरचे मेट्रो जाळे उभारण्याचे नियोजन असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. वेगाने विकसित होणाऱ्या नागरी विकासाचा विचार करून पुणे मेट्रो आणि नगर विकास विभागाने या संपूर्ण नेटवर्कचे सविस्तर नियोजन तातडीने करण्याचे निर्देश त्यांनी दिले. त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाहीदेखील श्री. फडणवीस यांनी दिली.

पुणे शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला बळकटी देणाऱ्या पुणे मेट्रो प्रकल्पाच्या प्रशासकीय मुख्यालय असलेल्या ‘मेट्रो भवन’चे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

या प्रसंगी राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे,सभागृहनेते गणेश बिडकर , स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले , खासदार मेधा कुलकर्णी, आमदार योगेश टिळेकर, भीमराव तापकीर, सुनील कांबळे, हेमंत रासने, बापू पठारे, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता, पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार तसेच महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, पुणे मेट्रो प्रकल्पाचे काम सुरुवातीला काही अडचणींमुळे उशिरा सुरू झाले असले तरी एकदा गती मिळाल्यानंतर अत्यंत वेगाने हा प्रकल्प पूर्ण करण्यात आला. देशातील सर्वाधिक गतिमानतेने पूर्ण होणाऱ्या मेट्रो प्रकल्पांमध्ये पुणे मेट्रोचा उल्लेख केला जातो. मेट्रो स्थानकांचे आधुनिक डिझाइन, मल्टीमॉडल कनेक्टिव्हिटी, प्रवासी सुविधा तसेच अत्याधुनिक तांत्रिक प्रणाली या सर्व बाबींमध्ये उत्कृष्ट नियोजन करण्यात आले आहे.

सध्या पुणे शहरात सुमारे ३३ किलोमीटरचा मेट्रो मार्ग कार्यान्वित झाला आहे. टाटा समूहाच्या सहकार्याने देशातील पहिल्या सार्वजनिक-खाजगी भागीदारी (पीपीपी) असलेल्या २३ किलोमीटरच्या मेट्रो प्रकल्पाचे कामही अंतिम टप्प्यात असून त्यापैकी १२ किलोमीटर मार्गाचे उद्घाटन मे महिन्यात, तर उर्वरित ११ किलोमीटर मार्ग जुलै महिन्यात सुरू करण्याचे नियोजनआहे. या दोन्ही प्रकल्पांसह पुण्यातील मेट्रोचे एकूण जाळे सुमारे ५६ किलोमीटरपर्यंत पोहोचणार आहे. याशिवाय आणखी ५५ किलोमीटरचे काम सुरू असून सुमारे ८० किलोमीटरचा विस्तार प्रस्तावित आहे. भविष्यात पुणे महानगरपालिका, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि पीएमआरडीए क्षेत्राचा समावेश असलेले जवळपास २०० किलोमीटरचे मेट्रो नेटवर्क उभारण्याचे नियोजन करण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.

पुण्याचा वेगाने होणारा नागरी विकास लक्षात घेता या संपूर्ण २०० किलोमीटर नेटवर्कचे सविस्तर नियोजन तातडीने पूर्ण करावे, सर्व मार्गांचे डीपीआर एकत्रितपणे तयार करावेत तसेच भविष्यातील ग्रोथ सेंटर्स, नवीन विमानतळ, औद्योगिक क्षेत्रे आणि वाढती उपनगरे यांचा विचार करून मेट्रोचे जाळे विकसित करावे, अशा सूचना त्यांनी महामेट्रो प्रशासनाला दिल्या. पुढील काळात जमिनीवर, आकाशात आणि भुयारी मार्गांद्वारे वाहतूक व्यवस्था विकसित करून पुणे शहर वाहतूक कोंडीरहित आणि शाश्वत शहर बनविण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

पुणे मेट्रो भवन अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार
उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार म्हणाल्या, पुणे मेट्रो भवन केवळ प्रशासकीय मुख्यालय नसून आधुनिक पुण्याच्या प्रगतीचे प्रतीक आहे. अत्याधुनिक अभियांत्रिकी आणि सुयोग्य नियोजनाचा उत्कृष्ट नमुना असलेली ही इमारत पुण्याच्या प्रशासकीय वैभवात महत्त्वाची भर घालणारी ठरेल. पुणे मेट्रोसाठी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या कामाचेही त्यांनी स्मरण केले.

मुळा-मुठा नदीकाठावर उभारलेले हे भवन पर्यावरणाशी सुसंगत अशा पद्धतीने विकसित करण्यात आले आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड ही राज्याच्या विकासाची महत्त्वाची केंद्रे असल्याने येथे वाढत्या लोकसंख्येमुळे वाहतूक व्यवस्थेवर मोठा ताण निर्माण झाला होता. त्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारने रिंग रोड, रुंद रस्ते, सेवा रस्ते, भुयारी मार्ग, पूल तसेच मेट्रोसारखे मोठे प्रकल्प राबवून वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी ठोस पावले उचलली असल्याचेही श्रीमती पवार यांनी नमूद केले.

स्वारगेट–कात्रज, पिंपरी-चिंचवड–भक्तीशक्ती चौक, वनाज–चांदणी चौक, रामवाडी–वाघोली, खडकवासला–खराडी, वारजे–नळस्टॉप तसेच हडपसर–सासवड आणि हडपसर–लोणी काळभोर या महत्त्वाच्या मेट्रो मार्गांना गती देण्यात आली आहे. भविष्यात पुणे विमानतळ आणि चाकण एमआयडीसी यांनाही मेट्रोने जोडण्याचा विचार पुढे नेण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी प्रास्ताविकात पुणे मेट्रो प्रकल्पाची सविस्तर माहिती दिली. मेट्रो भवनमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेल्या विविध सुविधांची माहितीदेखील त्यांनी दिली. आता पुणे मेट्रोला सुसज्ज असं मेट्रो भवन मिळालं आहे, निश्चितपणे अधिक गतीने आम्ही काम करु.

मेट्रो भवन, पुणे – ठळक वैशिष्ट्ये

▪️एकूण क्षेत्रफळ सुमारे ८,१५० चौ. मीटर.
▪️भव्य स्वागत कक्ष व पुण्याच्या सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडविणारी कला स्थापना.
▪️अनुभव केंद्रात पुणे मेट्रोचे जाळे व प्रकल्पाची मॉडेल्स.
▪️३१२ आसनक्षमतेचे सभागृह व बॅकअप संचालन नियंत्रण केंद्र, सिग्नलिंग व दूरसंचार सुविधा.
▪️काच दर्शनी भागामुळे नैसर्गिक प्रकाश, ऊर्जा कार्यक्षम व पर्यावरणपूरक रचना.

बंगालमध्ये 23 व 29 एप्रिलला मतदान:तामिळनाडूत 23 एप्रिल, आसाम-केरळ-पुद्दुचेरीत 9 एप्रिलला मतदान, सर्वांचे निकाल 4 मे रोजी

नवी दिल्ली-निवडणूक आयोगाने रविवारी आसाम, केरळ, पुदुच्चेरी, तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा केली. तामिळनाडूमध्ये २३ एप्रिल रोजी एकाच टप्प्यात मतदान होईल. दरम्यान, बंगालमध्ये मतदान दोन टप्प्यांत—२३ एप्रिल आणि २९ एप्रिल रोजी—पार पडेल. केरळ, आसाम आणि पुदुच्चेरी या तीन राज्यांमध्ये ९ एप्रिल रोजी एकाच टप्प्यात मतदान घेण्यात येईल. या निवडणुकांचे निकाल ४ मे रोजी जाहीर केले जातील.

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी सांगितले की, या पाच राज्यांमध्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशात मिळून एकूण १७.४ कोटी मतदार आणि ८२४ जागांचा समावेश आहे. मुख्य निवडणूक आयुक्तांनी पुढे नमूद केले की, गेल्या १२ महिन्यांत निवडणूक आयोगाने पारदर्शकता वाढवण्यासाठी अनेक नवीन उपक्रम राबवले आहेत. यातील पहिला उपक्रम ‘SIR’ हा होता; ही एक अशी उपाययोजना आहे जी मतदार यादीमध्ये कोणताही अपात्र व्यक्ती समाविष्ट राहणार नाही, याची खात्री करते. दुसऱ्या उपक्रमांतर्गत, मतदान केंद्राच्या बाहेर मोबाईल फोन जमा करणे अनिवार्य करण्यात आले आहे; मतदार आपले मतदान पूर्ण केल्यानंतर ते फोन परत घेऊ शकतात.

या घोषणेसह, या पाचही राज्यांमध्ये ‘आचारसंहिता’ (Model Code of Conduct) तात्काळ प्रभावाने लागू झाली आहे. २०२१ मध्ये, या पाचही राज्यांच्या निवडणुकांची घोषणा २६ फेब्रुवारी रोजी करण्यात आली होती. त्यावेळी, बंगालमधील निवडणुका आठ टप्प्यांत पार पडल्या होत्या, तर आसाममध्ये तीन टप्प्यांत मतदान झाले होते; तामिळनाडू, केरळ आणि पुदुच्चेरीमध्ये मात्र एकाच टप्प्यात मतदान घेण्यात आले होते. या पाचही राज्यांच्या विधानसभांची मुदत मे महिन्यात संपुष्टात येत आहे.

पुण्यात ‘टकटक गँग’, सिग्नलवर थांबलेल्या गाड्यांमधून मोबाईल आणि दागिने लांबवणारे उत्तर प्रदेशातील दोन भामटे पकडले

पुणे-शहरातील वाहनचालकांचे लक्ष विचलित करून मोबाईल आणि सोन्याचे दागिने चोरणाऱ्या ‘टकटक गँग’मधील २ भामट्यांना पोलिसांनी पकडले आहे. अटक केलेल्या आरोपींची नावे ओमप्रकाश कोहली (वय ३८) आणि अफझल अब्बासी (वय ३८) अशी असून, दोघेही उत्तर प्रदेशातील मेरठ येथील रहिवासी आहेत. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेतला. पोलिसांनी सापळा रचून दोघांना अटक करण्यात यश मिळवले.फरासखाना पोलीस ठाणे आणि विमाननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत या टोळीची हालचाल अधिक असल्याचे तपासात समोर आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,ही टोळी प्रामुख्याने शहरातील गर्दीच्या रस्त्यांवर आणि चौकांमध्ये सक्रिय होती. सिग्नलवर थांबलेल्या वाहनांमध्ये डोकावून पाहत ते वाहनचालकांचा अंदाज घेत असत. त्यानंतर एखाद्या वाहनाने धडक दिल्याचा बनाव करून चालकाला गाडीतून बाहेर काढण्याचा किंवा वाद घालण्याचा प्रयत्न केला जात असे. या गोंधळाचा फायदा घेत दुसरा साथीदार वाहनातील मोबाईल, पर्स किंवा सोन्याचे दागिने चोरी लंपास करायचा. त्यामुळे अनेक वाहनचालकांना आपली मौल्यवान वस्तू कधी चोरीला गेली हेही लक्षात येत नसे.
फरासखाना पोलीस ठाणे आणि विमाननगर पोलीस ठाण्याच्या भागात अशा प्रकारच्या चोरीच्या अनेक घटना घडल्याची नोंद पोलिसांकडे आहे. चौकशीदरम्यान त्यांनी अशाच प्रकारे वाहनचालकांचे लक्ष विचलित करून चोरी केल्याची कबुली दिली. सध्या पोलिसांकडून या दोघांकडून आणखी कोणत्या भागात चोरी करण्यात आली आहे का, याबाबत सखोल चौकशी सुरू आहे. या प्रकरणात समोर आलेले सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांच्या हाती लागले असून, त्याआधारे आणखी काही धागेदोरे मिळण्याची शक्यता आहे. शहरात बाहेरून येणाऱ्या अशा टोळ्या वाहनचालकांना लक्ष्य करत असल्याने पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. सिग्नलवर किंवा रस्त्यावर अनोळखी व्यक्तीने धडक दिल्याचा किंवा इतर कारणाने वाद घालण्याचा प्रयत्न केला, तर शांत राहून परिस्थितीची खात्री करून घ्यावी.

सिनेमागृहांमध्ये येणार ‘लाडकी बहीण’

काही चित्रपट घोषणेपासूनच रसिकांच्या मनात कुतूहल जागविण्याचे काम करतात. समाजात घडणाऱ्या घटनांवर वेध घेत, त्यावर भाष्य करणाऱ्या अशाच एका चित्रपटाची सिनेसृष्टीपासून रसिकांपर्यंत सर्वच ठिकाणी जोरदार चर्चा आहे. महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू केलेल्या बहुचर्चित ‘लाडकी बहिण योजने’चे समाजात विविध प्रकारे पडसाद उमटले. सरकारी योजनेतील ‘लाडकी बहीण’ चहूबाजूला चर्चेचा विषय ठरली. आता हिच ‘लाडकी बहीण’ रुपेरी पडद्यावरही झळकणार आहे. ‘१५०० रुपये हप्ता आमच्या संसारात लाखापेक्षा भारी’ असे म्हणत ‘लाडकी बहीण’ हा आगामी चित्रपट १७ एप्रिल रोजी महाराष्ट्रभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

शुभम फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत ‘लाडकी बहीण’ चित्रपटाच्या दिग्दर्शिका शितल शिंदे असून, त्यांनी शनिदेव फिल्म्सच्या बॅनरखाली निर्मितीही केली आहे. या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद गणेश शिंदे यांनी लिहिले आहेत. बाबासाहेब पाटील या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत. लेखक प्रताप गंगावणे चित्रपटाचे मार्गदर्शक असून, शेखर मते, पंकज चव्हाण, सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई, लहू साळुंखे यांचे ‘लाडकी बहीण’ला विशेष सहकार्य लाभले आहे. चित्रपटाचे ‘लाडकी बहीण’ हे शीर्षक खूप विचार करायला लावणारे आहे. या चित्रपटात काय पाहायला मिळणार याचे संकेत पोस्टरवर दिलेल्या टॅगलाईनवरून मिळतात. हा चित्रपट फक्त शासकीय योजनेवर भाष्य करणारा आहे की, यात आणखी काही नाट्यमय घडामोडी दडलेल्या आहेत याबाबतही कुतूहल वाटते. या चित्रपटात स्मिता तांबे मुख्य भूमिकेत झळकणार असून, तिच्या जोडीला सुरेखा कुडची, उषा नाडकर्णी, उषा नाईंक, गौतमी पाटील, रुक्मिणी सुतार (सरू आजी), सारिका जाधव, पूनम कापसे, माधव अभ्यंकर, शशांक शेंडे, अनिल नगरकर, सुरेश विशावकर्मा, सिद्धेश्वर झाडबुके, गणेश शिंदे, दर्शना जोकरे, मेगा शिंदे आदी कलाकार आहेत. एखाादी सरकारी योजना सर्वसामान्य गृहिणीच्या संसाराला कशा प्रकारे हातभार लावू शकते याचे चित्रण या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. ‘एकमेकां साह्य करू अवघे धरू सुपंथ…’ या उक्तीचा अवलंब करीत गोरगरीब महिला एकत्र येतात आणि कशा प्रकारे आपला उत्कर्ष साधतात हा एक महत्त्वपूर्ण पैलू ‘लाडकी बहीण’मध्ये आहे. सरकारी कार्यालयांपासून सर्वसामान्यांच्या घरांपर्यंत सर्वत्र चर्चेचा विषय ठरलेला एक महत्त्वपूर्ण विषय हसत-खेळत या चित्रपटात मांडण्यात आला आहे. आशयघन गोष्ट, उत्कंठावर्धक घडामोडी, सर्वसामान्यांच्या भावना, सुमधूर गीत-संगीत, बहारदार नृत्य, लक्षवेधी अभिनय आणि एक सशक्त संदेश देत हा चित्रपट संपूर्ण कुटुंबाचे परिपूर्ण मनोरंजन करेल असा ठाम विश्वास दिग्दर्शक शितल शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

सामाजिक विषयावर विनोदी अंगाने भाष्य करताना विषयातील गांभीर्य कायम राखण्याचे काम ‘लाडकी बहीण’ चित्रपटात करण्यात आले आहे. मराठीतील नामवंत कलाकारांचा अभिनय रसिकांना अखेरपर्यत खिळवून ठेवणारा ठरणार असून, लावणी क्वीन गौतमी पाटीलची गवळण रसिकांवर मोहिनी घालणार आहे. चिनू चेतन यांनी या चित्रपटातील गीतांची कोरिओग्राफी केली असून, संगीत विनीत देशपांडे यांनी दिले आहे. बाबा लाड, चैतन्य साळुंखे यांनी सिनेमॅटोग्राफी केली असून, गायक-संगीतकार उमेश गवळी. तसेच आनंद शिंदे व गायत्री शेलार यांच्या आवाजात ‘लाडकी बहीण’मधील गाणी संगीतबद्ध करण्यात आली आहेत.

पुण्यातील गॅस एजन्सी ताब्यात घ्या आणि सरकारच्या वतीने चालवा: आमदार रासनेंची मागणी

कृत्रिम टंचाई तसेच काळाबाजार रोखण्यासाठी उपाय

पुणे : जगभरातील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील गॅस एजन्सी ताब्यात घेऊन प्रशासनाच्या मार्फत चालवाव्यात अशी मागणी आमदार हेमंत रासने यांनी केली आहे. जिल्हाधिकारी डूडी यांनी यावर तातडीने निर्णय घ्यायला हवा असेही त्यांनी म्हटल आहे .
जिल्हाधिकारी यांना दिलेल्या पत्रकात रासने यांनी म्हटले आहे कि,’ सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे इंधन पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली असून देशभरात इंधनाच्या संभाव्य टंचाईबाबत नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर पुणे शहरामध्ये घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या उपलब्धतेबाबत देखील नागरिकांकडून विविध तक्रारी प्राप्त होत आहेत. काही गॅस एजन्सीकडून कृत्रिम टंचाई निर्माण करणे, सिलिंडर वितरणात जाणूनबुजून विलंब करणे, साठेबाजी करणे तसेच घरगुती गॅस सिलिंडरचा व्यावसायिक वापरासाठी किंवा जास्त दराने विक्री करून काळाबाजार केल्याच्या बाबी नागरिकांकडून निदर्शनास येत आहेत. अशा प्रकारांमुळे सर्वसामान्य नागरिकांना वेळेवर गॅस सिलिंडर उपलब्ध होत नसून त्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
वरील परिस्थिती लक्षात घेता पुणे शहरातील सर्व गॅस एजन्सींची तात्काळ तपासणी करून, त्या तात्पुरत्या स्वरूपात जिल्हा प्रशासनाच्या ताब्यात घेऊन प्रशासनाच्या निगराणीखाली गॅस वितरण व्यवस्था चालविण्यात यावी, अशी नम्र विनंती आहे. यामुळे गॅस पुरवठा व्यवस्थेमध्ये पारदर्शकता येईल व कृत्रिम टंचाई तसेच काळाबाजार रोखण्यास मदत होईल.
तसेच या संपूर्ण प्रक्रियेवर प्रभावी नियंत्रण राहावे व गॅस सिलिंडरचे साठा, वितरण व दर यावर नियमित देखरेख ठेवता यावी यासाठी अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागातील अधिकाऱ्यांची नियुक्ती पुणे शहरातील सर्व गॅस एजन्सींवर निरीक्षणासाठी करण्यात यावी, जेणेकरून कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार किंवा काळाबाजार होऊ नये.
सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी तसेच सर्वसामान्य नागरिकांना वेळेवर व योग्य दरात गॅस सिलिंडर उपलब्ध व्हावेत यासाठी जिल्हा प्रशासनाने तातडीने आवश्यक ती उपाययोजना कराव्यात, अशी विनंती.रासने यांनी केली आहे.

लाडक्या बहिणींना सरकार फेब्रुवारी अन् मार्चचा हप्ता एकाचवेळी देणार; 15 एप्रिलपर्यंत पैसे वर्ग होण्याची शक्यता

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी पात्र महिलांचा फेब्रुवारी व मार्च महिन्याचा रखडलेला हप्ता सरकारने एकाचवेळी देण्याचे संकेत दिलेत. त्यानुसार, हा हप्ता पुढील महिन्याच्या 15 तारखेच्या आत मिळण्याची शक्यता आहे. पण याचवेळी ई-केवायसी न करणाऱ्या महिलांना या योजनेच्या लाभापासून मुकावे लागण्याचीही शक्यता आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सुरू केली होती. या योजनेंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना दरमहा 1500 रुपयांचे अर्थसहाय्य दिले जाते. राज्यातील लक्षावधी महिलांना या योजनेचा लाभ मिळतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात या योजनेसाठी भरीव तरतूद केली आहे. तसेच ही योजना आहे तशीच अव्याहत सुरू राहण्याचीही शक्यता व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर फेब्रुवारी व मार्च महिन्याच्या हप्त्याचा लाभ पात्र महिलांच्या खात्यावर लवकरच वर्ग होण्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सरकारने नव्या आर्थिक वर्षात फेब्रुवारी व मार्च या 2 महिन्यांचे पैसे पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात वर्ग करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, हे पैसे एप्रिलच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात अथवा 15 एप्रिलपूर्वी बँक खात्यांत वर्ग केले जाण्याची शक्यता आहे. महिलांना या योजनेचा शेवटचा हप्ता जानेवारी महिन्यात मिळाला होता. तेव्हापासून लाडक्या बहिणी फेब्रुवारीच्या हप्त्याची वाट पाहत होत्या. पण महिना संपला तरी त्यांना तो लाभ मिळाला नव्हता. पण आता त्यांना फेब्रुवारी व मार्च या दोन्ही महिन्यांचे पैसे एकाचवेळी मिळणार आहेत.

उल्लेखनीय बाब म्हणजे यावेळी काही महिलांचा या योजनेंतर्गत मिळणारा लाभही बंद होण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने लाडक्या बहिणींना ई-केवायसी करण्यासाठी 31 डिसेंबर 2025 पर्यंतची मुदतवाढ दिली होती. त्यात अनेक महिलांनी ई-केवायसी केली. पण त्यातही चुका झाल्या. त्यामुळे या महिलांचा लाभ बंद झाला होता. त्यामुळे सरकारने चुका दुरुस्त करण्याची अखेरची संधी दिली आहे. त्यानुसार या महिलांना 31 मार्चपर्यंत आपली ई-केवायसी करावी लागणार आहे. यावेळी चूक होणाऱ्या महिलांचा या योजनेचा लाभ कायमस्वरुपी बंद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये ५०वे हृदय-फुफ्फुस प्रत्यारोपण यशस्वी

0

ठाणे ते पुणे अवघ्या दोन तास २५ मिनिटांत जीवनदायी धाव

ग्रीन कॉरिडॉरमध्ये डॉक्टरपोलिस आणि प्रशासनाची उत्कृष्ट कामगिरी

एका दात्याच्या उदात्त निर्णयामुळे गंभीर रुग्णाला मिळाली नव्या आयुष्याची संधी

अवयवदानातून आशेचा किरण; ग्रीन कॉरिडॉरमुळे जीवन वाचवणारे ५०वे प्रत्यारोपण शक्य

पुणे : उत्कृष्ट समन्वयतत्परता आणि मानवतेचा सुंदर संदेश देत डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलपिंपरीपुणे आणि महाराष्ट्र पोलिस विभाग यांच्या संयुक्त प्रयत्नांतून ठाण्यातील किम्स हॉस्पिटलमधून दात्याचे फुफ्फुस पुण्यातील डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये ग्रीन कॉरिडॉरद्वारे सुरक्षितपणे आणि वेळेत पोहोचवण्यात आले. एखाद्या रुग्णाला नवजीवन देणाऱ्या या अमूल्य अवयवाची गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी ही वाहतूक निर्धारित वेळेत पूर्ण करण्यात आली असून त्यामुळे रुग्णालयातील ५०वे हृदयफुफ्फुस प्रत्यारोपण शक्य झाले आहे.

१२ मार्च रोजी काटेकोर नियोजन आणि अचूक समन्वयातून दात्याच्या फुफ्फुसांची सुरक्षित वाहतूक करण्यात आली. किम्स हॉस्पिटल, ठाणे येथून डॉक्टर आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांची टीम सकाळी १०.१५ वाजता निघाली आणि अवघ्या दोन तास २५ मिनिटांत म्हणजेच दुपारी १२.४० वाजता ही फुफ्फुसे डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये पोहोचली. वेळेशी सुरू असलेल्या या शर्यतीत मिळालेल्या यशामुळे अत्यंत गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णावर जीव वाचवणारे फुफ्फुस प्रत्यारोपण करणे शक्य झाले असून त्याला नव्या आयुष्याची आशादायी संधी मिळाली आहे.

पिंपरीचिंचवडचे प्रादेशिक परिवहन अधिकारी संदीप चव्हाणउपप्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल जाधवठाण्याच्या प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित कटकर यांच्या मार्गदर्शनाखाली महत्त्वपूर्ण अवयवाच्या जलद वाहतुकीसाठी ग्रीन कॉरिडॉर यशस्वीपणे तयार करण्यात आला.

ठाणे आणि पिंपरीचिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालय तसेच पिंपरीचिंचवड पोलिस विभाग यांच्या समन्वयातून हा अवयव नियोजित वेळेत पुण्यात पोहोचवण्यात आला. त्यामुळे अत्यावश्यक प्रत्यारोपण प्रक्रिया पार पडून एका रुग्णाला नवजीवन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला.

या संपूर्ण मोहिमेत सहभागी पोलिस कर्मचारीवैद्यकीय पथक आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांनी उत्कृष्ट समन्वय आणि तत्परता दाखवत दात्याच्या फुफ्फुसांची सुरक्षित  वेळेत वाहतूक सुनिश्चित केली. डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या समर्पित टीमने ग्रीन कॉरिडॉर आणि अवयव समन्वयाची जबाबदारी सांभाळली. या टीममध्ये डॉआशिष डोळसडॉराहुल केद्रेवाल्मिक (ओटी नर्स)निखिल लाकी (परफ्युजनिस्ट)अरुण

(ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेटरआणि विशाल पाटील (तंत्रज्ञ) यांचा समावेश होता. त्यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे ही जीवन वाचवणारी आणि आशेचा किरण देणारी मोहीम यशस्वी ठरली.

डॉडीवायपाटील विद्यापीठ (अभिमत विद्यापीठ)पिंपरीपुणे चे कुलपती डॉपीडीपाटील म्हणाले, अशा जटिल अवयव प्रत्यारोपण आणि प्रगत शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यात आमचे रुग्णालय आघाडीवर आहेही आमच्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहेआमच्या डॉक्टरांच्या उत्कृष्ट टीमने दाखवलेले समर्पण आणि उल्लेखनीय प्रयत्नांबद्दल मी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतोडीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक सुविधा आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने अधिकाधिक जीव वाचवणाऱ्या प्रक्रिया राबवण्याचा आमचा निर्धार कायम आहे.”

तसेच डॉडीवायपाटील विद्यापीठ (अभिमत विद्यापीठ)पिंपरीपुणे चे प्रकुलपती  डॉभाग्यश्री पीपाटील, म्हणाल्या, अवयवदानाबाबत समाजात अधिक जागरूकता निर्माण व्हावी आणि त्यातून अनेकांचे जीव वाचू शकतात हा संदेश लोकांपर्यंत पोहोचावाही माझी नेहमीच भूमिका आणि दृष्टी राहिली आहेआमच्या डॉक्टरांच्या टीमने त्यांच्या अथक परिश्रमकठोर मेहनत आणि रुग्णसेवेप्रती असलेल्या निष्ठेमुळे हे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहेत्यांच्या कार्याचा मला मनापासून अभिमान आहे आणि येत्या काळातही अशाच प्रकारे अनेकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्याची आम्हाला आशा आहे.”