पुणे-
मराठी भाषा आणि हिंदी वादाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पुण्यातील वसंत व्याख्यानमालेत भाषिक अभिमानावर जोरदार भूमिका मांडली.भाषेचा अभिमान काय असतो, हे उदाहरणांसह स्पष्ट करत त्यांनी मराठी माणसांनी अधिक ठामपणे उभं राहण्याची गरज व्यक्त केली.

राज ठाकरे म्हणाले की, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा तिच्या प्राचीनतेमुळे मिळाला आहे, तर हिंदी ही तुलनेने नव्या काळातील भाषा आहे. “आपण कोणत्या वादात अडकलो आहोत? हिंदी लादण्याच्या,” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. भाषिक अस्मितेबाबत बोलताना त्यांनी बंगालमधील एका व्हिडिओचा दाखला देत, स्थानिक लोक आपल्या भाषेबाबत किती ठाम असतात हे अधोरेखित केले.
यावेळी त्यांनी सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यांचं कौतुक करताना सांगितलं की, “वानखेडे स्टेडियमवरील कार्यक्रमात सचिन प्रथम मराठीत बोलतो, ही अभिमानाची बाब आहे. तो भारतरत्न असला तरी आपल्या मुळांचा विसर पडू देत नाही.”
राज ठाकरे यांनी संत परंपरेचा उल्लेख करत महाराष्ट्र घडवण्यात तिचा मोठा वाटा असल्याचे सांगितले. मात्र, आज आपण त्या परंपरेचा विसर पडल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. “महत्त्वाच्या व्यक्तींना आपण सोयीस्करपणे विसरत आहोत,” असेही ते म्हणाले.
भाषिक व सामाजिक प्रश्नांवर बोलताना त्यांनी महाराष्ट्रातील राजकारण्यांवरही टीका केली. “आज कोणताही विषय राजकारणाशिवाय मांडता येत नाही. महाराष्ट्राचं वाटोळं झालं, त्याला येथील राजकारणीच जबाबदार आहेत,” असे त्यांनी स्पष्ट केले.
राज्याबाहेरील उदाहरण देताना त्यांनी रविंद्रनाथ टागोर (Rabindranath Tagore) यांच्या साहित्याचा संदर्भ दिला. “महाराष्ट्रात काम करत असलेले बंगाली युवकही रविंद्रसंगीत विसरत नाहीत, पण आपल्याकडे लेखक आणि कवींनाही जातीतून पाहिलं जातं,” अशी टीका त्यांनी केली.
तसेच, राज्यात मराठी भाषेचा वापर सक्तीने व्हावा, यावरही त्यांनी भर दिला. “महाराष्ट्रात मराठी बोलणार नाही, असं सांगण्याची हिंमत कशी होते? इतर राज्यांमध्ये स्थानिक भाषेबाबत अशी परिस्थिती सहन केली जात नाही,” असे ते म्हणाले. मराठी भाषा टिकवायची असेल तर ती वरपासून खालपर्यंत सर्व स्तरांवर वापरली गेली पाहिजे, असंही ठाकरे म्हणाले.

