पुणे बाल पुस्तक जत्रेचे व्यासपीठावर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा
पुणे: मराठी भाषेच्या संवर्धनासाठी उपयुक्त असणारे शंभरावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुण्यातच होणार असून, याबाबत कोणीही शंका बागळू नये. त्यासाठी योग्य ती कार्यवाही करण्यात येत आहे. या माध्यमातून लहान मुलांना आणि युवकांना वाचनाची गोडी लावण्यासाठी त्यांना उत्तम पुस्तके उपलब्ध करून देण्याची जबाबदारी आपल्या सर्वांना पार पाडण्याची आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी दिली.

पुणे पुस्तक महोत्सव, पुणे महानगरपालिका, समर्थ युवा फाऊंडेशन आणि संवाद पुणे यांच्या वतीने आयोजित पुणे बाल पुस्तक जत्रेचे उत्साहात उद्घाटन झाले. ही जत्रा ४ मेपर्यंत स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे विनामूल्य सुरू आहे. यावेळी पाटील बोलत होते. उद्योग आणि मराठी भाषा विभाग मंत्री उदय सामंत (दूरदृष्य प्रणालीद्वारे), महापौर मंजुषा नागपुरे, उपमहापौर परशुराम वाडेकर, आमदार हेमंत रासने, पुणे महापालिकेचे विरोधी पक्षनेते निलेश निकम, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण, राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक श्यामकांत देवरे, बालसाहित्यिक राजीव तांबे, अरूण गीते, पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे, संवाद पुणेचे सुनील महाजन आदी उपस्थित होते. यावेळी पाहुण्यांच्या उपस्थितीत मराठी शब्दकोषाचे प्रकाशन; तसेच मराठी शब्दकोष ॲपचा शुभारंभ करण्यात आला.
पाटील म्हणाले की, तरुण, लहान मुले वाचत नाही असे सरसकट म्हणणे, आता उचित ठरणार नाही. गेल्या पुणे पुस्तक महोत्सवाला १५ लाख नागरिकांनी भेट दिली. यातील ५ लाखांपेक्षा अधिक उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी आणि लहान मुले होते. मुलांचा स्क्रीन टाईम कमी करण्याची जबाबदारी शिक्षक आणि पालकांची आहे त्यासाठी त्यांना दर्जेदार बालसाहित्य उपलब्ध करून द्यावे लागेल लहान मुलांना वाचनाची गोडी लागावी आणि त्यातून वाचन चळवळ पुढे जावे, यासाठीच पुणे बाल पुस्तक जत्रेचा अभिनव प्रयोग राज्यात गेल्या दोन वर्षापासून होत आहे. या जत्रेत सर्व पुणेकरांनी कुटुंबासह सहभागी होऊन, मराठी भाषा आणि साहित्य-संस्कृती वाढविण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे पाटील यांनी स्पष्ट केले.
नागपुरे म्हणाल्या की, नवीन पिढी वाचनाशी जोडली जावी, हे थोर महापुरुषांनी सांगितलेले स्वप्न पुणे बाल पुस्तक जत्रेतून काम होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित भारताची संकल्पना मांडली आहे. पुणे बाल पुस्तक जत्रा ही विकसित भारत संकल्पाची पायरी आहे. मुळणीनचांगल्या पुस्तकांना आपला मित्र करा. शिक्षक आणि पालकांनी मुलांना अधिकाधिक नाविण्यपूर्ण पुस्तके देण्यासाठी प्रयत्न करावे.या जत्रेत महानगरपालिका उत्स्फूर्तपणे सहभागी होत आहे, याचा आनंद आहे.
तांबे म्हणाले की, पुणे बाल पुस्तक जत्रा ही लहान मुलांसाठी केलेली आजची पेरणी आहे. या माध्यमातून पुढील दहा वर्षांसाठी नवे वाचक घडणार आहेत, ही फार मोठी बाब आहे. सोमण म्हणाले की, महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे बाल पुस्तक जत्रेत सहभागी झाली आहे. येत्या काळात मुलांसाठी आम्ही बाल विभाग सुरू करीत आहोत. त्याचे मार्गदर्शक राजीव तांबे राहणार आहे, अशी माहिती सोमण यांनी दिली. वाडेकर आणि निकम यांनी मुलांनी वाचनाकडे वळायला हवे, असे सांगत जत्रेला शुभेच्छा दिल्या. पांडे यांनी प्रास्ताविक करीत, पुणे बाल पुस्तक जत्रेची माहिती दिली. सूत्रसंचालन डॉ. संजय चाकणे यांनी केली. महाजन यांनी आभार मानले.
…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित भारताचे, तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विकसित महाराष्ट्राचे स्वप्न पाहिले आहे. या विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्राचे स्वप्न आपल्याला पूर्ण करायचे असल्यास, आपल्याला पुस्तकांची, कलेची आणि साहित्य संस्कृतीची जोड द्यावी लागणार आहे. पुढील चार दिवस जत्रा सुरू राहणार असून, त्यात लहान मुलांसाठी १०० पुस्तकांची दालने आहेत. खेळण्यासाठी जुने पारंपरिक खेळ आहेत. दिवसभर विविध कार्यशाळा आहे. दररोज सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम आहे. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांना घेऊन जत्रेला भेट द्यावी.—-राजेश पांडे, मुख्य संयोजक, पुणे पुस्तक महोत्सव
…….
मुलांना वाचनाकडे वळवण्याचे विधायक काम:
मुलांना पुस्तकांकडे वळवण्याचे विधायक काम आवश्यक असून, ते काम पुणे पुस्तक बाल जत्रेच्या माध्यमातून होत आहे. त्याबद्दल आयोजकांचे आभार मानायला हवे.पुस्तकांची चळवळ राज्यभर पसरवण्यासाठी अशा जत्रा विभागीय स्तरावर व्हायला हव्यात. वाचनाची आवड लागण्याचे काम बालवयात व्हायला हवे. त्यामुळे मराठी साहित्य रुजण्यासाठी खूप मदत होते आणि मराठीची चळवळ अधिक सक्षम होण्यासाठी हातभार लागतो. मराठीच्या वैश्विक प्रचार – प्रसारासाठी मराठी भाषा विभाग सक्षम आहे. राज्य सरकारने लंडनमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने मराठी भाषा वैश्विक केंद्र पुढील दोन महिन्यात निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणे १०० वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुण्यात होण्याची दाट शक्यता असून, तशा पद्धतीने चर्चा सुरू आहेत या संमेलनालाही पुणेकर मोठा प्रतिसाद देतील, यात शंका नाही, असे मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

